टोलनाके चुकविण्यासाठी आता कोल्हापूर महापालिकेने कंबर कसली असून शहरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याचे बांधकाम पालिकेने सुरु केले आहे.
कोल्हापूर- वारंवार आंदोलने, मोर्चे, उपोषणे आणि जाळपोळ करुनही टोलधाडीवर उपाय सापडत नसल्याने टोलनाके चुकविण्यासाठी आता कोल्हापूर महापालिकेने कंबर कसली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात शिरोली टोलनाक्यापासून शहरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याचे बांधकाम पालिकेने सुरु केले आहे. त्यामुळे टोलनाके चुकवून वाहनधारकांना शहरात ये-जा करता येणार आहे.
टोलधाड कायमची हद्दपार करण्यासाठी कोल्हापूरकरांनी सगळे प्रयत्न केले. परंतू न्यायालयाचा आदेश आणि पोलीस संरक्षणामुळे आयआरबीची टोलधाड कायम सुरु राहिली. यामुळे टोल न देता कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी पहिला टप्पा म्हणून शिरोली टोल नाक्यापासून पर्यायी मार्ग काढला आहे. तत्कालीन महापौर सुनीता राऊत यांनी पर्यायी मार्गाची घोषणा केली होती. त्यानुसार कोल्हापूरकरांना शिरोली टोल नाक्यापासून बापट कॅम्पमार्गे टोल न देता शहरात प्रवेश करता येणार आहे.
विशेष म्हणजे शिरोली टोलनाका हा शहरातील सर्वात मोठा टोलनाका असून, आयआरबीची सर्वाधिक कमाई याच टोलनाक्यावरुन होत आहे. कोल्हापूरमध्ये आयआरबीचे एकूण नऊ टोलनाके आहेत. कोल्हापूरच्या हद्दीवर असणा-या अन्य आठ टोलनाक्यांवरही अशा प्रकारचे पर्यायी मार्ग काढले जाणार आहेत. पर्यायी रस्ते लवकरात लवकर कोल्हापूरकरांच्या सेवेत देण्यासाठी पालिकेनेही जोर लावला आहे. त्यामुळे आयआरबी आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, टोल आकारणीच्या विरोधात कोल्हापुरात गेल्या पाच वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही टोलचा मुद्दा गाजला. भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सत्तेवर आल्यानंतर टोलला हद्दपार करण्याची घोषणा केली होती. हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी टोल प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची बैठक घेऊन मूल्यांकनासाठी समितीची घोषणाही केली होती. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. यामुळे कोल्हापुरकरांमध्ये सरकारविरोधात रोष आहे.