शनिशिंगणापूर मंदिराच्या गाभा-यात महिलांना प्रवेश मिळण्याबाबत महिला संघटनांनी तीव्र लढा सुरू केला आहे. त्यातच आता नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरातही महिलांना प्रवेश मिळावा, अशी मागणी होऊ लागली आहे. मुंबईतील हाजी अली दर्ग्यातही मुस्लीम महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी मुस्लीम महिलांनी आवाज उठवला आहे. आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असताना महिलांना मंदिरात प्रवेश नाकारत दुजाभाव करणे योग्य वाटते का? महिलांना मंदिरात प्रवेश मिळाल्यास हे पाऊल स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने सकारात्मक ठरेल का? परंपरा-रूढी याचे कारण देत महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे, हे मंदिर विश्वस्तांचे कारण पटते का? पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात महिला भटजींची नेमणूक होत असताना दुसरीकडे महिला भाविकांना काही मंदिरात प्रवेश नाकारणे ही बाब योग्य वाटते का? महिलांना समान वागणूक देणे पुरुषांची जबाबदारी आहे का?
स्वातंत्र्य, समानता आणि न्याय हाच आपला धर्म
महिलांनी शिक्षण घेऊ नये, ही एकेकाळी प्रथा होती. महिलांचे कार्यक्षेत्र फक्त ‘चूल आणि मूल’ इतकेच असावे ही पण प्रथा होती. महिलांना बोलण्याचा, मत मांडण्याचा, आपला जीवनसाथी निवडण्याचा असा कोणताच अधिकार नव्हता. रूढी-परंपरा या थोतांड कथांमध्ये तिला गुंतवून ठेवण्यात आले. सती प्रथेच्या अनिष्ट रूढी-परंपरेत ती होरपळत गेली. ही सर्व बंधने पाळणे या एकेकाळी प्रथा होत्या. पण सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या अन्यायाविरोधात लढा दिला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये तरतूद करून महिला-पुरुषांना समान हक्क दिले. त्यामुळे आजच्या २१व्या शतकात महिलांना कोणत्याही मंदिरात प्रवेश नाकारणे हे चुकीचे असल्याचे मत वाचकांनी व्यक्त केले आहे. न्याय, समानतेच्या आड येणा-या रूढी-परंपरांमध्ये काळानुसार बदल होणे गरजेचे असल्याचे वाचकांचे म्हणणे आहे. स्वातंत्र्य, समानता आणि न्याय हाच आपला धर्म असल्याचे मत वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
रूढी-परंपरांमध्ये गरज असल्यास सुधारणा करावी
महाराष्ट्रातील बहुतांश देवस्थानांमध्ये महिलांना प्रवेश दिला जातो. शनिशिंगणापूरचे देवस्थान आणि इतर मोजकी मंदिरे याचे अपवादात्मक उदाहरण. महिलांना प्रवेशबंदीसाठी सांगितले जाणारे कारण म्हणजे अनेक शतकांची परंपरा, प्रथा. पण यासोबतच अनेक भक्तांची रूढी-परंपरांबाबत श्रद्धाही आहे. प्रचलित परंपरा वा प्रथा केवळ प्रदीर्घ आहे म्हणून चालू राहावी, असे म्हणता येणार नाही. समाजहितासाठी वा अन्याय निवारणार्थ जर या रूढी-परंपरांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असेल, तर ती करणे गरजेचे ठरते.
– मधुकर ताटके, गोरेगाव
महिलांवरील अन्याय दूर करावा
आजच्या काळात महिलांची भजन, कीर्तने मंडळे आहेत. आपल्याकडे महिलांची संत परंपराही आहे. उदा. संत मीराबाई, संत जनाबाई इ. असे असताना केवळ प्रथा, परंपरेच्या नावाखाली महिलांना मंदिरात प्रवेश नाकारून महिलांवर किती काळ धार्मिक अन्याय करणार?
– रवींद्र जांभळे, मीरा रोड
महिलांमध्ये चैतन्य आले आहे
शनिशिंगणापूर मंदिराच्या गाभा-यात पुरुषांना प्रवेश बंदच आहे. पूर्वी तो खुला होता. पुरुषांना प्रवेश बंदी कुणी केली हेसुद्धा पुढे यायला हवे. महिला स्पृश्य-अस्पृश्य हा प्रश्न येथे येत नाही. पुरुष-महिला देवाच्या दारात समान आहेत. शनिदेवाचे मंदिर उघडय़ावर आहे. चौथ-यावर देवाची शिळा आहे. कडुलिंबाचे बाजूला झाड आहे. पण झाडाची सावली शिळेवर पडत नाही. अनेक वर्षे मी स्वत: आणि माझे सहकारी शनी अमावस्या, सोमवती अमावस्या आणि मासिक अमावस्येला जात होतो. तेव्हा थंड पाण्याने स्नान करून भगवे वस्त्र परिधान करून ओल्या अंगाने पूजा करण्याची रूढी-परंपरा होती. त्यात बदल झाले. विश्वस्त मंडळानेच या रूढी-परंपरा थांबवल्या. तेथील भौगोलिक रचनेत बदल केले. पुरुष-महिला देवाला दोघंही समान आहेत. मंदिरात प्रवेशाच्या नावाखाली आम्ही आमच्या धर्माची बदनामी करतो आहोत, याचे भान राहिलेले नाही. हा प्रश्न मंदिर व्यवस्थापनाच्या हातून केव्हाच निसटला आहे. महिलांना चौथ-यावर जाऊन पूजा-अभिषेक करू दिला तर पुरुषांना पण द्यावा. महिलांना पूजा अर्चा करण्यास मनाई का होती? यावर संशोधन व्हावे. त्यातून खरे रूप समोर येईल. ज्या महिलेने चौथ-यावर जाऊन पूजा केली तिची भूमिका समाजापुढे आली नाही. तिला शनिदेवानीच तशी आज्ञा तर केली नाही ना? तिच्या कृपेने महिलांमध्ये चैतन्य आले, हक्कांची जाणीव झाली. ‘त्या’ महिलेने चौथ-यावर अनवधानाने प्रवेश केला की जाणीवपूर्वक याचा शोध कोण घेणार? महिलांनी रणशिंग फुंकले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश, हाजी अली दग्र्यात मुस्लीम महिलांना प्रवेश एकूणच ‘व्यर्ज’ असलेल्या सर्वच ठिकाणी महिलांना प्रवेश अशी त्यांची मागणी रास्त आहे. पण येथे प्रवेश का बंद होतो, तेही जाहीर झाले पाहिजे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात महिलांची ‘पुजारी’ म्हणून झालेली नेमणूक पुरुषांनी मान्य केलीच ना? पुरुष-महिला असा भेदभाव न करता शासनानेच आता हा धार्मिक तिढा सोडवावा.
– महादेव गोळवसकर, घाटकोपर
महिलांनाही समान वागणूक हवी
सध्या राज्यात शनिशिंगणापूर मंदिराच्या गाभा-यात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी महिला संघटनांनी तीव्र लढा सुरू केला आहे. तसेच नाशिक येथे त्र्यंबकेश्वर मंदिरातही महिलांना प्रवेश हवा अशी मागणी होऊ लागली. मुंबईतील हाजी अली दग्र्यात मुस्लीम महिलांनी आवाज उठवला आहे. आजच्या घडीला प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असताना त्यांना मंदिराबाबत दुजाभाव का? परंपरा-रूढी हे कारण नाही. पंढरपुरात आता महिलांची पुजारी म्हणून निवड झाली असताना त्याच महिलांना दुस-या मंदिरात प्रवेशबंदी म्हणजे अन्यायच आहे. उलट महिलांना समान वागणूक आणि मान द्यायला हवा.
– सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी
विचारमंथनाची गरज
पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी-परंपरा आजही तशाच चालू आहेत. त्यात महिलांमध्येच मंदिर प्रवेशाबाबत एकमत दिसून येत नाही. एकीकडे आपण स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो आणि महिलांना मंदिरात प्रवेश नाकारतो हे न पटण्यासारखे आहे. आपण समस्त मानव जातीने हे नियम बनवले आहेत. देवाने किंवा कोणत्याही धर्मग्रंथाने याबाबतीत महिलांना प्रवेश नको, असे कुठेही म्हटले नाही. हा प्रश्न चर्चेद्वारे आपण सोडवू शकतो. त्या तेथील देवस्थानचा इतिहास, पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा कुठेही खंडित करण्यास आपणच तयार नाही. महिलांना समान वागणूकही नक्कीच मिळायला हवी. ही सर्वच पुरुषांची जबाबदारी आहे. या बाबतीत नक्कीच सकारात्मक विचार करायला हवा. जुन्या परंपरागत चालत आलेल्या रूढी-परंपरा बदलण्यासाठी विचारमंथनाची गरज आहे.
– गणेश राऊत, काळाचौकी
स्त्रीयांनाही पुरुषांइतकाच समान दर्जा मिळाला पाहिजे
आपल्या समाजाने पुरातन काळापासून देवी-देवतांची मनोभावे पूजा केली आहे. ज्या स्त्रीची देवी म्हणून पूजा अर्चा केली आहे, त्याच स्त्रीला केवळ परंपरा आणि रूढी याचे कारण देत काही ठिकाणी पूजेसाठी प्रवेश नाकारणे म्हणजे पुरुष संस्कृतीला खतपाणी घालण्यासारखे आहे. महिला आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. पोलीस खाते, सेना, शैक्षणिक, सामाजिक, खेळ वा सांस्कृतिक असो सर्वच क्षेत्रात त्यांनी कर्तव्य सिद्ध केले आहे. केवळ पुरुषप्रधान संस्कृती, कर्मठ आणि बुरसट विचारसरणी, अनिष्ट प्रथा यामुळे समाजाच्या विविध घटकांत स्त्रीयांनाही पुरुषांइतकाच समान दर्जा मिळाला पाहिजे. ज्या ठिकाणी महिलांना मंदिरात प्रवेश बंदी आहे त्या ठिकाणी आज २१व्या शतकात महिलांना प्रवेश मिळाल्यास हे पाऊल स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने नक्कीच सकारात्मक ठरेल. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात महिला भटजींची नेमणूक होत आहे, तर काही मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही. हा कोणता न्याय?
– पुष्पा ढवळे, नवीन पनवेल
लक्ष्मणरेषा ओलांडूनच धाडस करावे लागणार
शनिशिंगणापूर असो, त्र्यंबकेश्वर असो किंवा मुंबईतील हाजी अली दर्गा असो. प्रत्येक मंदिरात महिलांना प्रवेश मिळायलाच हवा. ‘मूर्तीपर्यंत थेट जाता येत नाही, चौथ-यापर्यंत जाता येत नाही’ या पुरातन बंधनाना आता झुगारलेच पाहिजे. शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या नव्या विश्वस्तांमध्ये दोन महिलांची नियुक्ती झाली आहे. त्यातील अनिता शेटे देवस्थानच्या अध्यक्षा आहेत. देवस्थानच्या परंपरा पाळल्याच पाहिजेत, असे म्हणणा-या या महिला परंपरावादीच आहेत. महिलांनी प्रवेश केल्यास शनीचा कोप होईल, अशी भीती घातली जात आहे. महिलांनी जरूर धर्म पाळावा. त्यानंतरच देवळात जावे या वृत्तीला कोणीच बंधन घालणार नाही. हे आपले आपल्यालाच सांभाळायचे आहे. महिलांची मासिक पाळी हीच विश्वस्तांची पोटदुखी आहे आणि म्हणूनच मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जातो. महिलांना प्रवेशबंदी हे काही नवे नाही. त्या विरोधात आता जनजागृती होत आहे. लक्ष्मणरेषा ओलांडून हे धाडस महिलांनी बंदी उठवायलाच हवी.
– अनिता दाभोळकर, कांदिवली
स्त्री-पुरुष समानतेच्या काळात बदल हवेत
शनिशिंगणापूर येथे शनी महाराजांच्या मंदिर चौथ-यावर महिलांना प्रवेश बंदी, त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश बंदी, मुंबईतील हाजी अली दग्र्यात मुस्लीम महिलांना प्रवेश बंदी जी होत आहे त्याबाबत आता जनजागृती होताना दिसतेय. मंदिरात महिलांना प्रवेश नाकारण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या सध्याच्या काळात हे आता बदलले पाहिजे, अशी विचारसरणी पुढे येत आहे. रूढी आणि परंपरा पाळूनच महिलासुद्धा पारंपरिक पद्धतीने वागतातच. मासिक पाळीच्या काळात महिला आपणहूनच दूर राहतात. कारण ते त्यांच्या मनालाही पटणारे नाही. त्यामुळे महिलांच्या हक्काचे रक्षण करण्याची जबाबदारी शासनाने घेणे गरजेचे आहे.
– अनंत दाभोळकर, अंधेरी
देवाच्या दारात कसली असमानता?
२१व्या शतकातही महिलांना दुजाभाव मिळणे लज्जास्पद गोष्ट आहे. मंदिरात प्रवेश करणे हा प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्या श्रद्धेच्या आड येणे म्हणजे भक्तीचा अपमान केल्यासारखे आहे. देवासाठी फक्त भक्त हा भक्त असतो. देवाच्या दारात स्त्री-पुरुष असा काही भेदभाव नसतो. मग शनिशिंगणापूरमध्ये महिलांना प्रवेश नाकारणे म्हणजे देवाचा अपमान केल्यासारखे आहे. त्यामुळे महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी आणखी तीव्र आंदोलन करण्याची गरज आहे.
– नंदकिशोर कांबळे, बोरिवली
महिलांच्या श्रद्धेवर आडकाठी
मंदिरात महिलांना प्रवेश द्यायलाच हवा. प्रवेश बंदीमुळे महिलांवर जो अन्याय होत आहे तो दूर करण्यासाठी महिलांनी पुढे यावे. त्यांना त्यांचा हक्क मिळायलाच पाहिजे. तसेच महिलांना प्रवेश बंदी करणा-या विश्वस्तांविरोधात कारवाई झालीच पाहिजे. आपले न्याय-हक्क मिळवण्यासाठी महिलांनी रस्त्यावर उतरावे, तीव्र आंदोलने छेडावीत. त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. अंधश्रद्धेने जखडून ठेवलेल्या या प्रथांना मोडून काढण्याची गरज आहे.
– लक्ष्मी जाधव, लालबाग
‘ई-मेल’द्वारा आलेली पत्रे..
महिलांना मंदिरात प्रवेशबंदी नसावी
आजच्या युगात महिला आकाशाला गवसणी घालत आहेत. नवनवीन संशोधन करत आहेत. मुख्य म्हणजे घरची जबाबदारी सांभाळून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती सगळ्या क्षेत्रात अग्रेसर ठरत आहे. एवढे सारे असताना विज्ञानयुगात त्याच महिलेला अपवित्र समजून मंदिरात प्रवेश नाकारणे हे दुर्दैव म्हणावे लागेल. महिला-पुरुष असा भेदभाव करणे घटनेतील समानतेच्या तत्त्वाविरुद्ध आहे. नव्या आणि बदलत्या वातावरणात तसेच भारतीय घटनेनेही समानतेचे तत्त्व मान्य केले असल्याने महिला आणि पुरुष यांच्यात भेदभाव करणे योग्य नाही. मुळात महिलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्याचा कुणालाही अधिकार नाही. पुरुषप्रधान संस्कृती, धार्मिक गोष्टींचा पगडा आणि या सगळ्यांबाबत महिलांची मवाळ भूमिका यामुळे महिला अशा ठिकाणांपासून दूरच राहतात. मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाकारणे हा सामाजिक विषय असल्यामुळे तो सामंजस्याने अर्थात प्रबोधनानेच सोडवला पाहिजे. जिथे जिथे पुरुष प्रवेश करू शकतो, तिथे तिथे कायद्याने आणि नतिकदृष्टय़ा महिलांनाही प्रवेश दिलाच पाहिजे.
– विवेक तवटे, कळवा
स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि न्याय हाच आपला धर्म
महिलांनी अशिक्षित राहावं ही प्रथा म्हणून जर सावित्रीबाई फुले घरी बसल्या असत्या तर? त्यांनी महिलांविरोधात होणा-या प्रत्येक अन्यायाविरोधात वाघिणीसारखी डरकाळी फोडली नसती तर? जर शनी मंदिरात प्रवेश बंदी ही एक प्रथा आहे आणि हा परंपरेचा प्रश्न आहे? तर महिलांनी शिक्षण घेऊ नये, ही पण कधी काळी प्रथाच होती? महिलांचे कार्यक्षेत्र फक्त ‘चूल आणि मूल’ इतकेच असावे ही पण प्रथा होती. महिलांना बोलण्याचा, मत मांडण्याचा, आपला जीवनसाथी निवडण्याचा असा कोणताच अधिकार नव्हता. रूढी-परंपरा या थोतांड कथांमध्ये तिला गुंतवून ठेवण्यात आले. सती प्रथेच्या अनिष्ट रूढी-परंपरेत ती होरपळत गेली. ही सर्व बंधने पाळणे या एकेकाळी प्रथा होत्या. पण या सर्व प्रथांना मोडीत काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानामध्ये तरतूद करून पुरुषांप्रमाणे महिलांनाही समान हक्क आणि अधिकार दिले आहेत. जर हे अधिकार दिले नसते तर कोणत्याही महिलेने वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप उमटवली नसती. सावित्रीबाईंच्या चरित्र्यातून प्रेरणा घेणं सोडून आपण धर्म, रूढी-परंपरांबद्दल वार्ता करणे कितपत योग्य आहे? जर २१व्या शतकातही महिलांविरोधात रूढी-परंपरा रुजू आहेत, तर आपण पुरोगामी असल्याचा आव आणणे हे चुकीचे आहे. शनी मंदिर शुद्ध करण्यासाठी दुधाचा अभिषेक करण्यात आला. आता ज्यांनी हे मंदिर पवित्र करून घेतले ते सांगू शकतील का, की ते दूध कोणत्या पुिल्लगी प्राणीमात्राचे होते? आणि पवित्र करणारे हे पुजारी ९ महिने एका महिलेच्या गर्भाशयातच वाढले आहेत. मग त्यांनाही अपवित्रच मानावे लागेल. केरळमधील प्रसिद्ध सबरीमला मंदिरात महिलेला मासिक पाळी आल्यामुळे प्रवेश निषिद्ध केला. हे जग देवानेच बनवले असा जर विश्वास आहे, तर महिलेलाही त्यानेच बनवले आणि तिच्यात मूल जन्माला घालण्याची क्षमता आणि त्याचाच एक भाग असलेली मासिक पाळी हीसुद्धा देवानेच दिली आहे. तिच्या हाताने बनवलेले सारे काही चालते तर ‘ती’ मंदिरात का नाही चालत? स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि न्याय हाच धर्म आपला आहे. देवाला ‘हे’ चालत नाही, त्याला ‘ते’ चालत नाही, असे म्हणणा-यांना काय देवानेच जबाबदारी दिली आहे का? आता गरज आहे ती स्वत:मध्ये देव शोधण्याची, महापुरुषांनी लावलेली रोपे नभापर्यंत पोहोचण्याची. त्यांच्या प्रगत विचारात अजून भर घालून ती पुढे आणायची.
– भक्ती लोखंडे, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ
महिलांबरोबर पुरुषांनाही प्रवेश बंद करा
शनििशगणापूर येथे महिलांना चौथ-यावर प्रवेश नसल्यामुळे जो वाद निर्माण झाला आहे तो चुकीचा आहे. काशी येथे महिला-पुरुष दोघांनाही ठरावीक अंतराच्या आत येण्यास बंदी आहे. इतर अनेक ठिकाणी महिला-पुरुषांना बंदी आहे. त्याबाबत महिला आंदोलन करत नाही. शनििशगणापूर येथे महिला-पुरुष या दोघांनाही चौथ-यावर जाण्यास बंदी करावी. म्हणजे महिलांचे तर समाधान होईलच, परंतु देवाचे पावित्र्यसुद्धा राखले जाईल. महिलांचे आपल्या धर्मावर आणि देवांवर श्रद्धा असेल तर अशा वादावर आंदोलन करून इतर धर्मीयांना तसेच आपल्या धर्मातील नास्तिकांना टीका करण्याची संधी देऊ नये.
– दिलीप गडकरी, कर्जत
युवा पिढीने पुढाकार घ्यावा
महिलांना शनिशिंगणापूर मंदिरात प्रवेश नाकारणे चुकीचे आहे. परंपरा-रूढींमुळे असे होत असेल तर या जुन्या रूढी-परंपरा खोडून काढायला हव्यात. जशा सती प्रथा, हुंडा प्रथा बंद झाल्या तशाच या सर्व अंधश्रद्धा बंद झाल्या पाहिजेत. हिंदू संस्कृती पुरुष आणि महिला असा भेदभाव करत नाही. युवा पिढीने सर्व गोष्टींची जबाबदारी घेत काही जुन्या चालीरीती बंद करायला सुरुवात केली पाहिजे.
– एक वाचक
रूढी-परंपरेनुसार नियम पाळणे गरजेचे
महाराष्ट्राला संतांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. आज कित्येक धार्मिक कथा, ग्रंथ लिहिले गेले आहेत. पण महिला वर्गाने याचे कधी मनापासून मनन, श्रवण करण्याचा प्रयत्न केला का? कधी धार्मिक गोष्टी आचरणात आणल्या का? ज्या साधू, संत मंडळींनी देवाबद्दल ज्या धार्मिक रूढी बनवल्या आहेत त्या काय अंधश्रद्धा आहेत का? आज जरी महिला वर्ग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात कार्यरत असल्या तरी देवधर्माच्या बाबतीत असे पाऊल उचलणे चुकीचे आहे. त्यापेक्षा महिलांनी इतर महत्त्वाच्या मुद्दय़ांकडे लक्ष द्यावे. भरदिवसा महिला-मुलींवर बलात्कार होतात, विनयभंग-अत्याचार होतात त्यासाठी महिला वर्गाने आवाज उठवायला हवा. जनजागृती करायला हवी, आंदोलन करायला हवे. पूर्वापार चालत आलेल्या रूढी-परंपरेचा अवमान करू नये. यामुळे राजकीय मंडळींना मात्र फायदा होत आहे. अशा गोष्टींना प्रोत्साहन आणि ताकद राजकीय पुढारीच देऊ शकतात.
– राजेंद्र सावंत, टिटवाळा
महिलांना सर्वच मंदिरात प्रवेश मिळायला हवा
एकीकडे आजच्या आधुनिक काळात विज्ञानाने प्रचंड झेप घेतली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कर्मकांडाचा फोलपणा उघड होत आहे आणि अशावेळी दुसरीकडे शनििशगणापूरसारख्या मंदिरात चौथ-यावर महिलांना प्रवेश द्यायचा की नाही यावरून वादंग उठला आहे. मुळात असा विचार करणे म्हणजे प्रतिगामी मानसिकतेचे लक्षण आहे. महिला-पुरुष समानतेच्या काळात महिला कांकणभरही पुरुषांच्या मागे नाहीत. अवकाशात गेलेली अंतराळवीर कल्पना चावला हे त्याचे मूíतमंत उदाहरण आहे. मंदिर म्हणजे खरे तर भक्तांचे श्रद्धास्थान. परंतु आजकाल तिथे श्रद्धेचा बाजार मांडला जातो. मासिक पाळीमध्ये महिलांना प्रवेशबंदी, पुरुषांनी धोतर किंवा सोवळे नेसल्याशिवाय गाभा-यात प्रवेश करू नये, मांसाहार केलेल्यांनी, मांसाहारी लोकांनी गाभा-यात प्रवेश करू नये, दलित लोकांनी, इतर धर्मियांनी मंदिरात प्रवेश करू नये असे अनेक नियम बनवून आपल्या देवस्थानाचे महत्त्व वाढवायचे आणि अधिकाधिक भक्तांना आकर्षति करायचे. मंदिर हे एक पवित्र स्थान आहे. या ठिकाणी येणा-या प्रत्येक भाविकाला मग तो पुरुष असो वा महिला त्याची जात, धर्म न पाहता, रूढी-परंपरांचा बागुलबुवा उभा न करता त्याला देवदर्शनासाठी प्रवेश मिळायलाच पाहिजे. महिलांना कोणत्याही अटीविना कोणत्याही मंदिरात अगदी सहजतेने प्रवेश मिळायलाच हवा. स्त्री-पुरुष समानतेसाठी आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी त्याची आत्यंतिक गरज आहे.
– प्रदीप मोरे, अंधेरी
मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणे आजच्या युगातील दुर्दैवी बाब
महिलांनी शिक्षण घेऊ नये, ही एकेकाळी प्रथा होती. महिलांचे कार्यक्षेत्र फक्त ‘चूल आणि मूल’ इतकेच असावे ही पण प्रथा होती. महिलांना बोलण्याचा, मत मांडण्याचा, आपला जीवनसाथी निवडण्याचा असा कोणताच अधिकार नव्हता. रूढी-परंपरा या थोतांड कथांमध्ये तिला गुंतवून ठेवण्यात आले. सती प्रथेच्या अनिष्ट रूढी-परंपरेत ती होरपळत गेली. ही सर्व बंधने पाळणे या एकेकाळी प्रथा होत्या. आजच्या २१व्या शतकात महिलांना कोणत्याही मंदिरात प्रवेश नाकारणे हे चुकीचे असल्याचे मत वाचकांनी व्यक्त केले आहे.
आजच्या युगातील ही दुर्दैवी बाब
शनिशिंगणापूर मंदिराच्या गाभा-यात महिलांना प्रवेश मिळण्याबाबत वाद चांगलाच प्रसिद्ध होत आहे. या शतकातली ही दुर्दैवी घटना. स्त्री-पुरुष समानतेचे वारे पाश्चात्त्य देशाकडून वाहत आले. ते इथल्या धर्ममरतडांनी व सनातन्यांच्या कानात शिवलेच नाहीत. इतक्या वर्षानी देखील या समानतेचा अंगिकार इथे न व्हावा हे त्या शनिमहाराजालाही पडलेले कोडेच म्हणावे लागेल! आमच्याकडे कायद्याने सर्वकाही कागदावर मिळालेय, पण प्रत्यक्षात समानता, जातीयता या बाबींना धार्मिक कुंपनात अडकवून ठेवले आहे. या सर्व बाबी मनकी बातने संकुचित करून त्याचा न संपणारा साठा शनिशिंगणापूर जशा मंदिराच्या रूपाने साक्षात उभा असलेला पाहतोय.
– उत्तम भंडारे, चेंबूर
महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे म्हणजे अंधश्रद्धाच
शनिदेवाची स्त्रीच्या गर्भावर विपरीत परिणाम करण्याची ताकद असल्याने त्याच्या चौथ-यावर महिलांनी जाऊ नये, अशी भीती दाखवण्यात आली आहे. याला प्रखर विरोध करत नकळत का होईना, त्या मुलीने शनिदेवाचं चौथ-यावर जाऊन दर्शन घेतले. त्या मुलीच्या धाडसाला माझा सलाम! भारतातील धर्मव्यवस्थेने संस्कृती आणि प्रथा-परंपरांच्या नावाखाली महिलांना दुय्यम वागणूक दिली असून अंधश्रद्धा आणि कर्मकांडात दुय्यम वागणूक दिली असून अंधश्रद्धा आणि कर्मकांडात जखडून ठेवले आहे. अनेक मंदिरामध्ये त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली. रजस्वला स्त्रीने कोणत्याच मंदिरात जाता कामा नये, मासिक पाळीमध्ये स्त्री अपवित्र असते हे त्यांच्या मनावर एवढे ठसवले आहे की, महिला स्वत:च या चार दिवसात मंदिरात जात नाहीत व आपल्या घरामध्येसुद्धा देवाचा दिवाबत्ती लावत नाही. तसे पाहिले तर महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी व आत्ताचे नरेंद्र दाभोळकर यांनी जे कार्य (आचार-विचार) केले. ते आपण का करत नाही. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून का चालत नाही.
– मनोहर झाजम, टिटवाळा
महिलांसाठी स्वतंत्र शनिमंदिर बांधावे
राज्यकर्त्यांना जनतेच्या मूलभूत समस्या सोडविण्यामध्ये अपयश आल्यामुळे असे प्रश्न निर्माण करून सर्वसामान्य जनतेचे लक्ष त्या प्रश्नांकडे वळविले जात आहे. महिलाच काय पुरुषांनीही शनिची उपासना करताना ती विचारपूर्वक करायला हवी. त्यातूनही महिलांना शनिशिंगणापूरला जाऊन शनिची उपासना करायची तीव्र इच्छाच असेल तर शनिशिंगणापूरमध्ये फक्त महिलांसाठीच स्वतंत्र शनिमंदिर बांधावे आणि त्या मंदिरात पुरुषांना प्रवेश दिला जाऊ नये. म्हणजे वाद त्वरित आणि कायमस्वरूपी मिटेल.
– विवेक जुवेकर, मुलुंड
महिलांना मंदिरात प्रवेश देणे योग्य
महिलांनी शनिशिंगणापूरच्या चौथ-यावर चढून दर्शन घेण्याचा प्रश्न सध्या पेटला असून त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले आहेत. भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी शनिशिंगणापूर मंदिराच्या गाभा-यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून जे आंदोलन सुरू केले आहे, त्याला प्रथमदर्शनी तरी राजकीय वास येत आहे. त्यातच नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरातही महिलांना प्रवेश मिळावा, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. तर मुंबईतील हाजीअली दग्र्यातही मुस्लीम महिलांना प्रवेश मिळावा यासाठी मुस्लीम महिलाही आवाज उठवत आहेत. राज्यातील स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, हुंडा प्रथा, स्त्रीशिक्षण आणि अनेक राजकीय व सामाजिक हक्क स्त्रियांना मिळावेत म्हणून सतत प्रयत्नशील असणा-या समाजसुधारकांना महिलांना मंदिरात प्रवेश देण्याविषयी याची जाणीव कशी झाली नाही! प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असताना त्यांना मंदिरात प्रवेश नाकारणे म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या समानतेच्या तत्त्वाशी विसंगत आहे. ही बाब सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे मंदिराच्या विश्वस्तांनी आणि आंदोलनकर्त्यांनी परंपरा, रूढी यांना तिलांजली देऊन महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग सुकर केला पाहिजे. अन्यथा त्याचे पडसाद देशभर उमटल्याशिवाय राहणार नाहीत.
– मधुकर कुबल, बोरिवली
पुरुषांनीच विचार करायला हवा
स्त्री-पुरूष ही निसर्गनिर्मित दोन रूपे आहेत. भेद असेल तर तो फक्त शारीरिक. स्त्रिया या पुरुषांइतक्याच सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. केवळ पुरुषांची कार्यक्षेत्र म्हणून जी पूर्वी ओळखली जायची तीसुद्धा स्त्रियांनी आता यशस्वीपणे सांभाळून आपण कुठेही कमी नाही म्हणून दाखवून दिले आहे. मग ते राजकारण असो, विज्ञान असो व शिक्षण क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. आमच्या हिंदू धर्माचे पवित्र ग्रंथ ज्यांनी नेहमीच देवींचा सन्मान केला आहे. आपल्या वर्षभरातील मुख्य सण मग तो गणेशोत्सव असो ज्या ठिकाणी गौरीपूजन केले जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. दस-याला सरस्वतीपूजन केले जाते. हिंदू धर्मातील ज्या काही परंपरा आहेत. ती जगात नावाजली जाते. ती टिकून राहावी यात काहीच शंका नाही. पण मंदिरात प्रवेश व पूजा करण्यास महिलांना नाकारणे ही भूमिका योग्य नाही. त्यामुळे महिलांना समान वागणूक देणे ही निश्चितपणे पुरुषांची जबाबदारी आहे.
– प्रमोद कुंडाजी कडू, पनवेल
मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणे चुकीची भूमिका
महात्मा जोतिबांच्या आधीचा प्रदीर्घ २०० वर्षाचा स्त्रियांसाठीचा भीषण काळ सोडला तर वैदिक व उत्तर वैदिक काळातील तसेच भारताच्या इतिहासाची पृष्ठे स्त्रियांच्या श्रेष्ठत्व व कर्तृत्वाने आणि गौरवांनी भरलेली आहे. प्रत्यक्ष त्या भीषण काळातनंतर स्त्रिया स्वकर्तृत्वाने युद्ध, अंतराळ, संशोधन, खेळ, कला, सामाजिक व राजकीय क्षेत्रात पहिल्या क्रमांकाच्या (पायोनीयर) ठरताहेत, परंतु आपल्या देशात धर्मसत्ता नसली तरी लोक माणसांवरील पुरुषीसत्ता कायम आहे. पंढरपूर येथील ‘विठ्ठल-रखुमाई’ मंदिरात महिलांची नेमणूक होत असताना महिलांना अन्य काही धार्मिक स्थळे व मंदिरात प्रवेशबंदी करून दुजाभाव केला जात आहे. आख्यायिकांच्या आधारे मंदिर विश्वस्थांनी दिलेले कारणे ही न पटण्यासारखी आहेत. प्रतिगामी, विषमतावादी व बुरसटलेले विचार सोडून, या समस्याचा विचार भारतीय संस्कृती व ऐतिहासिक पार्श्वभूमीवर व्हायला पाहिजे, समाजाची मानसिकता बदलायला पाहिजेत.
– सी. के. बावस्कर, परळ
महिलांना समान हक्क दिला पाहिजे
आपल्या भारत देशाच्या काही घटक राज्यात अनेक मंदिरामध्ये विषमतेला, लिंगभेदाला खतपाणी घालणा-या प्रथा आजही सुरू आहेत. शनिशिंगणापूरच्या चौथ-यावरील स्त्री प्रवेश बंदीचा विरोध ऐरणीवर सुरू झाल्यामुळे दक्षिण मुंबईतील वरळीच्या समुद्रात हाजीअली शहा बुखारी यांचा दर्गा असून मुस्लीम महिलांना प्रवेश मिळावा त्यासाठी संघर्ष चालू आहे. या मंदिरात महिलांना बंदी ही जुनाट परंपरेनुसार असली तरी आज पुरुषांप्रमाणे महिलांचीही भक्ती मनापासून देवता, देवी, ग्रहांमध्ये आहे. मग महिलांना मंदिरात का प्रवेश नाही. या संदर्भात धार्मिकरित्या भक्तांना न्याय देणारे अभ्यासू वरिष्ठ ज्योतिष शास्त्रज्ञ जे आहेत, त्याच्याबरोबर देशाच्या राज्य शासनाने समतेने चर्चा घडून आणली पाहिजे. त्यातून योग्य निर्णय मंदिरात प्रवेश नसेल तर वरील मंदिरात निदान मूर्तीला हात न लावता त्या मंदिरात महिलांना पूजाअर्चा करण्यासाठी हक्क दिला पाहिजे.
– प्रवीण पाटील, भोईवाडा
मनुवाद्यांची उलटी पावले..!
आज संगणक युगात जग विज्ञानाने भरा-या मारत असताना, काही परंपरावादी.. सनातनी लोकांना भारताला पाठीमागे नेण्यात धन्यता वाटत आहे! सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने असताना काही ठिकाणी स्त्रियांना प्रवेश नाकारणे ही धार्मिक अस्पृश्यता आहे. त्याचा निषेधच व्हायला हवा.. जिजाऊ, सावित्रीबाई, ते मदर तेरेसा या हयात नसलेल्या आणि आजच्या काळातील रणरागिणींच्या नुसत्या नावाने आपला ऊर अभिमानाने भरून येतो. अगदी मंदिरातही काली, चंडिका, महालक्ष्मी अशा देवता चालतात, मग आत्ताच्या महिलांनी काय घोडं मारलंय? महिलांना दुय्यम स्थान ही मनुस्मृतीतील वृत्ती झाली आणि आपला देश कोणत्या धर्मग्रंथावर नाही तर संविधानावर चालतो. याचं भान संबंधितांनी ठेवायला हवं! महिलांना समान वागणूक मिळणं हा त्यांचा हक्क आहे.
– संदेश बालगुडे, घाटकोपर
धार्मिक बंदी अयोग्य
स्त्री-पुरुष समानता भारतीय राज्य घटनेनुसार अभिप्रेत आहे. त्यामुळे महिलांना मंदिरात प्रवेश नाकारून स्त्री-पुरुष यामध्ये तफावत निर्माण करण्यास ऊत येण्यासारखे आहे. राज्यातील कोणताही कायदा घटनेचे उल्लंघन करणारा नाही. मग मंदिर, दर्गा अथवा चर्च विश्वस्त कोणत्या कायद्यान्वये महिलांना प्रवेशबंदी करू शकतात. मंदिर, दर्गा, अथवा चर्च यामधील प्रवेश हाच मुळी प्रत्येकाच्या जीवनातील श्रद्धेचा भाग आहे. एवढेच नव्हे तर आता सर्व व्यावसायिक पेशांमध्ये महिला-पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. त्यामुळे मंदिरात, चर्च, दर्गा यामध्ये प्रवेशासाठी महिलांना बंदी घालणे घटनेनुसार बेकायदेशीर आहे. त्यामुळे महिलांना धार्मिक श्रद्धास्थानी बंदी योग्य नव्हे. ज्याप्रमाणे विधान मंडळ व महापालिकेत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले त्याप्रमाणे आता लोकसभा/ विधानसभेतही द्यावे. तसेच सर्व विश्वस्त संस्था, सहकारी संस्थांमध्येही द्यावे म्हणजे सदर प्रकरणी योग्य तोडगा आपोआप निघेल.
– भगवान कोरगांवकर, मुंबई
सर्वाना समान हक्क
शनिदेवाच्या चौथ-यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना बंदी असताना मात्र इतिहासात पहिल्यांदाच एका महिलाने चौथा-यावर जाऊन दर्शन घेतले आणि परंपरा मोडली म्हणून गोंधळ घालण्यात आला. खरे तर महिलांना देवस्थानात बंदी घालणे चुकीचे आहे. राज्य घटनेने सर्वाना समान अधिकार दिला आहे. राज्य घटना नसती तर स्त्रियांच्या आरक्षणालाही विरोधच झाला असता. अपवित्र समजून महिलांना धार्मिक विधीतून वगळणे म्हणजे मनुष्यालाच अपवित्र ठरवणे होय. इथे परंपरा होती मान्य आहे, परंतु, काळानुरूप बदल हा व्हायला हवा. नव्या शतकातल्या मुली, मग त्या कुठल्याही धर्मातल्या असोत. त्या कालबाह्य गोष्टी सुरू ठेवायला नकारच देणार. शनिदेवाच्या मंदिरात ‘पूजे’चा अधिकार प्रत्येक स्त्री-पुरुषाला दिला आहे. पण यात स्त्रियांना काही अंतरावर ठेवलेय. आपण कुठल्या पुराणकालीन मतांना चिकटून बसलो आहोत. महिला सैन्यात, पोलिसात, वैज्ञानिक, संशोधन, तंत्रज्ञान क्षेत्रातच अगदी सर्व क्षेत्रात पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. महिलांना न्याय्य अधिकारांसाठी आता देवस्थानच्या मंडळींनी शनिदेवाच्या भोवतीचे हे बंदीचे कडे तोडून ‘पूजे’चा अधिकार प्रत्येक महिलांना मिळावा आणि आपल्या देवस्थानचा लैकिक वाढवावा.
– कमलाकर जाधव, बोरिवली
महिला भक्तांचा अपमान आहे
परमेश्वराला भेटण्याची इच्छा असेल तर बसल्या जागीही त्याचे दर्शन घेता येते. अशी अनेक उदाहणे आपण नाटक-सिनेमांतून आणि भक्तिगीतांतून पाहिली व ऐकली आहेत. जसे, संत तुकारामांना नेण्यासाठी देवाने विमान पाठवले. भक्तीत शक्ती आहे. भक्तीचा महिमा अपरंपार आहे. देवदर्शनासाठी खांद्यावर भगवे निशाण घेऊन टाळ-मृदंगाच्या तालावर नाचत हजारो मैल पायी प्रवास करून पंढरपूर आदी क्षेत्री पोहोचतात. त्यांची भक्ती त्यांना शक्ती देते. मात्र, मंदिर प्रवेश नाकारणा-या पुजा-यांना व मंदिर व्यवस्थापकांना हीच शक्ती भगवंत देवो हीच प्रभूचरणी प्रार्थना. शनिशिंगणापूर मंदिराच्या गाभा-यात महिलांना विनाशर्थ प्रवेश मिळायला हवा. मंदिर असो वा दर्गा-मस्जीद महिलांना प्रवेश हवाच. रूढी, परंपरा देवाने निर्माण केल्या नसून त्या मानवाने निर्माण केल्या आहेत. बंधने घालून महिला भक्तांना अपमानित करू नका.
– आनंदराव खराडे, विक्रोळी
‘ई-मेल’द्वारा आलेली पत्रे..
महिलांना मंदिरात मज्जाव ?
आपल्याकडील कुटुंबव्यवस्था बहुतांशी पुरुषप्रधान राहिली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात महिलांचा शिरकाव काही अहंकारी पुरुषांच्या पचनी पडत नाही. परंपरा, रूढी अजूनपर्यंत ज्या कारणामुळे आपल्यापर्यंत आल्या याचे सबळ, सत्य वा असत्य किती व कसे याची पडताळणी कधी जाहीरपणे झाल्याची उदाहरणे ऐकिवात नाहीत. शिवाय हल्ली ब-याच स्त्रिया श्री गणेशाची, श्री सत्यनारायणाची पूजा-कथा सांगतात, त्यांचा प्रयत्नही स्तुत्य मानायला हवा. याच धर्तीवर पंढरपूर मंदिरात महिला भटजींची नेमणूक झालेली आहे. जाणकारांना अनुभवानंतर त्यांच्या पूजे-अर्चेत काही वावगे वाटल्यास स्पष्टीकरण करण्यास हरकत नसावी. पुरुषाप्रमाणेच महिला भाविकांनाही दर्शनाची ओढ असतेच. त्यामुळे त्यांना मज्जाव का असावा? किंबहुना महिलांना देवाप्रती अधिकच विश्वास असतो. धर्माला शारीरिक शास्त्रीय कारण स्पष्ट झालेले आहे. त्यात शुद्ध अशुद्धता किती याचाही ऊहापोह झालेला आहे.
– नरेश नाकती, बोरिवली
स्त्रीला माणूस म्हणून जगू द्या
शनिशिंगणापूर येथील चौथ-यावर महिलांनी दर्शन घेतले. या विषयावरून उगाचच राईचा पर्वत केला जात आहे. पूर्वी मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना बाजूला बसवले जात होते. आज मात्र स्त्रिया तेवढे पाळताना दिसत नाहीत. या काळात स्त्रियांनी सर्व कामे केलेली घरच्यांना चालतात, पण देवाचे दर्शन घ्यायचे नाही, हा अन्याय महिलांनी का सहन करायचा? घरातील एकही पुरुष या काळात ‘मी घरची कामे करतो’ असे म्हणत नाही. मासिक पाळीने स्त्रीला मातृत्व मिळते, तिचे मातृत्व मंगल आहे, तर मासिक पाळी अमंगल कशी होऊ शकते. स्त्रीची इच्छा असेल, तर तिने देवाचे दर्शन घ्यावे किंवा घेऊ नये, हा निर्णय तिचा तिला घेऊ द्या. आपण २१व्या शतकात वावरत आहोत, असे अभिमानाने सांगणारे आपणच लिंगभेद, जातीयवाद यासारखी अंधश्रद्धेची झापडे डोळ्यावर बांधून आहोत. एकीकडे स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या आणि महिलांना देवळाच्या गाभा-यात प्रवेश बंदी करायची, हा न्याय योग्य नव्हे.
– दादासाहेब येंधे, काळाचौकी
मंदिर प्रवेशाचा हट्टाहास कशासाठी
गेल्या काही दिवसांपासून शनिशिंगणापूरच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळावा म्हणून अनेक आंदोलने जोर धरत आहेत. परंतु मंदिरात प्रवेश मिळाल्याने सारे प्रश्न सुटणार आहेत का? पिढय़ान् पिढय़ा चालत आलेल्या परंपरा मोडणे योग्य नाही. आंदोलने फक्त प्रसिद्धीसाठीच केली जात आहेत. प्रसिद्धी मिळण्याकरताच समाजात काही व्यक्ती व संघटनांचे कार्य सुरू आहे. महिलांसमोर अनेक समस्या व अडचणी असताना त्यांचे निराकरण न करता फक्त प्रसिद्धी व स्वार्थासाठी हा सर्व खेळ चालू आहे.
– कन्हैया नलगोंडा, मानपाडा
नैसर्गिक कारणांचा विचार करावा
निसर्गाने प्रत्येकालाच काही बंधने घातली आहेत, ती बंधने नाकारण्याचा प्रयत्न समाजाकडून होत आहे. जोपर्यंत आपण धार्मिक विषमता दूर करत नाही, तोपर्यंत आपण स्त्री-पुरुष ही सामाजिक विषमता दूर करू शकणार नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत स्त्रियांवर काही देवस्थानात प्रवेश नाकारण्यात येतो, यामागचा नैसर्गिक विचार स्त्रियांनी करावा. जेणेकरून देवस्थानात का बंधने घालण्यात आली आहेत हे लक्षात येईल.
– सुरेंद्र देवस्थळी, गिरगाव
धार्मिक नियमावलीची पुनर्रचना करावी
धार्मिक स्थळांचा व्यवहार ज्या धार्मिक घटनेने बनवली गेली आहेत, त्यांच्यानुसार चालत असल्याने तेथील नियमांची कारणे सद्य:स्थितीहून वेगळी आहेत. सर्व परिस्थितीचा धर्माचार्याकडून अभ्यास करवून घेऊन सरकारने मंदिर प्रवेशाबाबत कालसुसंगत अशी नवी घटना बनवावी, अन्यथा सध्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणा-या महिलांवर अशा अर्धवट चुकीच्या नियमांची अंमलबजावणी हा घोर अन्याय ठरेल. नव्या घटनेच्या निर्मितीसाठी पुरुषांनीही प्रयत्न करावे व तिची काटेकोर अंमलबजावणी धर्मादाय आयुक्तांमार्फत करण्यात यावी.
– डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम
धोक्याच्या ठिकाणी सहली काढू नये, राज्य सरकारच्या भूमिकेची अंमलबजावणी होईल का?
मुरूडच्या समुद्रकिना-यावर सहलीसाठी गेलेल्या पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सरकार जागे झाले असून धोक्याच्या ठिकाणी सहली काढू नये, असे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकामध्ये २७ नियम बनवण्यात आले असून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून या नियमांची अंमलबजावणी होईल असे वाटते का? पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी बनवलेल्या या नियमांची अंमलबजावणी राज्याच्या सर्व शहरांमध्ये व्हायला हवी का? परिपत्रकातील नियम योग्य वाटतात का? या नियमामुळे सहलीबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असणा-या आनंदावर विरझण पडेल असे वाटते का? नियम न पाळणा-या शाळांविरोधात काय कारवाई करायला हवी? धोक्याच्या ठिकाणी सहली घेऊन जाऊ नये याबाबत पालकांनी काय भूमिका घ्यावी?
याबद्दल वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.
प्रहार कार्यालय,
वन इंडियाबुल्स सेंटर, नववा मजला,
ज्युपिटर मिल्स कंपाउंड, लोअर परळ, मुंबई – ४०००१३,
फॅक्स : ०२२-६१२३९९००. ०२२- ६१२३९९६६
शब्दमर्यादा : १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.
‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन
आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.
ऑनलाइन पत्र लिहा vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत करा www.prahaar.in