वसई-विरार महापालिकेत राज्य सरकारने स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू केला असला, तरी व्यापा-यांना विश्वासात घेऊनच प्रारंभी इतर भागापेक्षा कमी दराची व्यापारी वस्तूंवर आकारणी केली होती.
वसई- वसई-विरार महापालिकेत राज्य सरकारने स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू केला असला, तरी व्यापा-यांना विश्वासात घेऊनच प्रारंभी इतर भागापेक्षा कमी दराची व्यापारी वस्तूंवर आकारणी केली होती. आज जरी व्यापा-यांना ‘एलबीटी’ जाचक वाटत असला तरीही राज्य सरकारने निर्णय घेतल्यास आम्ही वसई-विरार महापालिकेचा एलबीटी त्वरित बंद करू, असे सांगत आमदार व नालासोपारा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी व्यापा-यांना दिलासा दिला. व्यापा-यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी पालिका सभागृह नेते उमेश नाईक उपस्थित होते.
आमदार ठाकूर यांनी सुरुवातीला व्यापा-यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी विविध प्रश्नांवर व्यापा-यांशी संवाद साधला. इतर महापालिकांच्या तुलनेत वसई-विरार पालिकेचा स्थानिक संस्था कर दर सर्वात कमी आहे. राज्यात अनेक पालिकांनी या कराला विरोध केला आहे. बविआचे नेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडेही अनेक व्यापारी व उद्योग संघटनांनी या कराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही आमच्या इतर समस्या बाजूला ठेवतो, पण स्थानिक संस्था कर हटवण्याचे तेवढे बघा, असे या व्यापा-यांचे म्हणणे होते. सरकारही या कराबाबत फेरविचार करण्यासाठी पुरेसे गंभीर आहे.
निवडणुका सुरू असल्याने नजीकच्या काळात याबाबतचा ठोस निर्णय होईल, असेही ठाकूर म्हणाले. नागरी समस्यांची चर्चाही या वेळी व्यापा-यांनी केली. पालिका लवकरच शहरात रस्त्यावर होणारी फेरीवाल्यांची गर्दी लक्षात घेऊन फेरीवाला झोन तयार करणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना यापूर्वीच पालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात नालासोपारा पूर्वेकडील तुळींज परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही. यासाठी पालिका उपाययोजना करील. पुढील काही महिन्यांत वीज व्यवस्था सुधारण्यात येईल तसेच पाणीपुरवठय़ात अनेक पाटींनी वाढ होईल, अशी माहितीही ठाकूर यांनी दिली. या वेळी उद्योजक प्रवीण विरा, बाबूसिंह राजपुरोहित, दीपूभाई केनिया, किशन राजपूत, रमेश भाई, प्रकाश भाई आदी व्यापारी उपस्थित होते.
बहुजन विकास आघाडीला अनेकांचा पाठिंबा
पालघर जिल्ह्यात पिढय़ान्पिढय़ा स्थायिक असलेले व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन स्थायिक झालेले अठरापगड जातीतील समाजघटकांना त्यांचे सामाजिक प्रश्न सोडवून, विविध मागण्यांची तड लावून न्याय देण्याचे काम हितेंद्र ठाकूर यांनी आजतागायत केले आहे. एरव्ही रोटी-बेटी व्यवहारासाठी एकत्र येणारा हा समाजघटक शिक्षण, रोजगार, उद्योगात आता प्रगती करत आहे. ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार, मालेगाव या उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या समाजघटकांपैकी खान्देशी समाजघटकाने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर व त्यांच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती खान्देश मित्रमंडळाचे संघटक कैलास भदाणे यांनी दिली.