नाटक व चित्रपट ही करमणुकीची वेगवेगळी माध्यमं आहेत. नाटकाच्या सादरीकरणाला प्रयोग आणि चित्रपटाच्या सादरीकरणाला आपण ढोबळमानाने खेळ म्हणतो. काही वेळा चित्रपटाची कथा ही नाटकावर बेतलेली असते. तिचं चित्रपटात जर पूर्णपणे रूपांतरण झालं नाही तर आपल्यासमोर एक वेगळाच खेळ रंगतो. केदारच्या चित्रपटाचाही असाच एक खेळ झाला आहे. एक जमेची बाजू म्हणजे भरत जाधवच्या अभिनयामुळे त्याचा खेळखंडोबा मात्र झालेला नाही.
चित्रपटातल्या एखाद्या पात्राच्या अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेल्या अनेक चित्रपटांची निर्मिती आजवर जगभरात झाली असेल. कधी कधी चित्रपटातली एखादी छोटी भूमिकाही इतकी प्रभावी असते की, चकित होऊन पाहत राहावं. अभिनयाचे असे देखणे आविष्कार भारतीय प्रेक्षकांनीही अनेक चित्रपटांतून पाहिलेले आहेत. आपल्या अभिनय ताकदीचा प्रत्यय देणारे अनेक चांगले नट मराठी चित्रपटसृष्टीलाही लाभले आहेत. तरीही केवळ अभिनेत्याला आपल्या अभिनयाचे रंग दाखवायला मिळावेत यासाठी एखाद्या चित्रपटाची निर्मिती होणं, ही बाब काहीशी दुर्मीळच. असाच एक दुर्मीळ योग दिग्दर्शक केदार शिंदेने जुळवून आणलाय. अभिनेता अर्थातच त्याचा आणि सगळयांचा आवडता भरत जाधव.
‘श्रीमंत दामोदरपंत’ या काही वर्षापूर्वी गाजलेल्या आणि भरत जाधवचीच भूमिका असलेल्या नाटकाचं चित्रपट रूपांतर ‘श्रीमंत दामोदरपंत’ याच नावाने झालं आहे. मूळ नाटक रंगमंचीय चौकटीबाहेर आणून जरी घडवलं गेलं असलं तरी त्यातलं ‘नाटय़’ तसंच ठेवण्यात आलं आहे. मुळात ही कथा चित्रपटाच्या माध्यमातून आणणं हेच मोठं धाडस आहे. केदार शिंदेने ते आव्हान पेललं आहे. अर्थात, काही विषय हे एखाद्या माध्यमासाठी इतके चपखल असतात की, त्यांच्या माध्यमांतराने क्षणिक करमणूक होत असली तरी ते विलक्षण अनुभव देण्यात ते तोकडे ठरतात.
‘श्रीमंत दामोदरपंत’ यांच्या जुन्या वाडय़ात चित्रपटाची कथा घडते. दामोदरपंत स्वातंत्र्यलढयात सशस्त्र क्रांतीशी संबंधित असतात. पुढे स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपलं बस्तान मुंबईत बसवलेलं असतं. तिथे त्यांनी बांधलेल्या मोठया वाडयाचं रूपांतर आता चाळीत झालं. या चाळीत त्यांचा मुलगा गणपत (विजय चव्हाण) आपल्या मुलाबाळांबरोबर राहत असतो. या चाळीत अनेक भाडेकरू राहत आहेत. ते सारेच या कुटुंबाशी एकरूप झालेले आहेत. गणपत यांना दोन मुलं आणि एक मुलगी. दररोज संध्याकाळी सहा वाजता यातल्या लहान मुलाच्या अंगात दामोदरपंत येतात. त्यांना त्यावेळी त्यांच्या काळानुरूप वातावरण लागत असतं. गणपत सगळयांचं चाळक-यांच्या मदतीने दररोज त्यांच्यासमोर हा एक खेळ खेळत असतात. पुढे त्यांची मुलगी सुमन हिचं लग्न ठरतं. मात्र दामोदरपंतांच्या काळापासून त्यांचा शत्रू असलेला लखोबा (सुनील बर्वे) यांचा नातू नागेश (सुनील बर्वे) हा एक वेगळाच खेळ खेळतो. काय असतो तो खेळ, या वाडयातलं काय नेमकं रहस्य दडलेलं असतं, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला चित्रपटाच्या शेवटी मिळतात.
चित्रपटाची कथा सगळयांना ठाऊक असलेली तरीही ती वेगळय़ा पद्धतीने सादर करण्यात केदार यशस्वी झाला आहे. मात्र या कथानकातलं नाटय नाटयगृहातल्या वातावरणात अंगावर येतं किंवा एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातं तसं चित्रपटात होताना दिसत नाही. चित्रपटाला प्रत्येक गोष्टीचा एक कार्यकारणभाव द्यावा लागतो. चित्रपटात प्रेक्षकांना फिल देणं नाटकापेक्षा अवघड असतं. त्यामुळे नाटकात प्रभावी ठरलेले काही काही प्रसंग चित्रपटात अगदीच हास्यास्पद होऊन जातात. त्यातही काही प्रसंगात आधुनिक तंत्राच्या वापराने थोडी फार मजा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, मात्र तोही तात्पुरता वाटतो.
हा चित्रपट केवळ भरत जाधवच्या अभिनयासाठी लक्षात राहतो. प्रमुख भूमिकेत भरत जाधव ते सगळं करतो, ज्यासाठी प्रेक्षक त्याचे चित्रपट पाहायला जातात. एक अभिनेता म्हणून त्याची सर्वोत्कृष्टता प्रत्येक प्रसंगागणिक अधिकाधिक सिद्ध होत राहते. काही वेळा त्याच्या अभिनयाचं जबरदस्त असं वर्णन करावं लागतं. इतर कलाकारांनीही आपल्यावरची जबाबदारी चोख बजावली आहे. विजय चव्हाण यांनी आपल्या भूमिकेचे अनेक पदर समर्थपणे दाखवले आहेत. अलका कुबलही आपल्या भूमिकेत छाप पाडतात. या चित्रपटातून निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत याने पदार्पण केलं आहे. त्याला अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. हा चित्रपट म्हणजे नाटकाचा एक खेळ म्हणून पाहावा. त्यातून आनंद घ्यावा आणि तो विसरून जावा असाच आहे.