दिवसरात्र सुरू असलेल्या ‘काव्यहोत्र’मध्ये वेगवेगळ्या भाषेचे, भावभावनांचे, जगण्याचे काव्यरंग भरणे सुरू असतानाच; या महोत्सवात दुस-या दिवशीचा मध्यान्ह मराठी गझलांनी गाजवला.
पणजी- दिवसरात्र सुरू असलेल्या ‘काव्यहोत्र’मध्ये वेगवेगळ्या भाषेचे, भावभावनांचे, जगण्याचे काव्यरंग भरणे सुरू असतानाच; या महोत्सवात दुस-या दिवशीचा मध्यान्ह मराठी गझलांनी गाजवला. पणजीत पावसाच्या सरींवर सरी कोसळत असतानाच गोवा कला अकादमीत काव्यधारा बरसत होत्या.
गुरुवारी या काव्यमैफलीची सुरुवात झाल्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या जाणिवांच्या काव्यकलाकृतींचे सादरीकरण गोवा कला अकादमीत सुरू झाले. शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस या काव्य महोत्सवात सहभागी झालेल्या कवींना गोव्यातल्या गारठय़ाची ऊब देणारा ठरला. अशा चिंब वातावरणातच गझलेतील नाजूकतेच्या सौंदर्याने कविवर्य सुरेश भटांना याद करायला लावले.
‘गझल तुझी माझी’त प्रशांत वैद्य, शर्वरी मुनेश्वर, संचिता कारखानिस, हेमंत राजाराम, गोविंद नाईक यांच्या दाद मागणा-या गझलांना अरुण म्हात्रे यांनी आपल्या खास शैलीपूर्ण सूत्रसंचालनाचा साज चढवून शृंगारित केले.
वेगवेगळ्या भावभावनांची उकल करणा-या या मैफलीत सुरेश भटांच्याही काही रचना सादर करून, त्यांना मानाचा मुजरा केला. त्यानंतर सुरेशकुमार वैराळकर यांच्या नेतृत्वात प्रमोद खराडे, नचिकेत जोग, संचित शेवळे, कौस्तुभ आठल्ये आदींनी दुसरी गझल मैफल यादगार ठरवली.
दिवसरात्र सुरू असलेल्या या काव्यहोत्रात मराठीसह पंजाबी, मनिपुरी, काश्मिरी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषक कवींनी आपल्या कवितेतून वेगवेगळे विषय सादर केले. काश्मीरमधील पुराची अंगावर शहारे आणणारी रफिक मसुदी यांची कविता असो की मनिपुरी कवयित्रीने शानबाग यांच्यावर केलेली कविता असो; वेगवेगळ्या जाणिवांच्या कविता या महोत्सवाचे वैविध्य अधोरेखित करणा-या ठरत आहेत.
ही तर काव्यक्रांती : गज्वी
‘होत्र’ या शब्दाचा अर्थ हा ‘आहुती’ असा आहे आणि कवितेची आहुती देता येत नाही. ‘काव्यहोत्र’ऐवजी काव्यक्रांती असे या राष्ट्रीय काव्य महोत्सवाचे नाव असायला हवे होते. कारण कला अकादमी सलग ४८ तासांच्या काव्य सादरीकरणाचा उपक्रम राबवत आहे. ही एक क्रांतीच आहे, असे मत ज्येष्ठ नाटककार, काव्यकार प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले.
गुरुवारी मध्यरात्री १२ ते ३ या सत्रातील कविसंमेलनात त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. संमेलनात त्यांनी ‘मास्टरमाईंड’ ही कविता सादर केली. या संमेलनाचे सूत्रसंचालन मंगेश बनसोड यांनी करून, रात्री उशिरा रंगलेल्या या काव्यजागरला जागतेपणाची झालर चढवली.
त्यात साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार विजेते कवी विरा राठोड, प्रा. श्यामल गरूड, अनिता सावंत, छाया कोरेगावकर, कविता मोरवणकर, छाया भोरजारे, लोकनाथ यशवंत, नरेंद्र गावकर, काशीनाथ वेलदोडे, भगवान निळे, सांध्य, प्रदीप सरवदे, पांडुरंग ठाकरे, अजय दाणी, प्रदीप जाधव, नारायण लाडे आदींनी अनेकांनी या मैफलीत रंग भरले.