दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, मुख्य बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाचा रखडलेला प्रश्न, पार्किंगसाठी अपुरी जागा, नियम धाब्यावर बसवून रस्त्यालगत थाटली जाणारी दुकाने आदींमुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आह़े.
चिपळूण – शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, मुख्य बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाचा रखडलेला प्रश्न, पार्किंगसाठी अपुरी जागा, नियम धाब्यावर बसवून रस्त्यालगत थाटली जाणारी दुकाने आदींमुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आह़े. पालिकेकडून पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध केली जात नसल्याने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
शहर परिसरातील नागरिकांबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामस्थांचीही शहरात विविध कामानिमित्त वर्दळ असत़े त्यातच बाजारपेठेत विविध हातगाडीवाले व फळविक्रेते राजरोसपणे रस्ता अडवून व्यवसाय करीत आहेत़ या हातगाडी व फळविक्रेत्यांवर अनेकदा पालिकेकडून कारवाई करण्यात आली. मात्र, कारवाई झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्याठिकाणी हातगाडीवाले बस्तान मांडतात. शहरात पालिकेतर्फे कुठेही दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वंतत्र अशी पार्किंगची व्यवस्था नाही. काही ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे ते पालिकेतर्फे भेदभाव न करता सरसकट हटवावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती़.
वाढीव बांधकाम हटवल्यास काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नगरसेवक संजय रेडीज यांनी मागील सभेत व्यक्त केली होती. दरम्यान, शहरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचीही दमछाक होत आह़े त्यामुळे वाहतूक पोलिसांचीही संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरातील शिवाजी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. या चौकाच्या रुंदीकरणाचा प्रश्न सोडवण्यात पालिकेला यश आलेले नाही. गेल्या निवडणुकीवेळी पालिकेने या चौकात जेसीबी आणून रुंदीकरणाचा केवळ दिखावा केला. मात्र, प्रत्यक्षात चौकाचे रुंदीकरण झालेलेच नाही. फिरते हातगाडीवाले आणि व्यापा-यांनी गटारावर थाटलेली दुकाने यामुळे वाहतुक कोंडीत भर पडली आहे. अजिंक्य आर्केड परिसरात रस्तारुंदीकरण झाले. मात्र, त्याठिकाणी पुन्हा फळविक्रेते बसू लागले. नो पार्किंगच्या जागी गाडय़ा उभ्या केल्या जातात. पालिकेसमोर, मधु फार्मसीसमोर आणि जुना बसस्थानक परिसरातही फळविक्रेते, भाजीवाले यांनी रस्ता अडवला आहे.
मध्यंतरी पोलिसांनी बाजारपेठेमध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पांढरे पट्टे आखले आणि एकदिवसाआड पार्किंगची व्यवस्था केली. मात्र, सद्यस्थितीत हे नियमदेखील पाळले जात नाहीत. त्यावरील पोलिसांचे नियंत्रणही सुटले आहे. नगर पालिका आणि पोलिस यांच्यामार्फत शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात काढणे सहजशक्य आहे. मात्र त्यासाठी संयुक्त नियोजन केले जावे, अशी मागणी होत आहे.