देशातील सर्वाधिक महागाईचा मोठा फटका गरिबांना बसत आहे. त्यांचा आवाज तुम्ही ऐकला पाहिजे.
हैदराबाद- देशातील सर्वाधिक महागाईचा मोठा फटका गरिबांना बसत आहे. त्यांचा आवाज तुम्ही ऐकला पाहिजे. गुंतवणूक वाढवण्यासाठी केवळ व्याजदरात कपात ही एकमेव उपाययोजना नाही, अशा कडक शब्दांत रिझर्व्ह बँकेच्या माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी आपल्या माजी संस्थेला सुनावले.
८व्या बी. एल. महेश्वरी स्मृती व्याख्यानमालेत ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया : आव्हान आणि संधी’ या विषयावर बोलताना सुब्बाराव म्हणाले की, महागाईचा मोठा फटका गरिबांना बसत आहे. त्यातही दारिद्रय़रेषेखालील जगणा-या व्यक्तींची अवस्था दयनीय आहे. पतधोरणापूर्वी रिझव्र्ह बँक कायम मोठमोठया उद्योगपतींना बोलवते. पण देशातील ५० गरिबांना बोलवत नाही, अशा शब्दांत त्यांनी केंद्रीय बँकेला फटकारले.
देशातील गरिबांना रिझव्र्ह बँक म्हणजे काय हे माहिती नाही. समजा त्यांना माहिती असली तरीही व्याजदर व बाजारातील किंमत यांचा परस्परसंबंध त्यांना कळत नाही. माझ्या मते रिझव्र्ह बँक ही मोठी संस्था आहे. तुम्ही मागास व्यक्तींचा आवाज ऐकला पाहिजे. कारण या व्यक्तींना त्यांचा आवाज नसतो. त्यांचा आवाज सर्वापर्यंत पोहोचला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
सुब्बाराव म्हणाले की, २००८ ते २०१३ या काळात मी रिझव्र्ह बॅँकेचा गव्हर्नर होतो. प्रत्येक पतधोरणापूर्वी आमची उद्योगपती, बॅँका, आर्थिक संस्था, वित्त क्षेत्र, अर्थतज्ज्ञांची बैठक होते. ते आपापली मते जोरजोराने मांडतात. मात्र, गरीबांचा आवाज कधीच ऐकू येत नाही.
माझ्या कारकीर्दीत २५ उद्योगपतींशी बैठक होती. त्यांनी माझ्याकडे व्याजदर कपातीचा धोशा लावला होता. मी त्यांना केवळ एकच प्रश्न विचारला, तुमच्यापैकी किती जण तीन महिन्यात गुंतवणुकीचे निर्णय घेतील ? त्यावेळी एकानेही हात वर केला नाही. त्यांचे वागणे चुकीचे होते असे मला म्हणायचे नाही. मात्र, गुंतवणुकीसाठी व्याजदर कपात होणे आवश्यक नसते. कारण अनेक अडथळ्यांमुळे गुंतवणूक होत नाही, असे सुब्बाराव यांनी सांगितले.
भारतासारखी परिस्थिती अमेरिकेतही
भारतासारखीच परिस्थिती अमेरिकेत आहे. याबाबत अमेरिकेचे उदाहरण देताना सुब्बाराव म्हणाले की, अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हचे प्रमुख अॅलन ग्रीनस्पॅन होते. त्यांना अमेरिकन खासदारांकडून व्याजदर कपातीसाठी आठवडयातून दोन वेळा पत्रे येत होती. मात्र, व्याजदर वाढवण्यासाठी एकही पत्र त्यांना येत नव्हते. कारण महागाई वाढत होती. गरीबांना महागाईचा फटका बसत असतानाही त्यांचे कोणीही ऐकत नाही, असे त्यांनी सांगितले.
रिझव्र्ह बॅँक ही देशाची मध्यवर्ती बॅँक आहे. भारत हा गरीबांचा देश आहे. त्यामुळे मध्यवर्ती बॅँकेने त्यांचे महत्व कायम लक्षात ठेवले पाहिजे. आपण कायम मौनात राहणा-या गरीबांविषयी संवेदनशील राहिले पाहिजे, असे सुब्बाराव यांनी स्पष्ट केले.