गिरणी कामगारांसाठी म्हाडाद्वारे मार्च महिन्यात २६०० घरांची सोडत निघणार आहे, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गुरुवारी सांगितले.
मुंबई – गिरणी कामगारांसाठी म्हाडाद्वारे मार्च महिन्यात २६०० घरांची सोडत निघणार आहे, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गुरुवारी सांगितले. गुरुवारी पत्रकार संघाच्या दुस-या वर्धापन दिन कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
[poll id=”1275″]
२२५ चौरस फुटांचे घर सोडतीत उपलब्ध झाले असून कुर्ला, विद्याविहार, सायन येथील घरांसाठी ही सोडत निघणार आहे. त्याचबरोबर एनडीए सरकारने गिरणी कामगारांसाठी काही धोरण निश्चित केले होते. या धोरणाअंतर्गत एमएमआरडीएद्वारे बांधण्यात येणा-या घरांपैकी ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्यात येणार होती. या धोरणामुळे सर्व गिरणी कामगारांचा प्रश्न सुटणार होता. परंतु भाजपा सरकारने या धोरणाची अंमलबजावणी केली नाही. त्याचबरोबर त्यांचे काही नवीन धोरणही बनवले नाही, अशी विचारणा गिरणी कामगार संघर्ष समितीचे प्रवीण घाग यांनी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नायगाव, वरळी, ना. म. जोशी मार्ग व शिवडी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडा नोडल एजन्सीचे काम पाहणार आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातील सर्व अडथळे दूर झाले असून येत्या महिनाभरात याबाबत सकारात्मक अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल. त्याचबरोबर बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी घोषित केले होते. पंरतु घोषणेला पंधरा दिवसही उलटले नाहीत तोपर्यंत राज्य सरकारने आपला शब्द फिरवला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
म्हाडा फक्त नोडल एजन्सीचे काम पाहील, बांधकामासाठी राष्ट्रीय पातळीवरच्या विकासकांना पाचारण करण्यात येणार असल्याचे त्यांनी
यावेळी सांगितले.
बांधकामासाठी लागणा-या नियम, अटींची पूर्तता म्हाडा नोडल एजन्सी म्हणून करणार आहे, असे मेहता पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले. बीडीडी चाळवासीयांना पुनर्विकासासाठी म्हाडाला तीव्र विरोध दर्शवला असतानाही राज्य सरकारने म्हाडाला नोडल एजन्सीचे काम करण्याची परवानगी दिली. एकूण २०७ इमारतींमधून १६ हजार ४०० घरांच्या पुनर्विकासासाठी म्हाडा नोडल एजन्सीचे काम पाहणार आहे.