पठाणकोट हवाई दलाच्या तळावरील हल्ला ताजा असतानाच गुजरातच्या कच्छ भागातून भारतात दहा दहशतवादी घुसल्याचे वृत्त गुप्तचर विभागाने दिले आहे.
नवी दिल्ली/अहमदाबाद – पठाणकोट हवाई दलाच्या तळावरील हल्ला ताजा असतानाच गुजरातच्या कच्छ भागातून भारतात दहा दहशतवादी घुसल्याचे वृत्त गुप्तचर विभागाने दिले आहे. त्यामुळे गुजरातसह दिल्ली व काश्मिरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातमध्ये एनएसजीच्या तुकडय़ा तैनात केल्या असून ठिकठिकाणी गस्त वाढवली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त घातपाताची शक्यता लक्षात घेऊन गुजरात, जम्मू-काश्मीरमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला. सुरक्षा दलांनी गुजरातमधील महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा वाढवली आहे. विशेष म्हणजे जगप्रसिद्ध सोमनाथ मंदिराबाहेर एनएसजी पथक तैनात केले आहे. या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर गीर-सोमनाथ जिल्हा प्रशासनाने सोमनाथ मंदिरात होणारा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केला आहे. तसेच गुजरातमध्ये सागरी मार्गाने दहशतवादी येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या कच्छ जिल्ह्यातील वरनोरा गावात पोलीस अधीक्षक मकरंद चौहान यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. भूजमधील अनेक हॉटेल्सवर छापे मारले जात आहेत.
गुजरातचे पोलीस महासंचालक पी. सी. ठाकूर यांनी गांधीनगर येथे एनएसजीच्या अधिका-यांशी चर्चा करून सोमनाथ मंदिरात एक तुकडी पाठवली आहे. गुजरातमध्ये एनएसजीच्या चार तुकडय़ा आल्या आहेत. प्रत्येक तुकडीत ५० ते ९० कमांडो आहेत.
दरम्यान, कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या २४ तासांत उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल पाठवण्यात आला. त्यामुळे या विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. हा ईमेल विमानतळाच्या व्यवस्थापकाच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आला. हा ईमेल जर्मनीतून पाठवल्याचा दावा करण्यात येत आहे.
दिल्ली पोलिसांना शहरात घातपाताची शक्यता असल्याचा इशारा मिळाल्यानंतर शहरातील महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा वाढवली आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मदचे दहा दहशतवादी गुजरातमार्गे भारतात घुसले आहेत. दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांचे विशेष पथक व गुन्हे अन्वेषण विभागाला या हल्ल्याबाबत स्वतंत्र इशारा मिळाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे शहरावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. शहरात पोलिसांनी आपली गस्त वाढवली आहे.
जम्मू-काश्मिरात अतिदक्षतेचा इशारा
देशात दहशतवादी हल्ल्याचे संकेत मिळाल्यानंतर जम्मू-काश्मिरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आरएस पुरा विभागात पाकिस्तानातून भारतात येण्यासाठी बोगदा खणण्यात आल्याचे दोन दिवसांपूर्वी उघड झाले. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक के. राजेंद्र कुमार यांनी सांगितले.