गोंद्या ऊर्फ गोयंद्या बांवकर हा राजू बांवकराचा धाकटा भाऊ! नुकतंच त्याचं लग्न झालं होतं. पण काही कारणाने त्याने लग्नानंतरची सत्यनारायणाची महापूजा घातली नव्हती. काही कारणाने म्हणण्यापेक्षा मुंबईला राहात असलेले त्याचे दोन्ही चुलते आणि त्यांचे कुटुंब गणपतीला येत असल्याने त्यांनीच गोयंद्याला गणपतीला पूजा धर असं सांगितलं. गोयंद्या चुलत्यांच्या शब्दाबाहेर नव्हता. त्यामुळे तो चार महिने थांबायला तयार झाला. पण गोयंद्याने लग्नानंतर सत्यनारायण घातला नाही म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला नको जीव करून सोडलं होतं.
लग्न झाल्यावर जेव्हा त्याने गणपतीला पूजा घालणार असं नानू मालवणकर, राजा पारकर, सुरज, विशा वगैरेंना सांगितलं तेव्हा सुरज त्याला म्हणाला होता,
‘गोयंद्या, चुलत्याचा आयकान तू चार म्हयने पूजा फुडे ढकलतंस. पन त्येची फळा तुका भोगाक लागतली हय़ां तुका म्हायती हा?’
‘हय़ां बग सुरज, पूजा आता घातली काय किंवा नंतर घातली काय. देव काय रागवत नाय. देवाक सगळा समाजता.’ गोयंद्याच्या या बोलण्यावर सुरज, विशा, नानू वगैरे जोरजोरात हसायला लागले. पण ते का हसतात हे गोयंद्याला नेमकं कळत नव्हतं.
‘तुमका हसाक काय झाला?’ गोयंद्या आणखीनच गोंधळून गेला.
‘अरे, हसा नूको तर काय करू? मांयझया, तू म्हंतस देवाक सगळा समाजता. पन तुका काय समाजना नाय त्येका आमी काय करायचा?’
‘म्हंजे? तुमका नेमका काय म्हणाचा हा ता काय माज्या लक्षात येना नाय.’
‘तुज्या कदीच लक्षात येवचा नाय. लक्षात इला आसता तर चुलत्यांच्या नादाक लागलं नसतंस. माका याक सांग, लग्नानंतर सत्यनारायण घातल्याशिवाय बायकोच्या जवळ जाता येत नाय हय़ां तुका म्हायती हा?’
‘ता सांगाची माका गरज नाय. आनी तसा म्हणशील तर माजो माज्यार तेवढो संयम आसा.’ गोयंद्या ठामपणे म्हणाला. पण गोयंद्याच्या बोलण्यावर त्याच्या मित्रांचा मात्र अजिबात विश्वास बसला नाही. नानूने तर स्पष्टपणे बोलूनही दाखवलं. तो म्हणाला,
‘आता आगीजवळ लोन्याचो गोळो गेलो की तो आपोआप इताळता.’ पण नानूला तोडीस तोड उत्तर देताना गोयंद्या म्हणाला,
‘नानू, तुज्या म्हायतीसाठी सांगतंय. मी म्हंजे लोन्याचो गोळो न्हय. आता आगीजवळ गेल्यार सगळेच वस्तू तापतत. पन माका आगीत टाकलंस आनी मी तापान लालभडक झालंय तरी मी इतळूचंय नाय. कारण मी लोखंडाचो गोळो आसय.’ गोयंद्याचा स्वत:वरील आत्मविश्वास त्याच्या चेह-यावरही दिसत होता. त्याचा तो आत्मविश्वास बघून थोडा वेळ त्याचा खास मित्र नानूलाही बरं वाटलं. तो म्हणाला,
‘तसा आसात तर तुका खरोखरच मानाक व्हया. नायतर मायझंयो दत्त्या! बायको एक दिवस जरी माहेराक गेली तरी तो तिच्या पाठसून जाता.’
‘पाठसून म्हंजे नक्की कसो?’ नानूने अडाणी प्रश्न केला. यावर सुरज म्हणाला,
‘पाठसून म्हंजे सासरवाडीपर्यंत बायकोच्या पाठसून. आनी सासरवाडीक गेल्यार घराच्या मागच्या दारापाठसून. कळला?’ नानूने खोचकपणे मान हलवली.
एकंदर सर्व मित्र गोयंद्याची चेष्टा-मस्करी करत असले तरी गोयंद्याने दोन महिने चांगलाच ‘संयम’ ठेवला होता हे त्याच्या घरातून न समजलेल्या बातमीनुसार निश्चित होतं. पण परवा एक तारखेला गोयंद्याच्या बायकोला झालेल्या कोरडय़ा उलटय़ा आणि उपआरोग्य केंद्रातल्या नर्सने केलेली तिची तपासणी या बाबी जाहीर झाल्यावर सुरज, विशा, नानू वगैरेंनी गोयंद्याला गाठलं आणि सुरजने पहिलाच प्रश्न केला,
‘काय गोयंद्या, हल्ली लोखंडाचे गोळे पन इतळाक लागले!’ या वाक्याने गोयंद्याचा चेहरा उतरला. थोडा वेळ काय बोलावं तेच त्याला कळेना.
‘मी काय म्हंतय गोयंद्या, तापलेले लोखंडाचे गोळे इताळतंत कशे?’ नानूने मागचा राग काढला. नानूच्या बोलण्यावर विशा फिसकण् हसला.
‘हय़ां बगा, तुमी समाजतास तसा कायव नाया. वगीच तोंडाक येय्त ता कायव बोला नूको. मी तुमका अगोदरच सांगितलंय की, माजो माज्यार संयम आसा.’ गोयंद्या अजूनही आपल्या मताशी ठाम होता.
‘अरे मायझंया, तू काय बोलतंस ता तुका तरी कळता काय? बरा ता जावंदे! माका सांग, लगीन झाल्यार तू काय काय केलंस?’ सुरजने त्याची उलटतपासणी चालू केली. ‘अरे, पन कायच केलंय नाय तर काय मास सांगा?’ गोयंद्या वैतागला.
‘तसा न्हय रे! येगळा काय केलंस? म्हंजे तुज्या आयुष्यात कसली घटना-बिटना घडली नाय ना?’
‘कायव घडला नाय. आमच्या घरात सगळा यवस्थित चल्ला हा. फक्त येकदा च्यायवरसून माजा बायकोशी भांडान झाला. त्या रागान कदी नाय तो पयल्यांदाच मन्याक घेव्न मी बारमध्ये गेलंय नी तीन-चार पेग मारान रातरी उशरा घराक इलंय.’
‘फुडे?’ विशाने कान टवकारले. इकडे गोयंद्याच्या बोलण्याने सगळे सावध झाले.
‘फुडे काय? जेवलंय की नाय ताव माका आठवना नाय.’ गोयंद्याने खरं ते सांगितलं. त्यामुळे सुरज खूश झाला. तो म्हणाला,
‘बरा ठीक हा. आता माका शेवटचा याकच सांग, दुस-या दिवशी सकाळी उठल्यार रातरी दारू पिव्न इलंस म्हणान बायको तुज्यार रागावली?’
‘अजिबात नाय. उलट हसत म्हणाली की, रोज नूको पन अधना-मधना कदीतरी वाय्च घेतलास तर माजा कायव म्हणना नाय.’ गोयंद्याने वेगळी घटना सांगितली आणि सुरज गोयंद्याला म्हणाला,
‘लोका म्हंतत ता आज माका पटला. दारयेमुळे बरीच कामा होतंत. पन आता झाला ता झाला. आगीजवळ लोखांड इताळला नाय हय़ां खरा! पन दारू मातर चांगली पेटली. आता तुका सत्यनारायण घालाचो तेंवा घाल. आमचा कायव म्हणना नाय. पन आमका वली पार्टी मातर पूजेच्या अगोदर दी.’