शालांत परीक्षेचा निकाल लागला. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली ही एक महत्त्वाची परीक्षा आहे. ‘जीवनाची दिशा’ ठरवायला हा एस.एस.सी टप्पा महत्त्वाचा मानला जातो. इथून पुढे मग जीवनाची शाखा ठरते. मग कुणाची विज्ञान शाखा, कुणाची कला तर कुणाची आणखी काय? वर्षानुवर्षे या परीक्षेचे महत्त्व वादातीत आहे.
पन्नास वर्षापूर्वीचा काळ असा होता की, शालांत परीक्षेच्या निकालातील पहिले १० विद्यार्थी कौतुकाला किती पात्र होते! वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर अशा गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची काळपट रंगातली छायाचित्रे, त्यांच्या मुलाखती, ती गुणवत्ता यादी ती पुढे वाढत गेली. १० ऐवजी २१ झाली, २१ नंतर १०० पर्यंत यादी छापली जावू लागली. त्या गुणवंतांच्या मुलाखतीतून प्रामुख्याने ‘मी डॉक्टर होणार’ हेच सांगणारे विद्यार्थी जास्त होते. हळूहळू ही गुणवत्ता यादी वृत्तपत्राकडे येणे बंद झाले. निकालाची उत्सुकताही कमी झाली. कारण घरोघर ‘ऑनलाईन’ सुविधेमुळे आता निकाल मिळविण्याकरिता हे विद्यार्थी कोणावर अवलंबून नाहीत. संगणकीय क्रांतीचा हा मोठा परिणाम आहे.
नेहमीप्रमाणे यावर्षीही एस.एस.सी. परीक्षेला लाखांमध्ये मुले बसली. एकूण १६ लाख ७ हजार ४११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातले १४ लाख ३४ हजार १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८९.५६ अशी आहे. नेहमीप्रमाणे विभागीय मंडळात कोकण मंडळाचा निकाल ९६.५६ टक्के लागला असून सर्वात कमी निकाल लातूरचा, ८१.५४ टक्के आहे. एक काळ असा होता की, एस.एस.सी. असो की १२ वी असो. लातूरचा झेंडा महाराष्ट्रात फडकत होता. गेल्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याने १० वी आणि १२ वी या दोन्ही परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल लावण्याचा विक्रम केला असून कोकणामधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!!
१७ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याला शुभेच्छा देताना जवळपास २ लाख विद्यार्थी नापास झालेले आहेत आणि पास झालेल्या १४ लाख ३४ हजार विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्क्यांच्या वरचे जेमतेम ३४ हजार विद्यार्थी आहेत. म्हणजे गुणवत्तेच्या स्पर्धेत या ३४ हजार विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य विरुद्ध १४ लाख उत्तीर्ण विद्यार्थी, असा असमतोल उभा होतो आहे. आजच्या स्पर्धेत जगात ९०, ९२, ९५ टक्क्यांच्या पलीकडे विद्यार्थी गुण मिळवतात आणि त्यामुळे उच्च शिक्षणाच्या सगळय़ा संधी प्रामुख्याने या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना मिळतात. यामध्ये आणखी एक फरक असा आहे की, मुंबई, पुण्याच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ९३ टक्क्यांच्या पुढे आहे आणि नागपूर, अमरावती या दोन विभागातील विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५ ते ८४ टक्के आहे. त्यापेक्षा अधिक तपशिलात गेले तर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण आणखी घसरलेले आहे. मेळघाटमध्ये तर ते ४० टक्क्यांवर आहे. त्यामुळे विभागाचा निकाल घसघशीत वाटला तरी, ग्रामीण भागातील सुविधा नसलेले जिल्हे, उत्तम शिक्षणाचा अभाव असलेले जिल्हे मार खात आहेत. या निकालात आणखी एक तपशील फार महत्त्वाचा आहे. या परीक्षेकरिता ९,५४,४९२ विद्यार्थी बसलेले आहेत आणि ७,७१,५६० विद्यार्थिनी बसलेल्या आहेत, म्हणजे मुलं आणि मुली यांच्यामध्ये दीड लाखांपेक्षा जास्त फरक आहे. दीड लाखांनी मुलींची संख्या कमी आहे पण उत्तीर्ण होण्यात मुली ८९.४८ टक्के आणि मुलं ८३.९२ याचा अर्थ असा की, दीड लाख मुलं जास्त बसून त्यांचा निकाल जवळपास ६ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या काही वर्षात ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की, गुणवत्तेमध्ये मुली आघाडीवर आहेत आणि मुलं कुठेतरी कमी पडताहेत.
या निकालाचा आणखी एक वेगळा अर्थ आहे. १२ वीचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला. १२ वीला १५ लाख विद्यार्थी बसले होते. हे १५ लाख विद्यार्थी दोन वर्षापूर्वी म्हणजे २०१४ ला १० वीचे विद्यार्थी होते. त्यावेळी दहावीला बसलेल्या मुलांची संख्या १८ लाख होती. पण बारावीला मुलं बसली १५ लाख, म्हणजे दोन वर्षापूर्वी १० वीची जी संख्या होती ती, २०१६ च्या निकालात ३ लाखांनी घटली, त्याचा दुसरा अर्थ असा की, दहावी उत्तीर्ण झालेल्या ३ लाख विद्यार्थ्यांना १२ वीपर्यंत शिक्षण घेण्यात मोठय़ा अडचणी आहेत. एकतर दहावी पास झाला किंवा नापास झाला तरी, घरच्या परिस्थितीमुळे त्या विद्यार्थ्यांना कोणता तरी उद्योगधंदा करावा लागत असला पाहिजे, म्हणून तो १२ वी पर्यंत पोहोचू शकला नाही. दहावी आणि बारावी या दोन परीक्षांमध्ये गळतीचं जे प्रमाण आहे तेच प्रमाण ग्रामीण भागात मुलींच्या बाबतीतही सुरू आहे. म्हणूनच एस.एस.सी. परीक्षेला जेव्हा ९ लाख विद्यार्थी बसतात तेव्हा त्याच परीक्षेला ७ लाख विद्यार्थिंनी बसतात म्हणजे १० वीपर्यंत २ लाख विद्यार्थिनी पोहोचू शकलेल्या नाहीत, त्या विद्यार्थिनीची गळती झालेली आहे आणि ही गळती केवळ दहावी, बारावी एवढय़ापुरती नाही. तर प्राथमिक शाळेपासून ही गळती सुरू झालेली आहे. एका पाहणीत असे दिसून आले आहे की, पहिल्या इयत्तेत १०० मुली असतील तर त्यातल्या ५० टक्के मुली सातवीपर्यंत जातात आणि सातवी ते दहावीपर्यंत ही गळती आणखी ३० टक्क्यांनी आहे. मुलींना शेती कामाकरिता वापरणे, तिचं लग्न लवकर करून देणे, मुलींनी शिकायची काय गरज आहे! असा प्रवाह असणे. अशा विविध कारणांनी वर्षानुवर्षे मुलींची गळती हा विषय कायम आहे आणि एक चिंतेचा मुद्दा आहे. या परीक्षेत जे १४ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणून सांगितले जाते, त्यातले ५० टक्के किंवा त्याच्या आसपास उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फारसे भवितव्य राहत नाही. उत्तम गणल्या गेलेल्या महाविद्यालयांत त्यांना प्रवेश नाही, त्यामुळे हे विद्यार्थी कोणत्या तरी विषयाशी तडजोड करून मिळेल ते शिक्षण घेतात. आजचे जग हे स्पर्धेचे आहे आणि गुणवत्तेचे आहे. इथून पुढे गुणवत्तेखेरीज तुम्हाला भविष्य नाही. कोणाच्या तरी शिफारसपत्रावर आता इथून पुढे नोकरी मिळेल, हे दिवस संपलेले आहेत. शिवाय केवळ नोकरीच्या मागे लागण्याऐवजी या विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्याचे वातावरण तयार केले जात नाही. खासकरून मराठी माणूस तर, शाश्वत नोकरीच्या मागे आहे. ‘८० टक्के नोक-या मराठी तरुणांना मिळाल्या पाहिजेत’, यासाठी मोर्चा निघतो पण, ‘८० टक्के उद्योग मराठी तरुणांच्या हातात राहिला पाहिजे’ यासाठी कधी मोर्चा निघाला नाही, एस.एस.सी. असेल किंवा बारावी असेल या महत्त्वाच्या दोन टप्प्यांनंतर जीवनात संघर्षात उतरणारी ही तरुण पिढी आजच्या गुणवत्ताप्रधान जगात टिकण्याकरिता केवळ घोकंपट्टीचे गाईड फारसे उपयोगी पडणार नाही. आजचे जे स्पर्धेचे जग आहे, गुणवत्तेचे जग आहे. या जगात टिकण्यासाठी गुणवत्ता आणि स्पर्धा जे करू शकतील ते जिंकतील, बाकी सारे जीवनाच्या लढाईत नापास होतील, असा या निकालाचा अर्थ आहे.