शालेय पाठयपुस्तकात एक धडा होता. एका गावात भीषण पाणीटंचाई असते. त्या गावातला एक माणूस एक दिवस तलाव खणायला बाहेर पडतो. सुरुवातीला लोक त्याला वेडय़ात काढतात, नंतर मात्र त्याच्या त्या कामात सामील होतात.
शालेय पाठयपुस्तकात एक धडा होता. एका गावात भीषण पाणीटंचाई असते. त्या गावातला एक माणूस एक दिवस तलाव खणायला बाहेर पडतो. सुरुवातीला लोक त्याला वेडय़ात काढतात, नंतर मात्र त्याच्या त्या कामात सामील होतात.
कोणाच्याही मदतीशिवाय ही माणसं मग त्या गावात तलाव खणतात व नंतर त्या गावातला पाणीप्रश्न दूर होतो. अशा प्रकारचा हा धडा होता. तो कितवीत असताना होता हे आता स्पष्टपणे आठवत नसलं तरी काहींना तो नक्कीच आठवेल. हा धडा आठवण्याचं ताजं कारण म्हणजे दिग्दर्शक केतन मेहता यांचा मांझी द माऊंटन मॅन हा चित्रपट.
या चित्रपटाची गोष्ट छोटी आहे. एक माणूस डोंगर खणून त्यातून रस्ता तयार करतो. मात्र ही गोष्टच केतन मेहता यांनी अगदी डोंगराएवढी मोठी करून आपल्यासमोर मांडली आहे. त्याला त्याच्या टीमने जी साथ दिली आहे त्याने तर हा चित्रपट आणखी एका उंचीवर गेलेला आहे.
चित्रपटाची कथा आहे, बिहारमधल्या दशरथ मांझी (नवाजुद्दीन सिद्दिकी) या माणसाची. बिहारमधल्या गया मध्ये हा एक मजूर राहात असतो. त्या गावातल्या मुखियाकडे त्याचे वडील मोलमजुरी करत असतात. त्यावेळी झालेली उधारी न फेडल्यामुळे दशरथला त्याच्याकडे काम करावं लागतं. याच गावातल्या एका मुलीवर त्याचं प्रेम असतं.
खरं तर त्यांचं लहानपणीच लग्न झालेलं असतं मात्र दशरथची परिस्थिती पाहून तिचे वडील त्यांचं लग्न करून देण्याला विरोध करतात. तो तिला पळवून नेऊन लग्न करतो. त्यानंतर त्यांचा संसार सुरू होतो. असेच एका आजारपणात त्याची पत्नी फाल्गुनी (राधिका आपटे) हिचं निधन होतं. ती आजारी असताना त्यांच्या गावासमोरच्या डोंगरामुळे तो तिला वेळेवर रुग्णालयात पोहोचवू शकत नाही, त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे ही गोष्ट दशरथच्या मनाला लागते.
तो हा डोंगर फोडून रस्ता करण्याचा निर्धार करतो. आपल्या आयुष्याची पुढची बावीस र्वष तो हा डोंगर फोडून काढतो. त्या प्रवासात त्याच्या आयुष्याचे काय काय होते. त्याला कोणाची साथ मिळते. कोणाचा विराध होतो व नंतर शेवटी काय होते ही या चित्रपटाची कथा आहे.
चित्रपटाची मांडणी जबरदस्त आहे. त्याचप्रमाणे ती बहुपेडीही आहे. केतन मेहताने जे दाखवलं आहे त्याच्याही पलीकडे जाऊन त्याला खूप काही सांगायचं आहे. गंमत म्हणजे त्याने न सांगितलेल्या गोष्टीही आपल्यापर्यंत अगदी सहज पोहोचल्या आहेत. हेच या चित्रपटाचं वैशिष्टय़ ठरावे. आतापर्यंत अनेक प्रेरणादायी चित्रपट येऊन गेले आहेत.
आजच्या काळातला मात्र हा सर्वाधिक प्रेरणादायी असा चित्रपट ठरावा. आपल्या व्हॉट्सअप व फेसबुकवर इकडची तिकडची वाक्य पाठवून सकारात्मक विचारांचा प्रसार करणा-यांसाठीही हा एक फार मोठा धडा आहे. त्यांनाही यातून खूप काही शिकायला मिळू शकतं. आपल्या देशाच्या परिस्थितीवर, सरकार व गरीब माणसांमध्ये असलेल्या विलक्षण मोठय़ा अशा दरीवरही या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.
सामान्य माणसं कोणत्या परिस्थितीतून जातात व त्यांच्यासाठी काय करायला हवं याचं भान आपल्या देशातल्या सरकार नामक यंत्रणेला नाही हे देखील यातून अधोरेखित करण्यात आलं आहे. माणसाने कोणाच्याही आशेवर न राहता त्याने स्वत:च स्वत:ची वाट शोधायला पाहिजे हा संदेश देत असताना कोणताही समाज हा एका एका व्यक्तीच्या योगदानातूनच घडत असतो हे देखील दाखवलं आहे.
केतन मेहता याने बिहारमधली एक सत्यकथा दाखवताना त्या कथेतही आढळून न आलेले अनेक पैलू आपल्या कलाकृतीतून दाखवून दिले आहेत. त्याबद्दल त्याचे आभारच मानायला हवेत. अशा प्रकारचा चित्रपट तयार करण्यासाठी तयार झालेल्या निर्मात्यांनाही सलामच करायला पाहिजे. केवळ धंदा करणा-यांकडून अशा प्रकारच्या कामाची अपेक्षा करता येत नाही.
चित्रपटात केतन मेहता याने फार काही चित्रपटांची गिमिक वापरली नसली तरी आपल्याला खिळवून ठेवण्यात तो यशस्वी झाला आहे. काही काही फ्रेम त्यातून व्यक्त होणाऱ्या भावनाही विलक्षण आहेत. सुरुवातीला डोंगर मोठा व माणूस लहान दिसत असताना हळूहळू माणूस मोठा व डोंगर लहान असल्याचं दाखवून त्याने आपल्याला जे सांगायचं आहे ते योग्य रितीने पोहोचवलेलं आहे. चित्रपटातल्या संवादांचाही विशेष उल्लेख करायला हवा.
अनेक दिवसांनंतर अशा प्रकारचे संवाद ऐकायला मिळाले आहेत. अभिनयाच्या बाबतीत सांगायचं तर नवाजुद्दीन सिद्दिकीने हा चित्रपट अक्षरश: खाऊन टाकला आहे. दशरथ मांझी उभा करताना त्याने जो अभिनय केला आहे तो कोणत्याही अभिनय शाळेत पाहायला मिळणार नाही.
त्याच्या या कामाविषयी लिहिण्यासाठी शब्दही अपुरे पडावेत. एकाच माणसाच्या आयुष्यातल्या विविध भावभावना, त्याचा स्वत:वरचा विश्वास, त्याचे ध्येय, त्याच्या तारुण्यसुलभ भावना काय काय नि काय. अशा सर्वच गोष्टी त्याने या चित्रपटातून दाखवल्या आहेत. अभिनय शिकणाऱ्या व करू इच्छिणा-यांनी हा चित्रपट एक वर्ग म्हणून पाहावा.
काहींना नक्कीच काही शिकता येईल. त्याला इतरही सर्वच कलाकारांनी अगदी चांगली साथ दिली आहे. राधिकानेही आपण एक सशक्त अभिनेत्री असल्याचे दाखवून दिले आहे. चित्रपटातल्या इतर भूमिकाही अगदी स्वाभाविक आहेत.
आपली अनेक कामे करून फावल्या वेळात, मनोरंजनासाठी, रोजच्या जीवनाच्या कटकटीतून थोडाफार रिलॅक्स होण्यासाठी चित्रपट पाहिले जात असतात. हा चित्रपट मात्र सगळी कामं सोडून अगदी आवर्जून पाहावा असा आहे. एक मोठा अनुभव प्रेक्षकांना मिळणारच हे निश्चित.