चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तीन दिवसीय भारत दौ-याला सुरुवात झाली आहे.
अहमदाबाद – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तीन दिवसीय भारत दौ-याला सुरुवात झाली आहे. बुधवारी दुपारी अहमदाबाद विमानतळावर शी जिनपिंग यांचे आगमन झाले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजशिष्टाचार बाजूला ठेवत जिनपिंग यांचे स्वागत केले.
सहसा कुठल्याही देशाचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांच्या भारत दौ-याची सुरुवात देशाची राजधानी दिल्ली किंवा आर्थिक राजधानी मुंबईतून होते. मात्र शी जिनपिंग यांच्या भारत दौ-याची सुरुवात गुजरातमधून झाली आहे. विमानतळावर उतरल्यानंतर जिनपिंग यांना मानवंदना देण्यात आली.
दोन्ही दे्शांमध्ये सीमावाद असला तरी, व्यापार, उद्योग विस्तारासंबंधी महत्वाच्या करारांवर या दौ-यात स्वाक्ष-या होणार आहेत. भारत आणि चीन आशियाखंडातील परस्परांचे स्पर्धक देश असले तरी, व्दिपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर दोन्ही नेत्यांचा भर असेल.
अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी जास्तीत जास्त चीनी गुंतवणूक भारतात होणे आवश्यक आहे. उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी उत्पादन क्षेत्रात जास्तीत जास्त चीनी गुंतवणूक आणण्य़ाचा नरेंद्र मोदींचा प्रयत्न राहील. चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. मात्र व्यापारी भागीदारीतील वाढता असमतोल ही भारतासाठी चितेंची बाब आहे. दोन्ही नेत्यांच्या चर्चेमध्ये हा महत्वाचा मुद्दा असेल.
अहमदाबादमध्ये सर्वत्र जिनपिंग आणि मोदी यांच्या स्वागताचे पोस्टर लागले आहेत. भारताने चीनबरोबर संबंध सुधारण्यावर भर दिला असला तरी, दुस-याबाजूला भारत सरकारने चीन दावा करत असलेल्या १०० कि.मी.च्या वादग्रस्त भूप्रदेशात भारतीय लष्कराला रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांचे बांधकाम करण्यावर असलेले निर्बंध शिथिल केले आहेत.