२६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर रेल्वे प्रशासनाने स्थानकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या होत्या.
मुंबई – २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर रेल्वे प्रशासनाने स्थानकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. यात प्रत्येक स्थानकात मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही, एक्स-रे बॅगज स्कॅनर आणि पोर्टेबल एक्स्पोसिव्ह डिटेक्टर इत्यादींचा समावेश होता. मात्र सध्या या सर्व यंत्रणा त्या त्या स्थानकात धूळखात पडल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासन पुन्हा एकदा सक्रिय होण्यासाठी अजून एका दहशतवादी हल्ल्याची वाट पाहणार का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
मुंबईतील प्रत्येक स्थानकात सुरक्षेसाठी म्हणून मुख्य प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. यासाठी रेल्वेने कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत. मात्र कालौघात ही यंत्रणा निकामी झाली आहे. सद्य:परिस्थितीत त्यांच्या देखरेखीसाठी मनुष्यबळही नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी सुरक्षेसाठी लावलेले मेटल डिटेक्टर प्रवाशांच्या मार्गात अडथळेच ठरत आहेत. काही स्थानकांत मेटल डिटेक्टर सुरू आहेत, मात्र येणा-या-जाणा-या प्रवाशांकडे लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक नाहीत. त्यामुळे एखादा संशयित असला तरी तो आरामात त्यातून निसटू शकतो.
खुद्द रेल्वे सुरक्षा अधिका-यांनाच या उपकरणांच्या उपयुक्ततेबाबत साशंकता आहे. विशेष म्हणजे आरडीएक्स आणि इतर केमिकलचा या मेटल डिटेक्टरमध्ये थांगपत्ताच लागत नसल्याचे एका वरिष्ठ अधिका-यानेच मान्य केले. त्यामुळे रेल्वे स्थानके किती सुरक्षित आहेत, हेच यावरून समजते. दरम्यान, प्रत्येक स्थानकात सीसीटीव्हीही बसवण्यात आले आहेत. मात्र आवश्यक त्या प्रमाणात ते उपलब्ध नसल्याने प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे मुंबईकरांची सुरक्षा सध्या तरी रामभरोसेच आहे.