कुठेही जायचं म्हटलं की पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे घराची सुरक्षाव्यवस्था! कारण कधी आणि कोणाच्या घरावर दरोडा पडेल हे काही सांगता येणार नाही. म्हणूनच आपण कुठेही बाहेरगावी जाताना सुरक्षेच्या दृष्टीने काही काळजी घेणं आवश्यक आहे.
काही दिवसांतच मुलांच्या परीक्षा संपतील. आतापासूनच तुम्हाला गावाला जायचे वेध लागले असतील. कित्येक जण पंधरा-वीस दिवस गावाला जातात. इतके दिवस गावाला जायचं म्हणजे घराची सुरक्षितता आलीच. घर सुरक्षित तर ठेवायला हवं. पण सुरक्षित म्हणजे नेमकं कसं? त्यासाठी काय तयारी करायला हवी?
» टाइमर लाईटचा वापर करा. म्हणजे तुम्ही नसतानाही घरात प्रकाश येईल, जेणेकरून तुमचं घर बंद नसून तुम्ही त्या ठिकाणी राहात आहात असा चोरांना भास होईल.
» सगळ्यात पहिल्यांदा घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावून घ्या. ज्या ठिकाणांहून घरात येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी हे कॅमेरा बसवावेत.
» घराच्या खिडक्या आणि दरवाजांना पडदे, शेड्स किंवा ब्लिंड्स लावा.
» घराबाहेर अंगण किंवा बगीचा असल्यास घराप्रमाणेच बागेत किंवा अंगणात टाईमरवर चालणारे दिवे लावून ठेवा.
» शक्य असल्यास घरातून माणसाचा बोलण्यांचा आवाज येईल अशा पद्धतीने एखादी टेप किंवा रेकॉर्ड टायमर लावून ठेवावी. जेणेकरून घरात कोणी आहे याची सतत जाणीव होईल.
» सगळ्या दरवाजा आणि खिडक्यांना कुलुपं लावावीत. तुम्हाला एकच कुलूप लावायची भीती वाटत असेल तर तुम्ही एक किंवा दोन-चार कुलुपं लावा. कारण एकापेक्षा जास्त कुलूप तोडणं कटकटीचं काम वाटू शकतं. शक्य असल्यास सगळीकडे दोन-दोन कुलुपं लावावीत. पण लक्षात ठेवा नंतर तुम्हालादेखील ती कुलुपं उघडायची आहेत.
» स्लायडिंग किंवा सरकत्या खिडक्या असतील तर त्यांच्या स्क्रूजवळही तुम्ही कुलूप अडकवू शकतात.
» तुमच्या शेजारच्यांना तुम्ही बाहेरगावी जाणार असल्यास तुमच्या घरावर त्यांना लक्ष ठेवायला सांगा. त्यांना काही संशयास्पद दिसल्यास त्यांनी त्वरित तुम्हाला कळवावं ही विनंती करा. मात्र तसे विश्वासू शेजारी असावेत.
» तुमच्या घराच्या आसपास असलेले रस्त्यांवरचे दिवे व्यवस्थित सुरू आहेत की नाही हे एकदा तपासा.
» तुमच्या घरी तुम्हाला येणारी पत्रं, वर्तमानपत्रं कोणीतरी विश्वासातली व्यक्ती किंवा शेजारी घेऊन ठेवेल अशी व्यवस्था करा.
» आजकाल सोशल नेटवर्किंग साईटवरून आपण कुठे जातो, कसं जातोय अशी बारीक सारीक माहिती सांगायची कित्येक जणांना सवय असते. मात्र कुठेही बाहेर जाताना हे सांगणं टाळावं. कारण त्यामुळे चोराला अंदाज बांधणं सहज शक्य होतं.
» चुकीच्या व्यक्तीने आपल्या घराला हात लावला असता अलाराम वाजेल अशी व्यवस्था करा. जेणेकरून शेजारच्यांना त्यांची कल्पना येईल.
काँक्रीट
काँक्रीट हा शब्द आपण अनेकदा वापरतो. हे काँक्रीट म्हणजे नक्की काय? काँक्रीट म्हणजे खडी, रेती, सिमेंट, पाणी आणि रसायनं यांचं मिश्रण. बांधकामातील काँक्रीटमध्ये हे घटक काय प्रमाणात असावेत ते संकल्पचित्रात दिलेलं असतं. मुंबईला क्षार आणि माती काढून टाकण्यासाठी सगळी रेती गोडय़ा पाण्यानं धुऊन घ्यावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसांत खडीसुद्धा धुवावी लागते. नाहीतर काँक्रीटमधलं पाणी ते शोषून घेतं. काँक्रीट हव्या तेवढय़ा प्रमाणात घट्ट किंवा पातळ झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी स्लम्प टेस्ट नावाची एक चाचणी असते. पूर्वी आपल्याकडे धान्याचं पायलीचं माप असे, तशा आकाराचं पण दोन्ही बाजूंनी उघडं असलेलं माप जमिनीवर ठेवून त्यात तयार केलेलं काँक्रीट ओततात. आणि लगेच माप अलगद वर उचलून घेतात. काँक्रीट किती खाली बसतं त्याला स्लम्प म्हणतात.
पाणी कमी असलं तर काँक्रीटची शक्ती जास्त आणि स्लम्प कमी असतो. पण खूप खोलवर किंवा अडचणींच्या जागी काँक्रिटिंग करायचं असेल तर खूप घट्ट काँक्रीट चालत नाही. तिथे प्लास्टिसायझर घालून स्लम्प वाढवावा लागतो. पाणी वाढवलं तर काँक्रीट कमकुवत होतं. कुठल्या जागेच्या काँक्रीटला किती स्लम्प हवा हे आधीच ठरवलेलं असतं.
अशा प्रकारे योग्य प्रकारचं काँक्रीट योग्य तऱ्हेने भरत भरत पाईल पूर्ण होते. पुढे या पाईलची जागा लक्षात यावी म्हणून जमिनीच्या वरही थोडं बांधकाम करून ठेवतात. आता पाईलची वजन पेलण्याची क्षमता पडताळून पाहायची असते. त्यासाठी अपेक्षित वजनाच्या सव्वापट वजन त्या पाईलवर ठेवून पाहतात. जर काँक्रिटिंग योग्य नसेल तर ती पाईल खचते किंवा फुटते.