मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ चे चौपदरीकरण सध्याच्या महामार्गाच्या दुतर्फा होणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग युद्धपातळीवर कामाला लागले असून या चौपदरीकरणाच्या मार्गाचा प्राथमिक आराखडादेखील तयार झाला आहे.
चिपळूण – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ चे चौपदरीकरण सध्याच्या महामार्गाच्या दुतर्फा होणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग युद्धपातळीवर कामाला लागले असून या चौपदरीकरणाच्या मार्गाचा प्राथमिक आराखडादेखील तयार झाला आहे. सध्याच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी जमीन भूसंपादन करून या मार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. यामध्ये कशेडी घाटामध्ये बोगदा असून मुंबई-गोवा हे अंतर अल्पवेळेत कापता येणार आहे. या चौपदरीकरणामुळे कोकणच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे. या दृष्टीने केंद्रसरकार पावले टाकत असून संबंधित अधिकारी या कामाला लागले आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चिला जात आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत माहिती मिळत नाही. आराखडा समोर येत नाही, अशी ओरड सुरू आहे. मात्र, चौपदरीकरण सद्यस्थितीत असलेल्या महामार्गाच्या दुतर्फा होणार आहे. त्यासाठी घाट रस्त्याच्या ठिकाणी ३० मीटर, शहरामध्ये ४५ मिटर व शहराबाहेर सपाटीच्या ठिकाणी ६० मीटरचे भूसंपादन होणार आहे. हे भूसंपादन सध्याच्या रस्त्याच्या दुतर्फा होईल, असे या विभागाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता चौपदरीकरण कामांसाठी तीन टप्प्यांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. यामध्ये कशेडी पायथा ते संगमेश्वर, संगमेश्वर ते टाकेवाडी व टाकेवाडी ते झाराप असे हे तीन टप्पे आहेत. जिल्ह्यामध्ये मोठया नद्यांवर असे पाच पूल होणार आहेत. यामध्ये वाशिष्ठी नदीवर दोन, जगबुडी, आरवली, शास्त्री व सोनवी असे पाच पूल होणार असून सध्याचे पूल कायम ठेवून त्याच्या शेजारी हे नवीन पूल होणार आहेत. ६० मीटर लांब व २४ मीटर रूंद या आकाराचे हे पूल असणार आहेत. तसेच या मार्गावर १५ छोटे पूलदेखील बांधण्यात येणार आहेत. चिपळुणातील वालोपे व खेड येथील वेरळ याठिकाणी रेल्वे रूळ येत असल्याने ओव्हरब्रीज बांधण्यात येणार आहेत.
खेड तालुक्यातील भरणानाका आणि चिपळुणातील बहादूरशेख व शिवाजीनगर आणि आगवे येथे व्हेईकल अंडरपास रोड (युव्हीपी) ची व्यवस्था करण्यात येणार आहे. या माध्यमातून महामार्गावरील वाहतुकीला अडथळा होणार नाही यासाठी हे पूल असतील. जगबुडी व बहादूरशेख येथील दोन व आरवली अशा चार पुलांसाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने ५६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयारदेखील केले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये कशेडी घाटात तीन ते चार कि.मी.चा बोगदा असेल. त्यामुळे रायगडमधून रत्नागिरी जिल्ह्यात फारसा घाट वळणाचा प्रवास करावा लागणार नाही. शिवाय कामथे, भोस्ते, परशुराम, निवळी या घाटातील वळणेदेखील काढण्यात येणार असून तीव्र उतार व चढ कमी होणार आहेत. तसेच वळणे काढून जास्तीत जास्त महामार्ग सरळ कसा होईल यासाठी प्रयत्न होणार आहे. त्यासाठी टप्प्या-टप्प्यातील आराखडेदेखील तयार करण्यात आले आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना हा मार्ग सद्यस्थितीती रस्त्याच्या दुतर्फा भूसंपादन करून बांधला जाणार आहे. त्यामुळे शहरांना बायपास मिळणार नाही. शिवाय कोकणातील काही शहरे महामार्गालगत वसली असून तेथील व्यापारी बाजारपेठा, हॉटेल व्यावसायिक यांचेदेखील फारसे नुकसान होऊ नये यासाठी सध्याच्या मार्गालगतच भूसंपादन होईल असा आराखडा तयार झाला आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे ३० मीटरचे भूसंपादन आहे. त्यात केवळ १५ मीटरचे भूसंपादन करावे लागणार आहे. शहरातून चौपदरी रस्ता जाताना दुतर्फा सव्र्हीस रोड, गटार आवश्यक आहे. त्यामुळे शहरी भागात ४५ मीटरचे भूसंपादन होईल. सध्याच्या महामार्गाच्या दुतर्फा सुमारे ७.५ मीटरचे भूसंपादन केले जाईल. त्यासाठी महसूल विभागाला आदेश देण्यात आले आहेत. एकूणच चौपदरीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला असून शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.