माटुंगा येथील पाच उद्यानांचे (फाइव्ह गार्डन) नूतनीकरण करून लोकार्पण केल्यानंतरही ही उद्याने दिव्यांअभावी अंधारात आहेत.
मुंबई- माटुंगा येथील पाच उद्यानांचे (फाइव्ह गार्डन) नूतनीकरण करून लोकार्पण केल्यानंतरही ही उद्याने दिव्यांअभावी अंधारात आहेत. या उद्यानांतील अनेक विजेचे दिवे बंद असल्याने धोका संभावण्याची भीती स्थानिक काँग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या उद्यानांत हायमास्ट दिवे (प्रखर प्रकाशाचे) बसवण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
माटुंगा येथील पाच उद्यानांचे नूतनीकरण करून लोकांसाठी ते खुले करण्यात आले आहे. येथील ‘ए, बी, सी, डी आणि ई’ ही पाचही उद्याने सुशोभीत करून मुलांना खेळणी, वृद्धांना चालण्या-फिरण्यासाठी जागा अशाप्रकारची सुविधा पुरवण्यात आली आहे. मात्र या पाचही उद्यानांत अंधुक प्रकाश आहे. तर काही ठिकाणचे दिवे बंदावस्थेत आहेत. एफ-उत्तर विभागाच्या अधिका-यांसह नयना शेठ यांनी या उद्यानांची पाहणी केली असता, ही बाब उघड झाली आहे.
या पाच उद्यानांत लहान मुले खेळायला येतात. त्यामुळे इथे स्वच्छ व प्रखर प्रकाश असणे, हे आवश्यक आहे. पायाखालचे स्पष्ट दिसत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकही धडपडतात. तर अंधारात गुर्दुल्ले नशाबाजी करत बसतात. त्यातून महिला-मुलींची छेड, लुटीचे प्रकार घडतात. त्यामुळे या सर्व उद्यानांत हायमास्ट दिवे बसवण्यात यावेत, अशी मागणी नयना शेठ यांनी केली आहे.