जमात उद दावा आणि हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनांवर अखेर पाकिस्तान सरकारने बंदी घालण्यात आल्याची घोषणा केली.
इस्लामाबाद- पाकिस्तान सरकारने मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या जमात उद दावा आणि जलालुद्दीन हक्कानी याच्या हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनांवर अखेर बंदी घालण्यात आल्याची घोषणा गुरुवारी केली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानवर दबाव आणल्याने पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे समजते. पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
पेशावर येथील सैनिकी शाळेवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. तेहरिक-इ-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने पेशावरमधील क्रूर हल्ला घडविला होता. जमात उद दावा, हक्कानी नेटवर्क या दोन संघटनांसह फलाह-इ-इन्सानियत फाऊंडेशन, हरकत-उल-जिहाद इस्लामी, हरकत-उल-मुजाहिदीन, उम्माह तमीर-इ-नौ, हाजी खैरुल्ला हाजी सत्तर मनी एक्स्चेंज, राहत लिमिटेड, रोशन मनी एक्स्चेंज, अल अख्तर ट्रस्ट आणि अल रशीद ट्रस्ट या संघटनांवरही बंदी लादण्यात आली आहे. या सर्व संघटनांची संपत्ती गोठवण्यात आली आहे. तसेच त्यांचे आर्थिक व्यवहार गोठविण्यासंदर्भातील आदेश याआधीच देण्यात आले आहेत.
जमात उद दवा ही मुंबई दहशतवादी हल्ल्याची आखणी करणा-या लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न आहे. लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला. तर २००८ मध्ये काबूल येथील भारतीय दुतावासावरील हल्ल्यामागे जलालुद्दीन हक्कानी नेटवर्कचा हात होता. या हल्ल्यात ५८ जणांचा मृत्यू झाला. २०११ मध्ये काबूलमधील अमेरिकेच्या दुतावासावरील हल्ला आणि अफगाणमधील बाँबस्फोटांमध्येही आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो फौजांवर हल्ले घडविण्यात हक्कानी नेटवर्कचा सहभाग होता. सप्टेंबर २०१२ मध्ये अमेरिकेने हक्कानी नेटवर्कवर बंदी घातली होती.