देशात वाढलेल्या जातीय हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी करत राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधानांवर टिका केली.
नवी दिल्ली- देशात वाढलेल्या जातीय हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी करत लोकसभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षांवरच टिका केली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन पक्षपात करत असल्याचा आरोप राहुल यांनी केला. तसेच संसदेत विरोधकांना बोलण्याची संधी न देता फक्त एका व्यक्तीचेच ऐकले जाते, असे नाव न घेता राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टिका केली.
देशात वाढलेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनांवर चर्चा करण्याची मागणी काँग्रेसने बुधवारी केली. लोकसभेतील प्रश्नोत्तराचा तास रद्द करुन देशात वाढत्या जातीय हिंसाचारावर लोकसभेत चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेसने स्थगन प्रस्तावाद्वारे केली. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, खासदार एम. आय. शाहनवाज आणि पक्षाचे प्रतोद के. सी. वेणुगोपाल यांनी हा प्रस्ताव मांडला.
मात्र लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी चर्चेला परवानगी नाकारली. यामुळे काँग्रेसच्या खासदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन निदर्शने केली. यात जातीय हिंसाचारविरोधी विधेयक लोकसभेत मंजूर करा, अशी मागणी करत राहुल गांधी यांनी सुद्धा अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेतली. यात सपा, टीएमसी आणि आरजेडीच्या खासदारांनीही सहभाग घेतला.
विरोधकांनी सरकारचा निषेध करत घोषणा दिल्याने सभागृहात गोंधळ उडाला. यामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला दुपारपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
दरम्यान, हे सरकार विरोधी पक्षाला बोलण्याची संधी देत नाही. संसदेत फक्त यांचेच एकतर्फी काम चालू आहे. सर्व निर्णय एकतर्फी घेतले जातात. विरोधी पक्षाला चर्चा करण्याची संधीच मिळत नाही. या सरकारची चर्चा करण्याची मानसिकताच नाही, असे लोकसभेबाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले.