उद्या (१ ऑगस्ट) लोकमान्य टिळक पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतानाच देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडलेल्या महात्मा गांधी यांनी लोकमान्य टिळक यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून संबोधले होते. मात्र त्यांचे बालपण खडतर गेले होते.
लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढय़ांपासून चिखलगावाचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पुण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका अँग्लो-व्हर्नाक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वत: अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले.
>> शेंगांची गोष्ट
ते शाळेत असतानाची एक घटना प्रसिद्ध आहे. एकदा वर्गात शिक्षक नसताना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. कचरा पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणा-यांची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वत:हून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी सर्व मुलांना टरफले उचलायला सांगितले. पण टिळकांनी टरफले उचलायला नकार दिला. ते म्हणाले, ‘‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही’’ तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणा-या मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.
>> कसरतीचे महत्त्व
१८७२ मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृष होते. त्यांच्या पत्नी तापीबाई त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यांनी नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौका चालन हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षात त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यात झाला.
>> कॉलेज जीवन
डेक्कन कॉलेजमध्ये असताना त्यांना अनेक मान्यवर शिक्षकांच्या हाताखाली शिकता आले. प्रोफेसर वर्ड्स्वर्थ आणि प्रोफेसर शूट यांनी त्यांची अभिजात इंग्रजी साहित्यातील रुची वाढवली तर गणित शिकवणा-या प्रोफेसर केरूअण्णा छत्रे यांनी त्यांच्यावर विशेष छाप टाकली. कॉलेजच्या दिवसात त्यांचे वाचनपण प्रचंड होते. त्यांनी संस्कृत धर्मग्रंथे, इंग्रजीमधील राजनीती आणि अतिभौतिकीवरील पुस्तके तसेच मराठीमधील संतसाहित्याचे वाचन केले. कॉलेजमधील मित्रांमध्ये ते स्पष्टवक्ते आणि बेधडक म्हणून प्रसिद्ध होते. १८७७ मध्ये गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते बीए झाले. बीएची पदवी मिळाल्यावर त्यांनी एलएल.बी. करण्याचे ठरवले. त्यांची गणितातील रूची आणि संशोधनाची आवड पाहता एलएल.बी. करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या मित्रांसाठी धक्कादायक होता. त्यांनी टिळकांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘ज्याअर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले आहे, त्या अर्थी मला असे वाटते की, कायद्याचे ज्ञान मला उपयोगीच पडेल.’’
>> टिळक-आगरकर मैत्री व वाद
डेक्कन कॉलेजमध्ये असताना त्यांची मैत्री आगरकरांबरोबर झाली. दोघेही त्या काळात राष्ट्रप्रेमाने भारलेले होते. जेव्हा त्यांनी डेक्कन कॉलेज सोडले, तेव्हा त्यांनी दोन निश्चय केले होते. एक म्हणजे सरकारी नोकरी नाही करायची आणि दुसरे म्हणजे आपले जीवन राष्ट्रसेवेसाठी अर्पण करायचे. टिळक आगरकर हे एकेकाळी खूप जवळचे मित्र होते पण देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या मतांतरामुळे दोन परममित्रांमध्ये वादाची दरी उभी राहिली. स्वातंत्र्याआधी समाज सुधारला पाहिजे, असे आगरकरांचे मत होते, तर समाज सुधारणेला बराच वेळ लागेल, स्वातंत्र्यासाठी इतके दिवस थांबणे शक्य नाही, असे टिळकांचे म्हणणे होते.
>> दुष्काळ व प्लेगची साथ
१८९६ चा दुष्काळ आणि १८९७ ची गाठीच्या प्लेगची साथ अशा दोन भयानक आपत्तींना भारतीयांना सामोरे जावे लागले. यावेळी टिळकांनी त्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. केसरीद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ‘दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच या काळात काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. याबरोबरच धनिक व दुकानदारांना अन्न व पैसा दान करण्याचे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या.
त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत गाठीच्या प्लेगची साथ पसरली व १८९७ येईपर्यंत ही साथ पुण्यापर्यंत पोहोचली. हा रोग अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे सरकारने त्याचा प्रसार रोखण्याचे प्रयत्न करणे चालू केले व त्यासाठी रॅंड नावाच्या एका अधिका-याची नियुक्ती केली. त्याच्या आदेशानुसार ब्रिटिश सैन्याने रोगग्रस्त लोकांना वेगळे करणे चालू केले. पण या काळात अनिर्बंध सैन्याकडून लोकांवर अनेक अत्याचार झाले. टिळकांनी केसरी व मराठाच्या माध्यमातून यावर तोफ डागली. ते निजंर्तुकीकरण व सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते, पण रॅंडने वापरलेल्या कार्यपद्धतीला त्यांचा विरोध होता. २३ जून १८९७ ला दामोदर चाफेकरांनी रॅंड व त्याचा सहकारी आयरेस्ट याची गोळ्या घालून हत्या केली. सरकारने पुण्यात कर्फ्यू लावला व संशयितांची धरपकड चालू केली. चाफेकरांना अटक करून फासावर चढवण्यात आले. टिळकांवरपण रॅंडच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण त्यासंदर्भात काहीच पुरावा सरकारला मिळाला नाही. यादरम्यान टिळकांनी केसरीमध्ये ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ व ‘राज्य करणे’ म्हणजे ‘सूड उगवणे नव्ह’ हे दोन अग्रलेख लिहिले.
>> राजद्रोहाचा खटला व तुरुंगवास
रँडच्या खुनानंतर ब्रिटिश सरकारने टिळकांवर दोन राजद्रोहात्मक लेख केसरीमधून लिहिल्याच्या आरोपाखाली टिळकांना तीन महिन्यांसाठी डोंगरी तुरुंगात ठेवण्यात आले व नंतर भायखळ्याच्या तुरुंगात हलविण्यात आले. तुरुंगवासादरम्यान टिळकांना सामान्य कैद्याची वागणूक दिली जात असे. मात्र त्याविरोधात नाराजीचे सूर उमटताच सरकारने टिळकांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलविले. बारा महिन्यांच्या तुरुंगवासानंतर ७ सप्टेंबर, १८९८ रोजी टिळकांची सुटका करण्यात आली.
भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना नसणे ही होती. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. या उत्सवाने ब्रिटिशविरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आणि हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागला. शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे आदर्श होते. त्यामुळे लोकांमधील आत्मविश्वास परत यावा म्हणून त्यांनी शिवजयंतीची सुरुवात केली.
आधुनिक भारताचे शिल्पकार!
‘‘जनतेसाठी जगलेल्या आणि जनतेसाठी मरण पावलेल्या या थोर पुरुषाला आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाईल,’’ अशा शब्दांत महात्मा गांधी यांनी लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली वाहिली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे विचार इतके प्रेरणादायी आहेत की आज ९८ वर्षानंतरही ते विचार करण्यास भाग पाडतात. त्यांच्याच काही विचारांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप..
>> आपल्या थोर पूर्वजांस विसरून कोणतेही राष्ट्र उदयास आले नाही व येणेही शक्य नाही, असा जो सर्वसामान्य ऐतिहासिक सिद्धांत आहे याचेच श्री शिवजयंती उत्सवासारखे उत्सव हे दृश्य स्वरूप होय.
>> मार्गातील अनेक अडचणी बाजूला सारून जो पुढे पाऊल टाकतो त्याला यश मिळते. अलीकडच्या तीरावर बसून जो नुसता संकल्प करतो त्याला यश मिळवायचे नसते.
>> राजा किंवा त्याचा अधिकारीवर्ग कितीही जुलमी असला तरी प्रजेच्या असंतोषापुढे त्यास हात टेकण्याची पाळी येते.
>> जी अस्पृश्यता मेल्यावर राहत नाही, जी अस्पृश्यता परमेश्वराच्या घरी जाताना आड येत नाही, ती अस्पृश्यता आपल्या समाजात वावरू देणे म्हणजे परमेश्वराच्या घरी पाप करण्यासारखे आहे.
>> आपल्या राष्ट्राचा विचार करा आणि कामास लागा. नुसत्या आहारविहारासाठी मानव जन्म नाही.
>> विचार व्यक्त करण्यासाठी वाणी दिलेली आहे. तिचा उपयोग केला नाही तर तो राजद्रोह होत नसला तरी देवद्रोह होतो, हे खास.
>> प्रगतीच्या मार्गात आलेला अडथळा काढून टाकणे हाच खरा पुरुषार्थ होय.
>> ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’’ हे ठणकावून सांगणा-या टिळकांनी सत्य विचारांची मांडणी केली आणि ती पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या थोर पुरुषाला विनम्र अभिवादन.
– आस