पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टेंभोडे गावात सुमारे १५ दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
पनवेल- पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टेंभोडे गावात सुमारे १५ दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावाला ३५ वर्षापासून एका कूपनलिकेतून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, कूपनलिकेचा पंप बिघडल्यामुळे गावाला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
टेंभोडे गावची लोकसंख्या सुमारे ३ हजारांच्या आसपास आहे. या लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३५ वर्षापूर्वी येथे एक कूपनलिका खोदण्यात आली होती. या कूपनलिकेवर लावलेल्या पंपाने पाणी टाकीत सोडून दिले जाते. हे पाणी एका ठिकाणी असलेल्या सार्वजनिक नळाद्वारे संपूर्ण गावातील लोक पाणी भरतात. मात्र, गेल्या १५ दिवसांपूर्वी कूपनलिकेवरील पंप बिघाडल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना खासगी कूपनलिका असलेल्या लोकांकडे जाऊन पाणी भरावे लागत आहे.
जिल्ह्यातील सर्व खेडय़ापाडय़ांमध्ये सरकारने नळाद्वारे पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, पनवेलपासून अगदी दीड किलो मीटर अंतरावर असलेल्या टेंभोडे गावातील लोक आजही कूपनलिकेचे पाणी पितात. गावात नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी सिडकोने गावातील काही लोकांची जमीनही संपादित केली आहे. पण, अद्याप सिडकोने या योजनेचे काम हाती घेतलेले नाही. गावातील लोकांनी सिडकोच्या अनेक कामांना विरोध केला आहे. येथील सेझच्या प्रकल्पाला टेंभोडे व वळवली गावातील ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यामुळे नवी मुंबई परिसरातील सर्व गावांमध्ये पाण्याची सुविधा पुरवणारे सिडको प्रशासन गावाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या दोन्ही गावांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यामुळे राजकीय पक्षही या मागणीकडे लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
टेंभोडे गावापासून जवळच असलेल्या पॉवर ग्रीड कंपनीला सिडकोने पाण्याची पाइपलाइन दिली आहे. परंतु जवळच असलेल्या टेंभोडे गावात आजपर्यंत पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेली नाही. गावात पाणी नसल्याने अनेक महिला पॉवर ग्रीड कंपनी येथून पाणी भरत आहेत. तर काही महिलांना दूर वरून पाणी भरावे लागत आहे. दरम्यान, टेंभोडेवासीयांना पाण्यासाठी कूपनलिकेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे भविष्यात गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने या समस्येकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.