आज जगातल्या करमणूक व्यवसायात तेजीचं वातावरण आलं आहे. लोकांना दोन घटका मनोरंजन देणा-या या क्षेत्रात भरपूर काम आहे. करमणूक क्षेत्रात अनेक मोठमोठे प्रकल्प, नवं तंत्रज्ञान तितक्याच उत्साहाने येत आहे. एकीकडे चित्रपट उद्योगात नव्या तंत्रज्ञानाने प्रवेश करून त्याचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे, तर दुसरीकडे कालपर्यंत छोटा असलेला टीव्हीचा पडदा आज सर्वव्यापी झाला आहे. एकेकाळी चित्रपट उद्योगाबरोबर उभा दावा मांडणारा हा छोटा पडदा आज याच चित्रपटसृष्टीचा सखा झाला आहे. या जागतिक पार्श्वभूमीवर आपल्या मराठी करमणूक सृष्टीत काय चाललंय? या नव्या आव्हानांना पेलण्यासाठी ती सक्षम आहे का, या विषयावर या क्षेत्रातल्या काही दिग्गजांशी चर्चा करून घेतलेला हा आढावा.
मराठी चित्रपटसृष्टीत त्याचप्रमाणे टीव्हीवरील निर्मितीत मोठी वाढ झाली आहे. एकेकाळी वर्षाला दहा-वीस चित्रपट व काही मालिका असे या करमणूक क्षेत्राचे स्वरूप असताना आता चित्रपटच शंभरच्या आसपास जाऊन पोहोचले आहेत. सध्याच्या चार वाहिन्यांची क्षमता लक्षात घेता आज मालिकांचा व्यवसायही मोठा झाला आहे. या चित्रपट व मालिकांचे बजेटही वाढले आहे. चाळीस लाखांत बनणारा मराठी चित्रपट आता एक कोटीची सीमा ओलांडून गेला आहे.
नव्या तंत्रज्ञानामुळे चित्रपट प्रदर्शनाचे भौगोलिक क्षेत्र विस्तारले आहे. इंग्लंड, अमेरिका, मॉरिशस, आखाती देश अशा अनेक ठिकाणी आता मराठी चित्रपट दाखवले जात आहेत. खासगी टीव्ही वाहिन्यांमुळे या क्षेत्रात एक नवे दालन खुले झाले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून चित्रपट पाहण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे आता घरबसल्या मनोरंजन करणे शक्य झाले आहे. यूएफओच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक ठिकाणी चित्रपट प्रदर्शित करण्यात असलेली प्रिंट काढण्याची अडचणही दूर झाली आहे.
फिक्की फ्रेम्स
करमणूक विश्वातल्या व्यावसायिक घडामोडींचा वार्षिक आढावा घेणा-या तीन दिवसांचे फिक्की फ्रेम्स नुकतेच पार पडले. तीन दिवस चालणा-या या चर्चासत्रात वर्तमान व भविष्यातल्या अनेक गोष्टींचा वेध घेण्यात आला. चित्रपट उद्योगाला आता अधिकाधिक नवनवी क्षेत्रे पादाक्रांत करण्याचे वेध लागले आहेत. या वर्षीच्या चर्चाचा मुख्य विषय हा या विषयात असलेल्या विविध अडचणी दूर करण्याचा होता. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीवर बोहरील सेन्सॉरशिप वाढली असल्याचा सूर या चर्चेतून आला. चित्रपट उद्योगातली माणसं ही स्वत:च जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सेन्सॉरशिप असता कामा नये असाच या चर्चेचा रोख होता.
सध्या देशात डिजिटायझेशनचे वारे जोरात वाहत आहेत. त्यामुळे आता टीव्हीच्या प्रसारण दर्जातही कमालीची वाढ झाली आहे. जगभरातल्या टीव्ही कंपन्यांचे आता भारताकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे पुढचा काळ हा भारतीय वाहिन्या व जागतिक वाहिन्यांमधील थेट स्पर्धेचा असणार आहे. सध्या भारतात मोठया प्रमाणात परदेशी वाहिन्यांच्याच प्रादेशिक वाहिन्यांना अधिक प्रतिसाद मिळत आहे. मात्र या सा-यांचाच फायदा पुढील टीव्ही उद्योगाच्या वाढीला होणार असल्याचा सूर या वर्षीच्या फिक्की फ्रेम्समधून दिसून आला आहे. डिजिटायझेशनमुळे आता आपल्या प्रेक्षकांशी थेट संपर्क साधण्यासाठी अनेक वाहिन्या या इच्छुक आहेत. नवनव्या संकल्पनांबरोबरच आता टीव्हीला मोबाइलशी जोडण्याच्या पुढच्या काळातल्या प्रयत्नांना अधिक महत्त्व मिळणार असल्याचं दिसून आलं आहे. चित्रपट उद्योगाबरोबरच भारतातल्या चित्रपट निर्मितीत आता मोठया प्रमाणावर वाढ झाली असून अनेक परदेशी चित्रपटही आता भारतात चित्रण करू इच्छित आहेत. त्यांना योग्य त्या सेवासुविधा पुरवण्यात आल्या पाहिजेत यावर सगळया वक्त्यांचे एकमत झाले. या चित्रीकरणात भाग घेणा-या कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न हा महत्त्वाचा असल्याचे मत परदेशी वक्त्यांनी व्यक्त केले. गेल्या काही वर्षामध्ये भारतीय पार्श्वभूमीवर, भारतीय कथानकांवर आधारित चित्रपटांनी ऑस्करवर आपली छाप सोडली आहे. हे चित्रपट भारतीय निर्मात्यांनी का केले नाहीत, असा सूर व्यक्त करत असतानाच आता हिंदी चित्रपटांनी एक हजार कोटींची मर्यादा ओलांडली पाहिजे, असेही मत व्यक्त करण्यात आले. आता डिजिटल सेवेमुळे चित्रपट उद्योगाला आपल्या प्रेक्षकांशी थेट भिडण्याचे तंत्र लाभले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीने आता त्याचाही फायदा करून घेतला पाहिजे, असे मतही या वेळी व्यक्त करण्यात आले.
हिंदी चित्रपट सृष्टीला आता नव्या कथांची, वेगळया विषयांची आवश्यकता असून अधिकाधिक तांत्रिकदृष्टया कुशल पटकथाकार व इतर तंत्रज्ञांच्या आवश्यकतेवरही या चर्चासत्रांमध्ये भर देण्यात आला. जाहिरात उद्योगालाही चित्रपट व इतर उद्योगांबरोबर कशा पद्धतीने जोडून घेता येईल, त्यायोगे करमणूक क्षेत्राचा विकास घडेल असे मतही त्यांनी या चर्चासत्रांमध्ये व्यक्त केले. एकंदरीतच पुढच्या शतकातल्या करमणूक उद्योगाचा विकास आपण कशा पद्धतीने करायला हवा यासाठी एक व्यापक विचारमंथन हे या वर्षीच्या फिक्की फ्रेम्सचे वैशिष्टय ठरले. आपल्या करमणुकीच्या व्यवसायाकडे फिक्की ज्या गंभीरपणे पाहते तशाच प्रकारचा प्रयत्न मराठीत करायला हवा, असे फिक्कीच्या अनुषंगाने राहून राहून वाटून गेले.
विकास होत आहे
गेल्या काही वर्षापासून प्रसाद सुर्वे हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची धुरा सांभाळत आहेत. या पदावर आल्यापासून मराठी चित्रपट व्यावसायिकांच्या विकासाच्या अनेक योजना त्यांनी आखल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आतापयर्र्त अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत.
मराठी चित्रपटांच्या व्यवसायात निरंतर विकास होत आहे. आज मराठी चित्रपटांचा व्यवसाय हा एकूण सत्तर कोटींच्या पुढे गेला आहे. त्यातही मराठीचा एक अभिमान वाटतो. मराठी चित्रपटांचे विषय, सादरीकरण या सगळयाच बाबतीत आज मराठी चित्रपट अग्रेसर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमधूनही हे दिसून आले आहे. चित्रपट चांगला असेल तर तो चालणारच हे निश्चितच आहे. बरेच जण मराठी चित्रपटांना सिनेमागृहे मिळत नाहीत, अशी ओरड करतात मात्र जर चांगला चित्रपट असेल तर तो चालतोच, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. ‘काकस्पर्श’ या चित्रपटाची सुरुवात दीडशे स्क्रीनपासून झाली होती. पुढे त्यांना तो तीनशे स्क्रीनमध्ये दाखवावा लागला होता.
मराठी चित्रपटाच्या मार्केटिंगवर आज मोठा खर्च करावा लागतो. जितका खर्च एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीला लागतो जवळजवळ तेवढाच खर्च या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीही करावा लागतो. एवढं सगळं करूनही शेवटी मराठी चित्रपट हा माऊथ पब्लिसिटीवरच चालतो. प्रेक्षक विचार करून चित्रपटाला येतात. मात्र तरीही चांगल्या कंटेंटमुळे आजही मराठी चित्रपटाची अवस्था चांगली आहे, असंच आपल्याला म्हणावं लागेल. – प्रसाद सुर्वे, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
मराठी चित्रपटांचे चित्र आशादायी
गेली कित्येक वर्ष टेलिव्हिजन क्षेत्रात मराठीसह अनेक भाषांमधील वाहिन्यांचे प्रमुख म्हणून नितीन वैद्य काम करत आहेत. दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसमोर याव्यात, यासाठी यांनी ‘दशमी क्रिएशन’ ही निर्मिती संस्थादेखील सुरू केली आहे. वैद्य हे मनोरंजन क्षेत्रातील एक जाणकार व्यक्तिमत्त्व आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्राबद्दल एकूणच त्यांचा अभ्यास आणि त्यांचा अनुभव दांडगा समजला जातो. मराठी मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक बाजूबद्दल त्यांनी व्यक्त केलेले हे अनुभवसंपन्न मत..
‘‘मराठी चित्रपटांचे आजचे चित्र हे निश्चितच आशादायी आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांनी आणि कलाकारांनी जे यश संपादन केलं आहे, ते मराठी मनोरंजनक्षेत्राची वाटचाल योग्य दिशेने चालू असण्याचाच एक संकेत आहे असं आपण म्हणू शकतो. पण एकूणच सिनेमा म्हणा किंवा मालिका, याबाबतीत मराठीत खूपच आशादायी चित्र आहे. अलीकडे मराठीतील मालिका आणि सिनेमांच्या निर्मितीचं प्रमाण तर वाढलं आहेच, शिवाय अनेक मराठी वाहिन्यादेखील सिनेमानिर्मिती क्षेत्रात उतरत आहेत. मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातला मोठा पैसा हा सिनेमांसाठीही वापरला जातो. त्यामुळे या क्षेत्राची व्याप्ती नक्कीच वाढली आहे. मराठी सिनेमांमध्ये विषयही चांगले हाताळले जात आहेत. तसंच कलात्मकता, उत्कृष्ट मांडणी आणि दर्जेदार संकल्पनांमुळे मराठी सिनेमांना निर्माता मिळणं ही पूर्वीसारखी कठीण बाब राहिली नाहिये. पण तरीही हा व्यवसाय करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी योग्य ती योजना तयार करणे आवश्यक आहे. जर सर्वच गोष्टींचा विचार करून मराठीत एखादी चांगली निर्मिती केली तर आपणही आपल्या चित्रपटांसाठी १० ते १५ कोटींपर्यत मराठी चित्रपट गल्ला खेचू शकतो. पुढील काळात मराठी चित्रपटांनी या मर्यादेपर्यंत जाणं हेही गरजेच आहे.
निर्मात्यांनी सिनेमा निर्मितीचा खर्च नियंत्रित ठेऊन अधिकाधिक फायदा मिळवला तर तो या क्षेत्रासाठी नक्कीच पोषक ठरेल. सध्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच सिनेमे गर्दी खेचून अशा प्रकारचं गणितं यशस्वी करतायत. तेही काही कमी नाही. हे चित्रं भविष्यात नक्कीच सुधारेल. केवळ पैसा ओतला म्हणजे चित्रपट यशस्वी होतो, असं नाही. कारणं तो उत्तम बनवण्यासाठी जी मूळ संकल्पना कुणाच्या तरी मनात रुजावी लागते, ती पैसा देऊन तयार करता येत नाही. नाटक असो, मालिका असो किंवा सिनेमा त्यात सर्जनशीलता असणं गरजेचं आहे. आपण जे निर्माण करतो आहोत त्यावर निर्मिती प्रक्रियेतील प्रत्येकाचा विश्वास असणं ही देखील महत्त्वाची बाब आहे. कोणत्याही निर्मितीमधली कलात्मकता ही भावणारी असावी. त्याला जर आर्थिक नियोजनाची जोड असेल तर आपोआप तुम्ही यशस्वी होताच. उत्तम कथा, निर्मिती, पैसा आणि मार्केटिंग या चार महत्त्वाच्या गोष्टींवर चित्रपट किंवा मालिकेचं यश अवलंबून असतं. पण त्याच वेळी निर्माण होणा-या कलाकृतींशी प्रामाणिक असणं आणि त्यामागची भावना जपणं हेही व्यावसायाच्या दृष्टीने गरजेचं आहे. काही वेगळं करण्याची उर्मी असेल तर काहीही शक्य आहे. सुदैवाने मराठीत खूप गुणी कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मातेही आहेत, त्यामुळे भविष्यात मराठी मनोरंजन क्षेत्राला चांगले दिवस येणार एवढं मात्र नक्की! – नितीन वैद्य (शब्दांकन : गौरी महाजन)
मराठी सिनेउद्योग आघाडीवर!
एक महाराष्ट्रीय या नात्याने माझ्या मनात मराठी सिनेउद्योगाविषयी नेहमीच हळवा कोपरा राहिला आहे. पण कुठल्याही उद्योगासाठी एखाद्याच्या मनातली आस्था भरभक्कम मदतीत परिवर्तित होणं ही अवघड गोष्ट असते. मात्र, आमच्या यूएफओ मूव्हीजने प्रथमपासून मराठी सिनेमांसाठी अनेक लाभदायक पर्याय देऊ केले.
सिनेमाच्या डिजिटायझेशनच्या दरामध्ये सवलत हा त्यातलाच एक विशेष पुढाकार. सर्व मराठी दिग्दर्शक, निर्माते आणि प्रदर्शक यांना एकत्र आणून आम्ही आमची ही लवचिकता जाहीर केली होती. ज्यांनी ही संधी घेतली त्यांना तिचं सोनं करता आलं. झी टेलिफिल्म्स ही या उद्योगांपैकीच एक लाभदायी संस्था. प्रेक्षकांची परिपक्वता आणि वेगळे विषय धारिष्टय़ाने पुढे आणण्याची मराठी सिनेउद्यमींची मानसिकता यामुळेच मराठी सिनेउद्योग एक महत्त्वाची आणि कुणीच दुर्लक्षित न करू शकणारी जोमदार आघाडी म्हणून प्रस्थापित झाली आहे. या प्रभावामुळेच आज अनेक राष्ट्रीय पुरस्कार मराठी सिनेउद्योगांकडे चालत येऊ लागले आहेत. यूएफओ मूव्हीज्ने या सर्व वाटचालीत आपला खारीचा वाटा उचलला आहे. – संजय गायकवाड, यूएफओ मूव्हीज.
यूएफओचा फायदा
मराठी चित्रपटांच्या क्षेत्रात यूएफओ मूव्हीजच्या तंत्रज्ञानाचा मोठाच फायदा झालेला दिसून येतो. यूएफओ मूव्हिजने आणलेले तंत्रज्ञान हे डिजिटल तंत्रज्ञान आहे. कोणत्याही प्रिंटशिवाय केवळ डिजिटल पद्धतीने हे चित्रपट प्रदर्शित होत असल्याने अनेक प्रिंट काढणे, त्यांची सर्वत्र वाहतूक करणे, या सा-या गोष्टींसाठी लागणारा वेळेचा अपव्यय टळू लागला आहे. एकाचवेळेस अनेक ठिकाणी चित्रपट प्रदर्शित करणेही त्यामुळे शक्य झाले आहे. अगदी गावोगावीच्या थिएटर्समध्येही एकाच दिवशी सिनेमा प्रदर्शित होतो. शिवाय व्याप्ती वाढूनही वेळेची बचत आल्यामुळे तसेच डिजिटल अंकुश आल्यामुळे आता सिनेमाची अनधिकृत पायरसी होण्यावरही पायबंद आला आहे. त्याचा फायदा सगळयाच लहान मोठया निर्मात्यांना होत आहे. एकेकाळी चित्रपट प्रदर्शित करण्यात प्रिंट काढण्यासाठीचा खर्च हा मोठा असे, तो आता वाचला आहे. आता काही सिनेमे हे डिजिटल पद्धतीनेच तयार होत असल्याने व त्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश करण्यात आल्याने त्याचाही फायदा झालेला आहे. आता तर सेन्सॉरसाठीही प्रिंट काढण्याचीही आवश्यकता नसावी, अशीही मागणी होत आहे.
नानुभाईंचा पसारा
मराठी चित्रपटांच्या व्यवसायात असलेले आश्वासक नावं म्हणजे नानुभाई. अनेक अडल्यानडल्या निर्मात्यांच्या पाठीशी नानुभाई उभे राहात असतात. कोणताही चित्रपट हा योग्य पद्धतीने वाहिन्यांकडे किंवा इतर ठिकाणी जावा यासाठी त्यांची धडपड सुरू असते. कोणताही चित्रपट आला की तो केवळ प्रदर्शित करून चालत नाही. अनेक ठिकाणी या चित्रपटांचे हक्क घेतले जात असतात. ते हक्क मिळवून देण्यात नानुभाईंचा मोठा वाटा आहे. त्यांनी स्वत:ही काही चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. कोणत्याही चित्रपटासाठी एकूण ३३ हक्के हक्क विकता येतात, असे या क्षेत्रातले जाणकार सांगत असतात. त्याऐवजी एकाच वेळेस हे हक्क घेतले गेल्याने त्याचा निर्मात्यांनाही फायदा होत असल्याचं बोललं जातं. नानुभाई यांनी मराठी चित्रपटसृष्टीतल्या विविध कार्यक्रमांमध्येही आपला सक्रिय सहभाग ठेवला आहे. त्यांच्या या योगदानाचा मराठी चित्रपटसृष्टीला फायदाच होत असल्याचं दिसून येत आहे.
सिनेमाचे उत्पन्न सिनेमागृहे
मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी राज्यात पाचशेच्या वर चित्रपटगृहे आहेत. यात मल्टीप्लेक्सचा व सिंगल स्क्रीनचा समावेश होतो. मात्र मुंबईत मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना मिळणा-या वेळा आक्षेपार्ह आहेत. त्या ब-याच वेळा सोयीच्या नसतात, असे सांगितले जाते. सिंगल स्क्रीनची अवस्था बिकट आहे, अस्वच्छता, थिएटरची अवस्था, मोडक्या खुच्र्या, बंद पडलेले एसी यामुळे या ठिकाणी चित्रपट पाहणे जिकिरीचे होऊन जाते. त्यामुळे या ठिकाणी प्रेक्षक येत नाहीत. तंबूतल्या चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना चांगला प्रेक्षक मिळतो. मात्र त्यातही दाक्षिणात्य चित्रपटांचे आव्हान वाढत चालले आहे.
टीव्ही
टीव्हीचा पडदा हा आता व्यापक झाला आहे. दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित होणा-या तीन तासांच्या कार्यक्रमांची जागा आता चार करमणूक वाहिन्यांवरून प्रसारित होणा-या चोवीस तासांच्या मनोरंजनाने घेतली आहे. आजमितीस मराठी वाहिन्यांवरून किमान तीसएक मालिका प्रसारित होत आहेत. त्यातही या वाहिन्यांवरून दाखवण्यात येणा-या चित्रपटांचाही समावेश आहे. या वाहिन्यांवरूनही आपला चित्रपट दाखवण्याचा एक चांगला पर्याय सध्या चित्रपटसृष्टीकडे आहे. चित्रपट प्रसारणाचे हक्क विकून चांगली आर्थिक प्राप्ती करण्याचा मार्ग यामुळे खुला झाला आहे. मराठी चित्रपटांच्या संगीताच्या हक्कांविषयी अधिक सजग होण्याची परिस्थिती सध्या आहे. गैरफिल्मी गीतांना चांगला प्रतिसाद मिळत असताना त्याचे प्रतिबिंब चित्रपटगीतांच्या विक्रीत मात्र दिसत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळता इतर मराठी चित्रपटांच्या गीतांची पुरेशी प्रसिद्धीही होत नसल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी आजही मोठा व्यवसाय करण्याला वाव आहे.
इतर हक्क
मराठी चित्रपटांच्या हक्कांबाबत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एका बाजूला विमानात दाखवण्यात येणा-या चित्रपटांचे, परदेशी वाहिन्यांना देण्यात आलेले प्रसारणाचे अधिकार यांच्यासह अनेक अनुषांगिक अधिकार विकूनही चित्रपटांना आपला व्यवसाय करता येतो अशी परिस्थिती आहे. असे अनेक अधिकार या निमित्ताने मिळवण्यात येतात. त्यांचाही व्यवसाय हा मोठया प्रमाणात सुरू आहे. गरज आहे ती निर्मात्यांनी या सगळया गोष्टींचा सजगतेने विचार करण्याची.