दुष्काळाने शेतकरी होरपळला असताना वीज वितरण कंपनीने गेल्या तीन वर्षापासून वायगाव व तळेगाव शिवारातील शेतक-याला वीज जोडणी दिलेली नाही.
वर्धा– दुष्काळाने शेतकरी होरपळला असताना वीज वितरण कंपनीने गेल्या तीन वर्षापासून वायगाव व तळेगाव शिवारातील शेतक-याला वीज जोडणी दिलेली नाही. कंपनी व ठेकेदारांच्या दलालीत शेतक-यांच्या जोडण्या अडल्या असून वीज कंपनीच्या कार्यालयात चकरा मारून थकलेल्या शेतक-यांनी अनुदानातून मिळालेली विहीर आत्महत्या करण्यासाठी दिली काय, असा संताप व्यक्त केला आहे.
शेतक-याला सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शासनाकडून विहिरीला अनुदान मिळाले. शेतक-यांनी लगबगीने विहिरी तयार केल्या. रितसर डिमांड भरून वीज जोडणीसाठी २०१२मध्ये अर्ज दाखल केला. दोन वर्षे झाली, पण शेतातील विहिरीवर वीज मिळाली नाही. पाण्याअभावी सोयाबीन व कपाशीचे पीक हातचे गेले. वायगाव व तळेगाव शिवारातील सुमारे ५० शेतक-यांची अशी दैना झाली आहे. तर संपूर्ण जिल्ह्यात काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी, असे म्हटले जात आहे.
वीज वितरणने कंपनीने जोडण्या देण्याचे कंत्राट रुद्रा एजन्सीला दिले आहे. मटेरिअल उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून कंत्राटदार शेतक-यांना मूर्ख बनवीत असल्याचे शेतकरी सांगताहेत. एकीकडे दोन ते तीन वर्षापासून वीज मिळत नसताना राजकारणात असणा-या व कंत्राटदाराला जास्तीचे पैसे देणा-या मातब्बरांच्या शेतात अवघ्या पंधरा दिवसातच वीज जोडण्या दिल्या जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
शेतकरी बळीराम कुंभारे, फारुख काझी, बालाजी वरघने यांनी वीज कंपनीने एक तर तीन वर्षाचे नुकसान व्याजासह द्यावे नाहीतर वीजपुरवठा त्वरित द्यावा, अशी मागणी केली आहेत. मागणी मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहेत. मात्र वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता विनोद मतकरे यांनी हे काम कंत्राटदाराचे असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचे काम केले आहेत. वीज वितरण कंपनीच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला जात आहेत.