डिझेलची दरवाढ आवश्यकच होती, असे स्पष्ट करत अरुण शौरी यांनी भाजपला घरचा आहेरच दिला आहे.
भोपाळ – केंद्र सरकारने केलेली डिझेलची दरवाढ आवश्यकच होती, असे स्पष्ट करत पक्षाचे नेते अरुण शौरी यांनी जणू भाजपला घरचा आहेरच दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी डिझेल दरवाढीवर रविवारीच टीका केली होती. या मुद्दय़ावर भाजपने सरकारविरोधात रान माजवण्यासाठी जोरदार प्रयत्नही चालवला आहे.
एका परिसंवादासाठी येथे आलेल्या शौरींनी पत्रकारांशी बोलताना डिझेलची दरवाढ ही काळाची गरजच होती, अशी भूमिका मांडली. डिझेल दरवाढ आणि रिटेलमधील परकीय गुंतवणुकीबाबत मोठा ओरडा होतो आहे. पण या निर्णयांतून नफा वा तोटा यापैकी काहीच होणार नाही. मात्र, या निर्णयांतून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे, असेही शौरी या वेळी म्हणाले.
‘डिझेल दरवाढ अपरिहार्य’
हुबळी – अनुदान कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सावरण्यासाठी डिझेल दरवाढ आणि अनुदानित सिलिंडरच्या संख्येमध्ये कपात करणे अपरिहार्य होते, असे केंद्रीय कामगारमंत्री मल्लिकार्जून खरगे यांनी रविवारी स्पष्ट केले. त्याच वेळी भाजपसहित विरोधी पक्ष सरकारविरोधात अपप्रचार करत असल्याची टीका त्यांनी केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्या आणि युरोपीय देशातील मंदी यांच्या पार्श्वभूमीवर भारतात आर्थिक सुधारणा आवश्यक आहे, असे खरगे म्हणाले. केंद्र सरकारविरोधात अपप्रचार करण्यापेक्षा भाजपने कर्नाटकमध्ये सुशासन देण्यासाठी काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
‘मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही’
फगवारा : तृणमूल काँग्रेसने यूपीए सरकारचा पाठिंबा काढला तरी सप आणि बसपने केंद्र सरकारला पाठिंबा दिल्यामुळे मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही, असे मत माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी रविवारी व्यक्त केले. सप आणि बसप या दोघांनाही मध्यावधी निवडणुका नको आहेत, शेवटी लोकशाही आकडय़ांचा खेळ आहे, असे ते म्हणाले. बिगर-काँग्रेस, बिगर-भाजप पक्षांची आघाडी आकाराला येत असून ती धोरणांवर आधारित असेल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. मुलायम सिंग यादव तिस-या आघाडीचे पंतप्रधानपदासाठी उमेदवार असतील का, असे विचारले असता, ते १९९०पासून उमेदवार आहेत, असे येचुरी गंमतीने म्हणाले.