खूप वर्षापूर्वी एक भयकथा वाचली होती. मध्यरात्रीनंतरची वेळ. कुणीतरी एकटाच बेस्टच्या बसची वाट पहात स्टॉपवर उभा आहे. बस येते. कंडक्टरची बेल ऐकू येते.
खूप वर्षापूर्वी एक भयकथा वाचली होती. मध्यरात्रीनंतरची वेळ. कुणीतरी एकटाच बेस्टच्या बसची वाट पहात स्टॉपवर उभा आहे. बस येते. कंडक्टरची बेल ऐकू येते. अर्धवट झोपेतील तो बसमध्ये चढतो. पुढे सरकायला पाऊल उचलतो तेव्हा त्याला दिसते की बसमधील सगळ्याच सीटांवर बसलेल्या सगळ्यांचीच मुंडकी बसच्या हेलकाव्यांबरोबर डुगुडुगू हलतायत. मागेपुढे होतायत. मग तो पुढे सरकतो, एका सीटवर बसतो तेव्हा त्याला कळतं की.
मी काही संपूर्ण भयकथा सांगणार नाही. त्यासाठी आजचा संवाद नाहीय. ही भयकथा बहुधा रत्नाकर मतकरींची असावी. परवा रात्री परळवरून ट्रेन पकडली तेव्हा बराच उशीर झाला होता. साडेअकरा-बारा वाजण्याचा सुमार असणार. डब्यात पाऊल टाकलं आणि या भयकथेतील प्रवाशाला दिसला असेल तसाच सीन एकदम नजरेसमोर आला.
डब्यात बसलेल्या दहा-बारा जणांची मुंडकी एकजात खाली झुकलेली आणि गाडीच्या धडाक धडाक गतीबरोबर डुगडुगत होती. मला एकदम ही भयकथा आणि त्यातला तो प्रसंगच आठवला. पुढे सरकलो तेव्हा लक्षात आलं यांची मुंडकी खाली होती कारण नजर हातातल्या मोबाइलमध्ये अडकली होती. सगळेच मोबाइलमध्ये गर्क. शेजारी कोण बसतंय, कोण उठलंय, कुणी काही बॅग वरच्या रॅकवर ठेवतायत कशाकडेच कुणाचंही लक्ष नाही.
गाडी सुटली. पुढे दादर आलं. तिथेही डब्यात चढलेले दोघे-तिघे कुणी तेही मोबाइलमध्येच मान खुपसून परस्परांशी काहीतरी बोलत होते. आपल्या सोबत्यांकडे न पाहता! मोबाइलने आपल्यातला संवाद असा संपवलाय. आपला वेळ आपला राहिलेला नाही. वेळ असला तरी आपल्याला आपल्या सहका-यांशी, मित्रांशी, मैत्रिणींशी, आई-वडील, पत्नी-मुले, नातेवाईक कुणाशीही बोलण्यासाठी तो वेळ वापरण्याची मुभा आपल्याला नाही. कारण तो वेळ मोबाइलने ताब्यात घेतला आहे.
बोलायला वेळ नाही आणि एखादे चार ओळींचे पत्र लिहायलाही नाही. आठवा तुम्ही किती दिवसांपूर्वी, आठवडय़ांपूर्वी, महिन्यांपूर्वी, वर्षापूर्वी कुणाला पत्र लिहिलयत ते? पत्राची जागा आता मोबाइलवरील एसेमेस, व्हॉटस् अॅपवरील संदेशांनी, त्यातही शॉर्ट कट म्हणून फुलफळं, हात, अंगठा यांच्या खुणा वापरण्याने घेतली आहे.
समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून, त्याच्याकडे पाहून, खळाळून हसत संवाद साधण्याची ऊर्मी जणू कोमेजलेल्या एखाद्या फुलाच्या पाकळीसारखी मिटून गेली आहे. खरी भयकथा सांगायची तर ही आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे आपल्याच आयुष्याची झालेली भयकथा.
सकाळी जाग आल्यावर मोबाइल हातात घेतला. व्हॉटस् अॅपवर आहेत नाहीत तेवढय़ा कॉन्टॅक्टस्ना आणि ग्रुपना शुभ सकाळ, गुड मॉर्निग, सुप्रभात, तुमचा दिवस उत्तम जावो वगैरे आन्हीकं करून झाली आणि मान वर केली तर समोर पत्नीचेही तेच चाललेलं. तिचीही मान मोबाइलमध्ये आणि तेच सुप्रभात, गुड मॉर्निग वगैरे तिच्या ग्रुपसाठी आन्हिकं सुरू.
सकाळी चहा पितानाही मोबाइल हातात, नजर एकतर स्क्रीनवर किंवा पेपरमध्ये खुपसलेली. आयुष्याच्या जोडीदाराशी सकाळच्या प्रसन्न वेळीही संवाद जवळपास शून्यच. डुगडुगणा-या मानेची भयकथा माझ्याही घरात सुरूच आहे की.
मग लक्षात आलं आपणही या मुंडक्यांच्या मांदियाळीतील एक. आपलाही आपल्यांजवळ बोलण्याचा वेळ किती कमी झालाय. नव्हे आपणच करून घेतलाय. या मोबाइलला देऊन टाकलाय. मोबाइलवर व्हॉटस् अॅप, फेसबुक, बातम्या आणखी काय काय पाहत-वाचत वेळ निघून जातो. परस्पर संपर्काचा जो उत्तम दुवा संवाद त्याचा धागा कधीच तुटतो.
रिळाचा धागा मध्येच संपावा तसा हा संवाद एकमेकांसोबत असूनही संपून जातो. चहा एकत्र पितो पण नजरसुद्धा एकमेकांकडे जात नाही. नजर मोबाइलवरच. लोकांचं आश्चर्य वाटून उपयोग नाही. आपणही त्यातलेच की. डुगडुगणारी मुंडकी आणि नजर मोबाइलवर. काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती. स्मार्टफोनच्या अतिवापराने नजरेचे, मनाचे आजार-विकार बळावतायत म्हणून. अनेकांना सवय असते. रात्री लाइट ऑफ करून उशीला डोकं टेकवल्यावरही मोबाइलवर जागं राहायची.
अंधारात असा मोबाइल वापरणा-यांची नजर मंदावत जाते, एका डोळ्याला अंधत्व येण्याची शक्यता असते. सतत मोबाइलवर व्यग्र राहण्याच्या विकाराला ‘नोमोफोबिया’ असे नाव देण्यात आले आहे. मेसेज पाठवा, इमेल चेक करा, सतत मोबाइल ऑन करा, मोबाइलशिवाय चिडचिड होणे, भयग्रस्त वाटणे या विकाराला हे नाव आहे.
आणि याचे प्रमाण तरुण पिढीमध्ये गेल्या काही वर्षात लक्षणीयरीत्या वाढले आहे. या अतिवापरामुळे व्हायचे तेच होते. मनात नसतानाही नात्यांमध्ये दुरावा येतो, कोरडेपणा येतो. थकवा, निरुत्साह जाणवतो. कामेच्छा कमी होते. चीडचीड होते. झोप पुरेशी होत नाही. इतकं होऊनही मोबाइल हातातून सोडवत नाही.
या सगळ्यावर हॉलिवुडच्या काही नामवंतांनी त्यांच्या परीने उपाय शोधलाय. बेडरूममध्ये मोबाइल, टॅब्लेट अशा कुठल्याही ‘व्यत्यय’ आणणा-या, परस्पर संवादाचा वेळ खाणा-या, संबंधांचा धागा तोडणा-या वस्तूंना प्रवेशबंदी. अगदी ठरवून. दोघांनीही ठरवायचं. या वस्तू बेडरूममध्ये आणायच्याच नाहीत. सध्याचा जेम्स बॉण्ड डॅनियल क्रेग आणि त्याची पार्टनर रॅशेल वेइझ यांनी असं ठरवून टॅब्लेट आणि इतर उपकरणांना बेडरूममध्ये बंदी केली आहे. अभिनेत्री जेनीफर गार्नरने तिच्या मुलांना मोबाइल वापरायला मनाई केली आहे.
याच विषयावर अलीकडेच एक सुंदर व्हीडिओ पाहिला. फेसबुकवरच कुणी तरी शेअर केला होता. सकाळी चहा पिताना ती मोबाइलवर आणि समोरच्या लॅपटॉपमध्ये गर्क. तो तिचा हात हातात घ्यायला बघतो तोपर्यंत ती उठून जाते. तिचे लक्षही नाही. कामावर निघताना ती बाय करतेय तर हा मोबाइलवर बोलत निघून जातो.
संध्याकाळी पार्टीसाठी हा ड्रेस घालू का ती विचारू पाहते तेव्हाही हा मोबाइलवरच. किचनमध्ये तिचे काम सुरू आहे तेव्हा हा येतो तोही मोबाइलवर बोलतच. बोलता बोलता त्याचा मोबाइल सिंकच्या पाण्यात पडतो. तो बाहेर काढून पुन्हा बोलू पाहतो तेव्हा ती मोबाइल घेऊन पुन्हा पाण्यात टाकते. त्याच्या चेह-यावर क्षणभर आश्चर्य आणि राग. तिच्या चेह-यावर प्रेम. मोबाइल पाण्यातच ठेवून दोघेही स्तब्ध. स्पर्शातून संवाद साधत. खूपच अप्रतिम असा व्हीडिओ. मोबाइलच्या भ्रामक दुनियेत हरवलेल्या आपल्या सगळ्यांनाच खूप काही सांगणारा, शिकवणारा.
मागे एकदा मी घरी मोबाइल विसरलो होतो. गाडी पकडल्यावर आठवण झाली. नंतर दिवसभर मोबाइल नाही म्हणून फार काही अडलं नाही. उलट बरंच वाटलं होतं. रात्री मोबाइल बेडरूमबाहेर ठेवलात, सकाळीही शक्य तितक्या उशिरा अगदी अर्धा तास उशिराने मोबाइलकडे वळलात, आलेला प्रत्येक मेसेज, व्हॉटस् अॅप संदेश पाहून त्याला उत्तरायचेच हा अट्टहास सोडलात तर या मोबाइलच्या मोहपाशातून सुटका होणे अशक्य नाही.
रात्रीही मोबाइल नाही त्यामुळे सकाळीही अर्थातच जाग आल्यावर आधी मोबाइलकडे वळायची, सर्व जगाला गुड मॉर्निग करायची गरज नाही. आपली काळजी करणा-या, वाट बघणा-या, आपल्यासाठी खपणा-या प्रिय व्यक्तींशी संवाद साधला की आपोआपच या भयकथेतून मुक्तता होईल.माझी होईल आणि मोबाइल, टॅब्लेटचा अतिवापर कमी करून खरा संवाद सुरू केलात तर तुमचीही होईल!