‘मलेरिया’वर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला, तरी डेंग्यूचे आव्हान महापालिकेपुढे कायम आहे.
मुंबई – ‘मलेरिया’वर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला, तरी डेंग्यूचे आव्हान महापालिकेपुढे कायम आहे. नारळाच्या बोंडांमध्येही डेंग्यूच्या अळ्या तयार होत असल्याची माहिती समोर आली असून, खार आणि उंदरांनी बिळे पाडलेल्या नारळांत पावसाचे पाणी साचून त्यात डेंग्यूचे डास तयार होत असल्याने असून, महापालिकेची झोप उडाली आहे.
गेल्या आठवडयात वांद्रे सरकारी वसाहतीतील एकाच इमारतीत अनेकांना मलेरिया झाल्याची तक्रार स्थानिकांनी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे केली होती. महापौरांनी याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले होते. आयुक्तांच्या सूचनेनुसार, सार्वजनिक आरोग्य विभाग, कीटकनाशक विभाग, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिका-यांनी पाहणी केली. यात सहा जणांपैकी दोघे डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागाने येथील साचलेल्या पाण्याचे नमुने घेतले. त्यात कुठेही डेंग्यूचा पसार करणा-या डासांच्या अळ्या सापडल्या नाहीत. मात्र खाली पडलेले आणि खार आणि उंदरांनी बिळे पाडलेले नारळ आणि झाडावरील बोंडांची तपासणी केली असता, त्यात डेंग्यूच्या डासांच्या अळया सापडल्या. त्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
दरम्यान, थेट नारळाच्या झाडांवरच डेंग्यूचे डास आढळल्याने गृहनिर्माण सोसायटींतील नारळाच्या झाडांची पाहणी करून बिळे पडलेले नारळ काढावेत तसेच पडलेल्या नारळाची विल्हेवाट लावावी, अशी सूचना कीटकनाशक विभागाला देण्यात आल्याचे सार्वजनिक कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले. कीटकनाशक विभागाचे प्रमुख अधिकारी राजन नारिंग्रेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही याबाबत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे सांगितले. बोंडांत पाणी साठणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचेही ते म्हणाले.