राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू असून, मुंबई शहरात रविवारी सलग तिस-या दिवशी सूर्यदर्शन झाले नाही.
मुंबई – राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू असून, मुंबई शहरात रविवारी सलग तिस-या दिवशी सूर्यदर्शन झाले नाही. या ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांचा जीव कोंडला असून, ताप, सर्दी, खोकला, घशाच्या विकारांनी हैराण केले आहे. राज्याच्या काही भागात झालेल्या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला असतानाच, मुंबई व राज्यात सोमवारी पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. यामुळे आंबा, सोयाबीन, कापूस, तूर, द्राक्ष, डाळींब आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती पाण्यात गेल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे. त्यामुळे खर्चाची तोंडमिळवणी कशी करायची, या प्रश्नाने बळीराजा हवालदिल झाला आहे.
नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात सर्वसाधारणपणे मुंबईत थंडीची चाहूल लागते. मात्र आता पाऊस पडत असल्याने मुंबईकरांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. सध्या डेंग्यू, मलेरिया आदी आजारांचा प्रकोप वाढला आहे. त्यातच या बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला आणि घशाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे.
वातावरणातील गारवा, कमी झालेली आद्र्रता, घटते तापमान आदींमुळे श्वसनाच्या विकारांच्या विळख्यात मुंबईकर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरांतील दवाखाने रुग्णांनी भरलेले आढळत आहेत. शनिवारचा अर्धा दिवस आणि रविवारच्या सुटीमुळे डॉक्टर उपलब्ध नसल्याने मुंबईकरांनी मेडिकल स्टोअर्सबाहेर गर्दी केली. तापमानात मोठी घट झाल्याने आजार वाढले आहेत. या गारव्यामुळे घशाचे आणि श्वसनाचे विकार डोके वर काढतील, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, काही दिवसांनी पुन्हा पारा चढण्याचा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे वातावरणातील बदलांमुळे मुंबईत आजारपण वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश तर किमान तापमान २४ अंशावर नोंदवण्यात आले. दरम्यान, अरबी समुद्र ते गुजरातदरम्यान असलेल्या द्रोणीय स्थिती (ट्रफ)च्या प्रभावामुळे सोमवारी मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज पुणे प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबईत मात्र तुरळक सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र हा ट्रफ जसजसा पश्चिमेकडे सरकेल, तसा या ट्रफचा प्रभाव कमी होत तापमान पुन्हा वाढू लागेल, असे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.