जिल्हय़ातील तरुण पिढीचे भविष्य घडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राणेसाहेबांचा आदर्श मी जपणार आहे, असे अभिवचन नितेश राणे यांनी दिले.
वैभववाडी- थोर युगपुरुषांनी समाजात क्रांती घडविली. आजच्या तरुण पिढीकडे समाज मोठय़ा आशेने बघत आहे. तरुणांनी आपल्या जीवनात कशा प्रकारे बदल अपेक्षित आहे, त्याचे नियोजन आजच केले पाहिजे. काळाबरोबर चालणारी प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यशस्वी होत असते. जिल्हय़ातील तरुण पिढीचे भविष्य घडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राणेसाहेबांचा आदर्श मी जपणार आहे, असे अभिवचन नितेश राणे यांनी दिले.
व्यस्त प्रचार दौ-यातही विद्यार्थी व पालक यांच्याशी नितेश राणे यांनी ‘तरुणांची पुढील वाटचाल’ या विषयी थेट संवाद साधला. आणि आपल्यासाठी धडपडत असलेल्या या व्यक्तिमत्त्वाशी थेट संवाद साधताना युवाशक्तीला आणि त्यांच्या पालकांना मोठा विश्वास मिळाला.
एडगाव येथील सुमित्रा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर जयेंद्र रावराणे, सुनील रावराणे, भालचंद्र साठे, शुभांगी पवार, धोंडू पवार आदी उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, प्रत्येक तरुणाने व विद्यार्थ्यांनी आपले व्हिजन डोळय़ांसमोर ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे. प्रत्येक क्षेत्राची माहिती, कुठच्या देशाची प्रगती कशा प्रकारे आहे. कुठले शहर प्रगतिपथावर आहे. याचा अभ्यास असणे महत्त्वाचे आहे. सन २०२० मध्ये भारत देश महासत्ता असेल. परंतु त्यावेळी ६० टक्के तरुणांचे प्रश्न डोळय़ांसमोर असतील. आजचे युग हे संगणकीय युग आहे. दिवसेंदिवस मोठे बदल प्रत्येक क्षेत्रात होत आहेत. नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत. काळाबरोबर चालणं व अभ्यास करणे तरुण पिढीला महत्त्वाचे आहे. राजकारणामध्ये तरुणांचा हातभार लागणे देखील गरजेचे आहे. निवडणुकीत उभ्या राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराची पारख आजच्या तरुण पिढीकडे असणे महत्त्वाचे आहे. आत्मविश्वासाच्या बळावर उद्दिष्ट साध्य करण्याची ताकद आजच्या तरुणाइकडे असली पाहिजे असे सांगितले.
ते म्हणाले, आज जागृत तरुण पिढीची समाजाला गरज आहे. सामाजिक विषयात आजचा तरुण मागे राहात आहे.
नारायण राणे यांनी जिल्हय़ात अनेक उद्योग आणले. एमआयडीसी देखील तुमच्यासाठी होती. ती एमआयडीसी रद्द करण्यात आली. त्यावेळी एकही तरुण उभा राहिला नाही. या उद्योगामध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार होता. विकासाला विरोध करणाऱ्या काही विरोधकांच्या विरोधात तरुणांनी पेटून उठले पाहिजे. मोठय़ा जबाबदारीने मी राजकारणाकडे बघत आहे. तुमचा आवाज म्हणून मी भविष्यात उभा राहणार आहे. तुम्ही हक्काने माझ्याशी बोला, संवाद साधा, मी देखील तुमच्या वयाचा युवक आहे. मनात कोणतीही भीती न बाळगता यापुढे माझ्याजवळ या. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तरुणांचा प्रतिनिधी म्हणून विजयी करून काम करण्याची संधी मला द्या, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.
या चर्चासत्रात जयेंद्र रावराणे म्हणाले, नारायण राणे यांनी जिल्हय़ात शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करून नावलौकिक मिळविला आहे. शिक्षण क्षेत्रात कोकण पॅटर्न संपूर्ण राज्यात पुढे आहे. याचे संपूर्ण श्रेय राणे यांचे आहे. तर युवा नेते नितेश राणे यांनी तब्बल २५ हजार ३०० युवकांना एकाच दिवशी नोकऱ्या देण्याचे काम केले आहे. अशा दुरदृष्टी असलेल्या व्यक्तीच्या मागे तालुक्यातील तरुणांनी, विद्यार्थी व पालकांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. या निवडणुकीत काँग्रसचे उमेदवार नितेश राणे यांना तालुक्यातून मोठे मताधिक्य देण्यासाठी तरुणांनी वज्रमूठ बांधली पाहिजे असे मत व्यक्त केले.