देव आणि भक्ताच्या अलौकिक प्रेमसुखाचा सोहळा आषाढी वारीच्या रूपाने पार पडला. काही वारकरी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन झाले की, मागे फिरतात. काही वारकरी बारस (द्वादशी) झाली की, मागे फिरतात. परंतु काही वारकरी मात्र काला झाल्यानंतरच भगवंताचा निरोप घेऊन आपापल्या गावाकडे वळतात. वीस-बावीस दिवसांच्या वारीच्या काळात, भजन, कीर्तनाच्या आनंदात न्हाऊन निघाल्यानंतर माघारी परतताना वारकरी हळवे होतात. संतश्रेष्ठ नामदेव महाराज तर आपल्या अभंगात वर्णन करतात की, जितके भक्त हळवे होतात, तितकीच हुरहुर भगवंतालाही लागून राहते.
भगवंतांचे अनेक अवतार असले तरी भगवान पांडुरंग हा अवतार वारक-यांनी स्वीकारलेला आहे. या भगवंताशी त्यांनी हरत-हेची नाती जोडलेली आहेत. वारकरी संत साहित्याच्या अगोदरच्या साहित्यात देव म्हणजे, कुणी तरी अगाध शक्ती आहे. त्याचा कोप झाला तर तो सर्वनाश करतो, अशा अनेक समजुतींनी देवाची भीती मानवी मनावर घातली जात होती. वारकरी संतांनी काय केले असेल तर सर्वप्रथम ही भीती संपवून टाकली.
पांडुरंगाला माय-बाप, सखा, सोबती अशा सर्व नात्यांमध्ये त्यांनी पाहिले व ते आपल्या रचनांमधून लोकांसमोर आणले. मग तो देव हाच वारक-यांचे सर्वस्व झाला. खरे तर शक्तीच्या उपासकांनी आपल्या देवीचा धाक निर्माण केलेला होता. आदिमाया शक्तीची रूपे म्हणून जी प्रसिद्ध आहेत त्यात कालिका, दुर्गा, महिशासुरमर्दिनी इ. रूपांचा समावेश होतर. या देवीची रूपे आपण पाहिल्यास त्यांबद्दल जनमानसात एक धाक, दरारा आहे.
वारकरी संतांनी या देवींनाही विठ्ठलाच्या रूपात पाहिले आणि देवीची भयानक वाटणारी रूपे लोप पावून ती प्रेमळ, जवळची वाटू लागली. या प्रेम भक्तीमुळे वारकरी संप्रदायात विठोबाची कधी विठाई माऊली झाली, ते देव आणि भक्त दोघांनाही कळले नाही. विठाई माऊली जरी झाली तरी तिचे प्रेमळ रूप मात्र बदलले नाही. उलट भक्ताच्या भेटीने या विठू माऊलीचा अपत्यभाव अधिकच उचंबळून येतो. भक्तीच्या भुकेने व्याकूळ झालेल्या भक्तांना ती प्रेमाने पान्हा पाजते. या आईच्या सान्निध्यात वारक-यांच्या प्रेमाचे भरते येते.
अंगी प्रेमाचे भरते। न घे उतार चढते॥
अशी भक्तांची अवस्था होते. शक्तीपूजकांप्रमाणे वारकरी संतही या विठाई, किठाई, कृष्णाई, कान्हाईच्या नावाने गोंधळ घालतात. नामदेवरायांनी ‘विठाई सावळे डोळसे रंगा येई वोऽऽऽ..’ असे गोंधळाला येण्याचे आवाहन केले आहे. तुकाराम महाराजांनी थेट गोंधळच घातला.
जेथे विठूचे राऊळ। तेथे तुकायाचा गोंधळ।
असा भाव त्यांनी व्यक्त केला. गोंधळाप्रमाणे विठोबाचा जागरही केला.
देवाचे भरता वारे। अंगी प्रेमाचे फेफरे॥
सर्वसामान्य तळागाळातल्या समाजात असे दैवतांचे जागरण-गोंधळ घालण्याची प्रथा होती. ती बंद करण्यासाठी वारकरी संतांनी प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर उच्च वर्णीयांत पुण्य संचयासाठी केल्या जाणा-या यज्ञ-यागालाही वारकरी संतांनी पर्याय सूचवून सोपे साधन सांगितले, ते म्हणजे,
नामसंकीर्तन साधन पै सोपे। जळतील पापे जन्मांतरीची॥
विठ्ठलाच्या नामाचे संकीर्तन केले की, सर्व पापांचा नाश होण्याचा मार्ग दाखवला आणि देवाबद्दलचा धाक कमी करून जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले. तुकाराम महाराज तर जगातली सर्व नाती त्या विठ्ठलामध्ये पाहात होते.
विठ्ठल माय-बाप चुलता। विठ्ठल बंधू आणि भ्राता।।
विठ्ठलाविन चाड नाही गोता। तुका म्हणे आता नाही दुसरे॥
विठ्ठलाशिवाय जगात दुसरे कोणतेही नाते नाही, तोच सर्वस्व आहे, हा प्रेमभाव वाढीस लागला. त्यामुळे देवाबद्दलचा धाक कमी होऊन पराकोटीचा जिव्हाळा वाढीस लागला. धाक कमी झाल्यास जसा जिव्हाळा वाढतो तसाच कधी-कधी अनुरागही निर्माण होतो. त्यातून आपल्या प्रिय व्यक्तीसोबत भांडण-तंटाही होतो.
विठोबाबद्दलचा धाक कमी झाल्यामुळेच अनेक वारकरी संतांना त्याच्याबद्दलचा अनुराग निर्माण झाला आणि त्यातून देव आणि संत यांच्यात भांडणेही झाली. या संतापाच्या भरात नामदेव महाराज देवाच्या औदार्यावर शंका घेतात आणि देवाला सुनावतात, ‘देवा तू पतीत-पावन आहेस, अशी ख्याती ऐकून तुझ्या दारात आलो. पण तू तसा नाहीस म्हणून मी माघारी जातो,’
पतीत पावन नाव ऐकून आलो मी द्वारा।
पतीत पावन नव्हे तरी मग जातो माघारा॥
किंवा
घेशी तेव्हा देशी ऐसा आसशी उदार।
काय धरू देवा तुझे कृपनाचे द्वार।।
या अनुरागाचा सर्वाधिक स्फोट कुणाच्या अभंगात पाहायला मिळत असेल तर तो जनाबाईच्या. जनाबाई थेट देवाला कचकचीत शिव्याच हासडते,
अरे विठ्या विठ्या विठ्या। मूळ मायीच्या कारट्या।
तुझी रांड रंडकी झाली। जन्म सावित्रा चुडा ल्याली।
तुझे गेले की रे मडे। तुला पाहुनी काळ रडे॥
उभ्या राहूनी अंगनी। शिव्या देते दासी जनी॥
अशा अनुरागाने भरलेले अभंग सर्वच संतांच्या साहित्यात पाहायला मिळतात. त्यातूनच देवाबद्दल असणारा दरारा कमी होऊन; देव कुणा परलोकातला नाही तर आपल्यातलाच आहे. आपला सखा, सोबती आहे, आपल्या मदतीला धावून येणारा आहे, असे वाटते. मग संसारिक जबाबदा-या सांभाळतानाही तो आपल्या सोबत असल्याचा आधार मिळतो.
जनाबाईला जात्यावर दळताना, सावता महाराजांना शेतात खुरपताना, नरहरी सोनारांना दागिने घडवताना आणि गोरोबा काकांना मडकी घडवताना; इतकेच नव्हे तर सज्जन कसायांना मांस विकताना आणि चोखोबांना मेलेली जनावरे ओढतानासुद्धा तो आपल्यासोबत असल्याची जाणीव होते.
या जिव्हाळ्यातूनच मग पंढरपूर हे माहेर वाटू लागते. चंद्रभागा बहीण तर पुंडलिक बंधू वाटू लागतो. हे नाते केवळ बहीण-भावापुरते मर्यादित राहात नाही, तर ते प्रिय सखा, पतीसारखे होते. तुकाराम महाराज आपले भगवंताविषयी असणारे नाते स्पष्ट करताना म्हणतात,
पतीव्रते जैसा भ्रतार प्रमाण। आम्हा नारायण तैशापरी।।
पतीव्रता स्त्रीला ज्याप्रमाणे आपला पती हाच प्रमाण आहे. त्यामुळेच त्याच्याविषयीचा जिव्हाळा आमच्या मनात निर्माण होतो. हा जिव्हाळा वारक-यांमध्ये रुजलेला असल्यामुळे मोठया ओढीने ते पंढरपूरच्या दिशेने त्याच्या भेटीला निघतात. अर्थात वारक-यांचे, संतांचे हे प्रेम एकतर्फी आहे काय? असा प्रश्न विचारला असता तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जितक्या आवडीने त्याच्या भेटीला जातो, तितक्याच आवडीने तो आमची वाट पाहतो.
वाट पाहे उभा भेटीची आवडी। कृपाळू तातडी उतावेळ॥
म्हणूनच त्याची भेट झाली की, बावीस दिवस केलेल्या प्रवासाचा शीण निघून जातो.
भाग गेला शीण गेला। अवघा झाला आनंद।
अशी अवस्था होते. जितकी आवड भक्तांना देवाविषयी आहे, तितकीच आवड देवालाही भक्तांविषयी आहे. म्हणूनच तो अत्यंत उतावीळ होऊन या भक्तांची वाट पाहतो. त्यांच्या भेटीने सुखावून जातो आणि जेव्हा वारकरी माघारी परत निघतात, तेव्हा हा देवही भावूक होतो, असा अनुभव नामदेव महाराज सांगतात. वारी करून वारकरी परत फिरतात, तेव्हा देव किती व्याकूळ होतो. याविषयी देव म्हणतो,
तुम्ही जाता गावा। हुरहुर माझ्या जीवा।
भेटता केधवा। मजलागी।।
इतकेच नव्हे, तर तुमच्याशिवाय या जगात माझे प्रेमाचे कुणी नाही. मला असे एकटयाला सोडून जाऊ नका.
मज नाही कोणी तिन्ही त्रिभूवनी। म्हणे चक्रपाणी नामयाशी॥
संतांनी रुजवलेला हा प्रेमभावच वारकरी आजवर जीवापाड जपत आहेत. प्रेमामध्ये कोणत्याही लाभाची अपेक्षा नसते. तशीच पांडुरंगाच्या दर्शनामध्ये कोणत्याही लाभाची अपेक्षा ठेवून वारकरी जात नाहीत. अपेक्षाच नसल्यामुळे अपेक्षाभंगाचे दु:ख त्यांना होत नाही. म्हणूच तो प्रेमाचा झरा कधी आटत नाही. उलट शेकडो वर्षानंतरही तो दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचाच विराट ओघ वेगवेगळ्या संतांच्या दिंडय़ांतून निघालेला दिसून येतो. हा ओघ आता पुन्हा आपापल्या गावाच्या दिशेने निघाला आहे.