‘व्हॅलेंटाइन्स डे’ हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत भारतातील तरुणाईच्या आता अंगवळणी पडू लागली आहे. तसे पाहायला गेल्यास ज्या संत व्हॅलेंटाइनच्या नावावर हा दिवस आहे, त्याच्या एकूण अस्तित्वाबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात.
‘व्हॅलेंटाइन्स डे’ हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत भारतातील तरुणाईच्या आता अंगवळणी पडू लागली आहे. तसे पाहायला गेल्यास ज्या संत व्हॅलेंटाइनच्या नावावर हा दिवस आहे, त्याच्या एकूण अस्तित्वाबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात. गुढतेचे वलय असणा-या अशा एक नव्हे तीन व्हॅलेंटाइन नावाच्या संतांना कॅथलिक चर्चची मान्यता आहे. त्यापैकी रोमन सम्राट क्लॉडियसच्या काळातील संत व्हॅलेंटाइन याचा या प्रेमदिनाशी संबंध लावता येईल. कारण सम्राट क्लॉडियसने ‘सैन्यातील शिपायांनी लग्न करू नये’, असा फतवा काढला होता. अर्थात त्यामागे काही कारणेही होती. सम्राटाच्या मते, ज्यांचे लग्न झालेले असते, ते जीवावर उदार होऊन लढत नाहीत.’, परंतु संत व्हॅलेंटाइनने राजाच्या या धोरणाविरोधात जाऊन या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून देण्याचा धडाका लावला होता. राजाला व्हॅलेंटाइनच्या त्या कृतीचा खूप राग आला. त्यामुळे चिडून जाऊन त्याने व्हॅलेंटाइनला देहदंड दिला. ज्या दिवशी व्हॅलेंटाइन यांना मरण आले, तो दिवस ‘व्हॅलेंटाइन्स डे’ अर्थात प्रेमदिन म्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपीय देशात सुरू झाली. पण ती प्रेमीकजनांनी एकमेकांना फुले, चॉकलेट आदी भेटी देण्यापुरतीच मर्यादित होती. गेल्या ५० वर्षात अमेरिकेतील काही हुशार व्यावसायिकांनी ‘व्हॅलेंटाइन्स डे’ हा एक ‘इव्हेंट’ आहे, त्यामध्ये बौद्धिक आणि आर्थिकदृष्टय़ा सबळ व स्वतंत्र असणारी तरुणाई गुंतू शकते, असा अंदाज बांधला आणि हळूहळू या दिवसाला ‘प्रेम उत्सव दिन’ बनवण्यासाठी वातावरणनिर्मिती केली. अमेरिकेपाठोपाठ गेल्या दोन दशकांत व्हॅलेंटाइन्स डे सर्व खंडात पोहोचलाय. भलेही स्थानिक संस्कृतीशी त्याचे काहीही नाते नसले तरी जागतिकीकरण आणि बाजारीकरणाचा प्रभाव इतका जबरदस्त की व्हॅलेंटाइन्स डे आता जगभरातील प्रेमीजनांना आपला वाटू लागलाय. यंदा मात्र योगायोगाने वसंतपंचमी आणि व्हॅलेंटाइन्स डे एकाच दिवशी आलेला आहे. हल्लीच्या तरुणाईला भलेही वसंतपंचमीचे महत्त्व ठावूक नसले, परंतु हल्ली हल्लीपर्यंत वसंतपंचमी हा भारतीय तरुणाईसाठी प्रेमदिवस होता. होय, प्राचीन वाङ्मयात, ऐतिहासिक कथा-कवितांमध्ये वसंतपंचमीच्या दिवशी तरुण, मुले-मुली कशाप्रकारे एकत्र येत, नाचणा-यांमध्ये रंगून जात असत त्याचे अनेक उल्लेख येतात. वसंतपंचमीला प्रेमाचा दिवस मानण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण होते, ते म्हणजे भारतीय वाङ्मयात ज्याचा उल्लेख प्रीतीदेवता असा केला जातो, त्या कामदेवाचा जन्म वसंतपंचमीचा, म्हणून आजही अनेक ठिकाणी रती-मदनाची पूजा केली जाते. खास करून आपले वैवाहिक आयुष्य सुखी राहावे यासाठी ही पूजा करण्याचा भारतात प्रघात होता. एकूण काय तर पाश्चिमात्य बाजारपेठेतून आयात केलेला ‘व्हॅलेंटाइन्स डे’ माध्यमांच्या प्रभावामुळे सर्वदूर पोहोचला. त्यातही कडव्या हिंदू संघटनांनी त्याला अकारण विरोध केल्यामुळे तर तो अधिक प्रकाशात आला आणि वसंतपंचमीच्या जागी ‘प्रेमदिन’ म्हणून कधी स्थानापन्न झाला, हे लोकांना कळलेही नाही. अर्थात हे सांस्कृतिक अभिसरण जगाच्या आरंभापासून असेच होत आले आहे. त्याला कुणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्यापेक्षा आपण सर्वानी प्रेमदिनाकडे प्रेमपूर्वकच पाहायला हवे.यंदा तर वसंतपंचमीला हा योग जुळून आला आहे. चराचरातील चैतन्यदायी बदल वसंताचे आगमन झाल्याची वार्ता देत आहेत. फुलांच्या ताटव्यांनी पृथ्वीचा हिरवाकंच शालू बहरून गेलेला आहे. हवेला पुष्पसुगंधाची जोड मिळाल्याने अवघा आसमंत धुंदावलाय, गंधावलाय आणि अशा गंधवेडय़ा आसमंतात कोकिळकूजन ऐकल्यावर प्रेमीजन मोहरून जाणार नाही तर काय?
होय, आज अवघ्या आसमंतात प्रेमाचा गंध पसरलाय.. तारुण्याच्या उत्सवाला प्रेमाचा स्पर्श होणे ही खूप अनोखी अपूर्वाई. परंतु त्या अपूर्वाईचा अनुभव मानसिक पातळीवरही घेता येतो, याचे भान आमच्या नव्या पिढीला उरलेले नाही. ही अशरीरी प्रेमाची उदात्त कल्पना आमच्या अभिजात भारतीय संस्कृतीचा अविभाज्य हिस्सा आहे. तुम्ही जयदेवाचे ‘गीत गोविंद’ वाचा किंवा ऐका, राधा-कृष्णाच्या प्रीतीचे ते शब्दस्मारक आहे. त्यातील प्रत्येक ओळ आपल्याला कृष्णप्रेमाची माधुरी, गोडी अनुभवण्याची संधी देते. ज्ञानोबा माऊलींच्या विरहिणीमध्येही अगदी तसाच प्रत्यय येतो, संत मीराबाईसुद्धा अशीच कृष्णवेडी. राजघरातील त्या प्रेमदिवाण्या मीरेने कृष्णासाठी विषाचा प्याला सहजपणे स्वीकारला. काय असेल त्या प्रेमाची उंची.. आज आपण आपल्या संस्कृतीतील या प्रेमप्रतीकांना विसरत चाललोय. या प्रेमदिनाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. कारण या सांस्कृतिक प्रतीकांनीच भारतीय लोकमानस घडवले आहे.
भारतीय संस्कृतीत प्रेम हे मनोमीलनाशी जोडले आहे. त्यामुळे पाश्चिमात्य संस्कृतीला जेव्हा भारतीय वाङ्मय समजले तेव्हा ते प्रेमाच्या या अशरीरी भावनेने थरारून गेलेले दिसले होते. या अपार्थिव प्रेमाची असंख्य उदाहरणे आपल्याकडे आहेत. लोकनायक जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या पत्नी प्रभावती यांची प्रेमकहाणी तर हल्लीच्या तरुणाईला बरंच काही शिकवणारी आहे. प्रेमाचा अधिकार गाजवणारे अनेक तरुण मुलींवर अॅसिड फेकण्याच्या वा चाकू हल्ले करण्याच्या बातम्यांमध्येच दिसतात. जरासा नकार त्यांच्या मनातील राक्षसाला बाहेर येण्यास प्रवृत्त कसा करतो हे आजकाल सर्रास दिसते. जयप्रकाशजी आणि प्रभावतीजी यांची प्रेमकहाणी म्हणूनच आज मला अद्भुत वाटते. देशात स्वातंत्र्यचळवळ ऐन भरात असताना हे दोघे जण प्रेमात पडले. त्याच सुमारास जयप्रकाशजींना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. ते अमेरिकेत गेले. इकडे प्रभावतीजी गांधीजींच्या वर्धा आश्रमात निघून आल्या. १९२९ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी जेपी भारतात आले. त्यांनी प्रभावतीजींना लग्नाची मागणी घातली. त्या म्हणाल्या, ‘लग्न केले असते, परंतु महात्मा गांधी यांच्यासमोर मी ब्रह्मचर्याची शपथ घेतली आहे. ती मोडायची कशी? मला ती मोडणे शक्य नाही. त्यामुळे लग्नही शक्य नाही.’ तरुण जयप्रकाश क्षणाचा विलंब न लावता उद्गारले, ‘मी तुझ्या शपथेच्या आड येणार नाही. मग चालेल?’ प्रभावतीजींनी होकार दिला.. आणि भारतीय राजकारणात जयप्रकाशजी-प्रभावतीजी एक आदर्श जोडपे म्हणून अजरामर झाले.. त्याग हे प्रेमाचे दुसरे नाव असावे.. म्हणून ‘क्षण एक पुरे प्रेमाचा.. वर्षाव पडो मरणांचा’ असे म्हणत असावेत!