बारावीची परीक्षा सुरू आहे आणि आता दहावीची परीक्षा सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात या दोन्ही परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दोन परीक्षांमधला एक फरक कमालीचा लक्षणीय आहे.
बारावीची परीक्षा सुरू आहे आणि आता दहावीची परीक्षा सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात या दोन्ही परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दोन परीक्षांमधला एक फरक कमालीचा लक्षणीय आहे. बारावीच्या परीक्षेला राज्यामध्ये १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थी बसले आहेत आणि मंगळवारी सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेला १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थी बसलेले आहेत.
याचा सरळ अर्थ असा की, दहावीच्या परीक्षेला बसणारे चार लाख विद्यार्थी सामान्यपणे बारावीपर्यंत पोहोचत नाहीत. मध्येच गळून जातात. यात विद्यार्थिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे. एका पाहणीनुसार, शंभर विद्यार्थिनी पहिलीत असतील तर महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत त्यातल्या अवघ्या चौदा ते पंधरा मुली पोहोचतात. म्हणजे शंभरामधल्या ८५ विद्यार्थिनी वाटेतच गळून पडतात. ग्रामीण भागात या गळून जाणा-या विद्यार्थिनींचे प्रमाण अधिक आहे. त्याच्या कारणांची चर्चा अनेक वेळा झालेली आहे; पण मुलींच्या गळतीमध्ये फरक नाही. खेडय़ापाडय़ात ते प्रमाण जास्त आहे.
मुलींना शिकून काय फायदा, हा विचार ग्रामीण भागात अजूनसुद्धा काही प्रमाणात आहे. शेतीच्या कामाला घरातल्या मुलींना राबवण्याचे प्रमाणही खूप मोठय़ा प्रमाणावर आहे. शिवाय बहुसंख्य पालकांची अशी मानसिकता असते की, मुलींना शिकवून काय फायदा, त्यापेक्षा लवकर लग्न करून टाकले की, मोकळे झालो. अशी ‘मोकळे होण्याची’ मानसिकता मुलींचे व्यक्तिमत्त्व बनवण्याच्या आड येत असते. त्याचा परिणाम ग्रामीण भागातल्या मुलींवर मोठय़ा प्रमाणात होत असतो.
तरी एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, ग्रामीण भागातल्या विविध खासगी संस्थांनी शिक्षणाचा प्रसार अतिशय झपाटय़ाने केलेला आहे. ज्या काळात ही संस्थात्मक वाढ झाली तेव्हा अशी चर्चा सुरू झाली होती की, गुणात्मक वाढ झाली आहे का? परंतु पहिला संकल्प असाच असला पाहिजे की, प्रथम शिक्षण खेडय़ापाडय़ात जाऊ द्या आणि मग गुणवत्तेची चर्चा करू या. शिवाय आता शहरे आणि खेडय़ांच्या तुलनेत खेडय़ांमध्ये गुणवत्ता नाही, असा आक्षेप कुणालाही घेता येणार नाही.
मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या मोठय़ा शहरांची मक्तेदारी लातूरमधल्या विद्यार्थ्यांनी अनेक वष्रे मोडीत काढलेली आहे. याचाच अर्थ असा की, इथे गुणवत्ता आहे, ती खेडय़ातसुद्धा आहे. आणखीन एक फरक असा की, गेली अनेक वष्रे या गुणवत्तेच्या यादीमध्ये मुलींची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. हा फरक शहरांमध्येही आहे आणि खेडय़ांमध्येही आहे. मुंबई, पुण्यात तर अनेक वष्रे मुलीच पहिल्या दहामध्ये आहेत. गुणवत्तेतील मुलींची आघाडी लक्षणीय आहे.
आणखी एक निरीक्षण असे दिसते आहे की, दहावीच्या परीक्षेत आता जे काही सतरा लाख विद्यार्थी बसले आहेत, त्यातले ज्याला गुणवत्ता गुणवत्ता म्हणतात, त्या यादीत सतरा लाखांतले किती विद्यार्थी पोहोचतात. बारवीच्या परीक्षेत तेरा लाख विद्यार्थी बसले त्यातले किती विद्यार्थी नव्वदच्या पुढे येतात. आज जी नामवंत महाविद्यालये आहेत. त्यांना आवश्यक असलेली विद्यार्थी संख्या मर्यादित आहे. संबंध महाराष्ट्राचा विचार केला तर गुणवत्ता यादीतील प्रत्येक केंद्रातील शंभर असे गृहीत धरले तर सहा केंद्रीय विभागांतून सहाशे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असे गृहीत धरू या म्हणजे नव्वद ते पंच्यानव इतक्या मार्काच्या यादीत आहेत; पण या खेरीज ज्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्याच्या खाली गुण मिळणार आहेत किंवा ८० टक्के किंवा ७५ टक्केवाला आहे तो दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाला तरी गुणवत्तेच्या स्पध्रेच्या जगात नालायक ठरतो.
त्यामुळे ही स्पर्धा ही सतरा लाखात हजार मुलांसाठीच आहे. मग बाकीच्या विद्यार्थ्यांचे काय? जे पहिल्या वर्गात उत्तीर्ण होतात, त्यांनाही नामवंत महाविद्यालयात प्रवेश नाही. त्यामुळे तो विद्यार्थीसुद्धा रडत आहे. मग जी ५० टक्के मुले नापास होतात, त्यांचे भवितत्व्य किती गडद अंधारात आहे. त्यामुळे या सगळया गुणवत्ता आणि स्पर्धा शैक्षणिक युगात शिक्षणतज्ज्ञांनी या परीक्षा पद्धतीचाच फेरविचार करण्याची फार गरज आहे.
तशी कोणतीही परीक्षाही चतकोरभर कागदावरचीच आहे. त्या चतकोरभर कागदावरून आपण विद्यार्थ्यांची लायकी- नालायकी ओळखायची म्हटली तर गुणवत्ता यादीत न येणाऱ्यांचे भवितव्य गडद अंधारात राहील आणि म्हणून आवडीप्रमाणे शिक्षण किंवा पायाभूत रोजगार शिक्षण अशी व्यवस्था शिक्षणात करावी लागणार आहे. कुणी मान्य करो अथवा न करो शाळेत किंवा महाविद्यालयात घेतलेल्या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात नेमका किती टक्के उपयोग आहे? याचाही एकदा शास्त्रशुद्ध अभ्यास होण्याची गरज आहे.
जीवनातील अनुभवाच्या शिक्षणाचे पदवीधर अनेक वेळा महाविद्यालयात पदव्या मिळवलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक सरस निघतात आणि जीवनाची अनेक क्षेत्रे पादाक्रांत करतात. याचा अर्थ शिक्षणाला दुय्यम लेखावे, असे नाही. शिक्षणाशिवाय सगळेच काही अर्थहीन आहे; पण अलीकडे गुणवत्तेचा हव्यास ज्या पद्धतीने धरला जातोय ती गुणवत्ता किंवा ती बुद्धिमत्ता सर्वच विद्यार्थ्यांकडून अपेक्षित धरता येणार नाही. ‘अ’ च्या तोडीचा ‘ब’ विद्यार्थी असणारच नाही.
पण म्हणून ‘ब’ नालायक ठरत नाही. याचा शिक्षणशास्त्रात कुठेतरी हिशोब करण्याची गरज आहे. तो हिशोब होत नाही म्हणून पहिल्या वर्गातला विद्यार्थीही हताश आणि निराश आहे. नापास होणा-या ५० टक्के विद्यार्थ्यांचा विषय तर त्याच्या पलीकडचा आहे. या स्थितीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे महत्त्व वादातीत असले तरी गुणवत्तेचा अतिरेक होऊ नये एवढे शिक्षणतज्ज्ञांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवाय खेडय़ातल्या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांची तुलना मुंबईतल्या मोठमोठय़ा क्लासला जाणा-या विद्यार्थ्यांशी करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. अशी तुलना अन्यायीसुद्धा आहे.
कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा दलित विद्यार्थ्यांची वेगळी व्यवस्था केली तेव्हा टीका झाली होती. त्याला उत्तर न देता महाराजांनी दहा पोती हिरवागार हरभरा राजवाडय़ाच्या मध्यवर्ती जागेत आणून ओतला.?महाराजांच्या रथाची धष्टपुष्ट जोडी हरभरा खायला सोडली आणि त्याचवेळी कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या टांगेवाल्यांच्या घोडय़ांनाही आणले. धष्टपुष्ट घोडय़ांनी टांगेवाल्यांच्या घोडय़ांना लाथा घातल्या आणि सगळा हरभरा फस्त केला. समाजातली विषमता अशा स्वरूपाची असते. धष्टपुष्टांच्या लाथा खाव्या लागतात आणि म्हणून एका समान पातळीवर तुलना कधीही होणार नाही. दहावी, बारावीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या यशाकडे याच भावनेने पाहिले पाहिजे.