दाभोळ येथील रत्नागिरी गॅस वीज प्रकल्प येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.
मुंबई- दाभोळ येथील रत्नागिरी गॅस वीज प्रकल्प येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. तसेच या प्रकल्पाच्या विभाजनासही मान्यता दिली आहे. यामुळे नैसर्गिक वायू टर्मिनल व वीज निर्मिती कंपनी अशा दोन स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. मात्र या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही केवळ रेल्वेला पुरवली जाणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात गॅसवर आधारित १४ हजार मेगावॉटचे प्रकल्प बंद पडलेले आहेत.
वीज प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दाभोळ वीज प्रकल्पात १२ हजार कोटींची गुंतवणूक झालेली आहे. त्यामुळे परदेशातून आयात केलेल्या द्रवरूप नैसर्गिक वायूवर चालवण्यात येणार आहे.
या प्रकल्पातून निर्माण होणारी ५०० मेगावॉट वीज ४ रुपये ७० पैसे प्रति युनिट या दराने रेल्वेला पुरवली जाणार आहे. सोबत वीज निर्माण करताना कंपनींना राज्य सरकारने विविध करांमध्ये सूट देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी राज्य शासनावर ४ हजार ३५० कोटींचा आर्थिक भार पडणार आहे.