मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जे चित्र भाजपाकडून निर्माण करण्यात आले होते ते फार काळ टिकेल, असे वाटत नाही.
मुंबई- मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जे चित्र भाजपाकडून निर्माण करण्यात आले होते ते फार काळ टिकेल, असे वाटत नाही. तसे संकेत आता जनतेकडूनच मिळत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी परदेशात काय बोलावे व काय नाही, यांची एक शिस्त असते.
भाजपा सरकारच्या राज्यात ही शिस्त पाळली जात नाही. त्यामुळे देशाची धुणी परदेशाच्या घाटावर धुऊ नका, अशा कठोर शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खडसावले.
माटुंगा येथील यशवंत नाटय़गृहात ‘प्रहार’च्या ७ व्या वर्धापन दिन सोहळय़ानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसने अनेक वर्षे या देशाचा कारभार चालवला. आम्ही सत्तेत असताना देशाची प्रतिमा डागाळली जाणार नाही, यांची कायम दक्षता घेतली.
देशातील इतर राजकीय पक्षांसोबत आमचे कितीही मतभेद असले तरी हे सर्व मतभेद परदेशात जाताना आम्ही विसरत होतो. परदेशात केवळ आपण भारताचे प्रतिनिधी आहोत, यांची जाणीव आम्हाला असे. मात्र केंद्रात नरेंद्र
मोदीप्रणीत भाजपा सरकार आल्यापासून अशी कोणतीही खबरदारी देशाच्या नेतृत्वाकडून घेतली जात नसल्याचे चित्र आहे. देशातील वैचारिक मतभेद परदेशात जाहीरपणे बोलले जात आहेत. त्यासाठी कोणतेही संकेत पाळले जात नाहीत, अशी अप्रत्यक्ष टीकाही सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर केली.
‘अच्छे दिन’ स्वप्न फार काळ टिकणार नाही
मोदींनी लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून निर्माण केलेले चित्र फार काळ टिकणार नाही. तसे संकेतच जनतेकडून मिळत असून भाजपाचा मुखवटा टराटरा फाडला गेल्याचे सूचक वक्तव्यही शिंदे यांनी केले.
सुशीलकुमार यांनी आपल्या खास शैलीत देशात निर्माण झालेल्या गोंधळी परिस्थितीचा समाचार घेतला. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून मोदी सरकारने देशातील गोरगरीब व तळागळातील जनतेची घोर फसवणूक केल्याची टीकाही त्यांनी केली.
‘प्रहार’च्या उपक्रमाचे कौतुक
दैनिक ‘प्रहार’च्या वाटचालीबाबत आपली खास निरीक्षणेही नोंदवताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘प्रहार’च्या उपक्रमाचे कौतुकही केले. कायम प्रसन्नचित्त असलेल्या सुशीलकुमार यांनी आपल्या भाषणात अधूनमधून विविध किस्से सांगितल्याने काही काळ गंभीर झालेल्या सभागृहात हास्याचे कारंजेही फुलले. आपल्या भाषणात मान्यवर आणि ‘प्रहार भूषण पुरस्कारा’च्या मानक-यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
र. ग. कर्णिक म्हणजे, सद्गुणी व्यक्तिमत्त्वाला पुरस्कार
आपल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांनी प्रथम सरकारी कर्मचा-यांची संघटना उभी करणारे कामगार नेते र. ग. कर्णिक यांचे अभिनंदन करताना त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सुशीलकुमार शिंदे पोलीस दलात अधिकारी असताना कर्णिक जेव्हा आंदोलने, मोर्च काढायचे त्यावेळी त्यांना पकडताना कर्णिकसाहेब पोलिसांना कशी हुलकावणी द्यायचे, त्याचे सुंदर किस्सेही त्यांनी सांगितले व सभागृहात एकच हास्य फुलले.
कर्णिकांची लढाई ही केवळ पगारापुरती नव्हती तर सकारात्मक आणि विकासकामाला दिशा देणारी होती. त्यांचा दैनिक ‘प्रहार’ने केलेला सत्कार म्हणजे सद्गुणी व्यक्तिमत्त्वाला पुरस्कार आहे, अशा शब्दांत त्यांनी दैनिक ‘प्रहार’च्या पुरस्काराचे आणि कर्णिकांच्या कार्याची प्रशंसा शिंदे यांनी केली.
‘दगडी चाळ’मध्ये अंकुशने जीव ओतून भूमिका साकारली
दैनिक‘प्रहार’ने यावेळी अभिनेता अंकुश चौधरीचाही सन्मान केला. अंकुश चौधरी हा अष्टपैलू प्रतिभाशाली कलाकार आहे. आपण नुकताच त्याचा दगडी चाळ नावाचा नवा सिनेमा पाहिला व आज आपणास त्याचा सत्कार करण्याची संधी मिळाली.
अभिनयाच्या माध्यमातून अंकुश घराघरात पोहोचला आहे. आपला तो चांगला मित्र आहे. दगडी चाळ सिनेमात त्यांनी जीव ओतून भूमिका साकारली आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी अंकुश चौधरीच्या कामाचे कौतुक केले.
अर्थसंकल्पावर प्रभावी बोलणारे नारायण राणे भावले
आपल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि दैनिक ‘प्रहार’चे सल्लागार संपादक नारायण राणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले. राणेसाहेब विरोधी पक्षनेते असताना त्यांचा दबदबा कसा होता याचे किस्सेही त्यांनी सांगितले. राणेसाहेब विरोधी पक्षनेते असताना अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण बोलायचे.
अत्यंत अचूक माहिती घेऊन ते सभागृहात बोलायचे. त्यांची प्रत्येक माहिती सत्ताधारी पक्षाची कोंडी करणारी असायची. अशा प्रकारे अर्थसंकल्पावर प्रभावीपणे बोलणारे नारायण राणे आपल्याला खूप भावले. राणेसाहेबांना खोटे अजिबात सहन होत नाही. खोट बोलणा-यांना ते अजिबात माफ करत नाहीत. खोटे सहन झाले नाही तर मुख्यमंत्र्यांची ते गैय करत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी नारायण राणे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.
सत्य आणि असत्याचा समतोल साधून ‘प्रहार’ने वाटचाल करावी
सत्कारमूर्तीवर बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी दैनिक ‘प्रहार’बाबत आपली खास निरीक्षणे नोंदवली. काही महिन्यांपूवी शिंदे यांनी दैनिक ‘प्रहार’च्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ‘प्रहार’च्या टीमसोबत मनमोकळय़ा गप्पा केल्या होत्या. अमेरिकेतील एखाद्या दैनिकाचे सुसज्ज कार्यालय असावे तसे ‘प्रहार’चे कार्यालय वाटत होते.
शिवाय कार्यालयातील प्रत्येकाकडून शिस्तपालनही होत होते. यासाठी त्यांनी संपादकांचे विशेष कौतुक केले. आपण जेथे राहतो त्या सोलापूरमध्ये दैनिक ‘प्रहार’ वाचला जातो. आपण तो वाचतो. मात्र नारायण राणे आपले मित्र आहेत म्हणून नाही तर दैनिक ‘प्रहार’ सोलापुरात पोहोचला, लोकांना तो वाचनीय वाटतो म्हणून लोक वाचतात, असेही ते म्हणाले.
वर्तमानपत्र चालवणे हे सोपे काम नाही. केवळ सत्य मांडून वर्तमानपत्र चालवता येत नाही. सत्य व असत्याचा समतोल आपल्या वृत्तपत्रात असावा लागतो. दैनिक ‘प्रहार’नेही सत्य आणि असत्याचा समतोल साधत आपली पुढची वाटचाल करावी, अशा शुभेच्छाही सुशीलकुमार शिंदे यांनी ‘प्रहार’ला दिल्या.