मराठी नाटयरसिक, कलावंतांशी हृद्य नाते जोपासणा-या दादरमधील शिवाजी मंदिराने ३ मे रोजी ५० वर्ष ओलांडली. या नाटयगृहाशी प्रेक्षक, कलावंत, निर्माते सा-यांचे ऐतिहासिक ऋणानुबंध जोडले आहेत. या नाटयगृहात झालेल्या पहिल्या प्रयोगाची आठवण कलावंतांनी आपल्या हृदयात साठवून ठेवली आहे. अशा या नाटयगृहाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आज (७ मे) शिवाजी मंदिरात दुपारी ३.३० वाजता होणार आहे, त्यानिमित्त..
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये नाटयगृहांनी कलावंत आणि प्रेक्षकांशी आपले खास नाते विणले आहे. त्या नाटयगृहात प्रयोग करणे नव्या कलावंतांसाठी एक ऐतिहासिक क्षण असतो. त्या पहिल्या प्रयोगाच्या आठवणींसह कलावंतांचा रंगप्रवास फुलत जातो.
नाटयप्रेमी महाराष्ट्रात गावोगावी अशी नाटयगृहे आजही प्रतिष्ठा राखून आहेत. त्यातले महत्त्वाचे नाटयगृह म्हणजे दादर येथील श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचे (ट्रस्ट) श्री शिवाजी मंदिर नाटयगृह. या नाटयमंदिराने ३ मे रोजी आपली ५० वर्षे पूर्ण करून ५१व्या वर्षात पदार्पण केले आहे.
पन्नाशी ओलांडण्याचा सुवर्ण महोत्सवी सोहळा गुरुवारी (७ मे) दुपारी ३.३० वाजता माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे.
मराठी नाटय व्यवसायात असणा-या प्रत्येकाचे या नाटयगृहाशी नाते आहेच. व्यावसायिक मराठी नाटकात काम केले पण शिवाजी नाटयगृहाशी आपला संबंध नाही, असा एकही माणूस मराठी रंगभूमीवर सापडणार नाही. असा कुणी असेल, तर ते नवल वाटण्यासारखे ठरेल. याच ‘शिवाजी नाटयमंदिरा’विषयीची आस्था महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात नाटयसेवा करणा-या रंगकर्मनाही असतेच. आपल्याही नाटकाचा प्रयोग ‘शिवाजी’ला झाला पाहिजे, हे हौशी रंगकर्मचे स्वप्न असते. एखाद्या नाटय महोत्सवात ‘शिवाजी’मध्ये प्रयोग करण्याची संधी मिळाली तर तो त्या कलावंतांसाठी सुवर्णक्षण असतो.
शिवाजी मंदिरात प्रवेश करताच या नाटयगृहात होणा-या प्रयोगांच्या वेगवेगळ्या नाटकांच्या फलकांनी आपले स्वागत होते. ज्या नाटकाचा प्रयोग झाला, त्या नाटकाचा फलक एक्झिट होतो आणि नव्या नाटकाच्या फलकाची एन्ट्री होते. अशा आगामी दहा-बारा नाटकांचे फलक आपल्याला दिसत असतात. हे फलक फक्त फलक नसतात, तर ते ज्येष्ठ कलावंतांना आपले नाव पहिल्यांदा या फलकावर झळकले होते, याची आठवण करून देतात. हेच फलक नव्या रंगकर्मना आपले नाव ‘शिवाजी’च्या फलकावर लागल्याची प्रेरणा देतो आणि या फलकावर आपलेही नाव कधीतरी येईल, अशी स्वप्न नवे कलवंत सजवत असतात.
शिवाजी नाटयगृहातील हा प्रवेश वेगवेगळ्या कलावंतांशी नाते विणण्याचे काम करतो आहे, करत आला आहे. प्रेक्षक या फलकावरील माहिती वाचून त्या कलावंतांच्या आधीच्या नाटकातील भूमिका आठवून पाहतात. त्यात रंगून जातात. असे हे नाते आहे.
दादरमधील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेले हे नाटयगृह आहे. रंगकर्मच्या भेटीगाठीची ही आपली हक्काची जागा आहे. ‘शिवाजी’समोर भेट, असे म्हणताच वेगळा पत्ता देण्याची गरज राहत नाही. तासन् तास शिवाजीच्या परिसरात एक-दुस-यांना नाटकवाले भेटतात.
दोघांच्या भेटीतच अनेक जण अनाहुतपणे भेटून जातात. जुने मित्र नव्या मैत्रीचे नाते विणतात. दोघांच्या भेटीत तिसरा येतो आणि बोलता-बोलता नव्या नाटकाचा विषयही सापडतो. लेखकाला दिग्दर्शक भेटतो. निर्मात्याला कलावंत सापडतो. चहाच्या सोबतीने नेपथ्याचा आराखडाही तयार होऊन जातो. असे असंख्य नाटकामागच्या नाटय़ाचे शिवाजी साक्षीदार झाले आहे.
गेल्या ५० वर्षात शिवाजी मंदिरातील तिकीट काऊंटरपासून तर मेकअप रूमपर्यंतच्या असंख्य आठवणींचा खजिना असलेले कलावंत मुंबईत आहेत. पुण्यात, औरंगाबादेत, विदर्भात, कोकणात आहेत. मुंबई-पुण्याबाहेरच्या रंगकर्मचे या नाटयगृहाचे नाते एखाद्-दुस-या प्रयोगापुरते मर्यादित असेल, पण ती आठवण त्यांनी आपल्या हृदयात आयुष्यातील अजरामर क्षण म्हणून साठवून ठेवली आहे.
नाटकातून अनेक कलावंत वेगवेगळ्या माध्यमात गेले. कुणी टीव्ही मालिकेत स्थिरावले, कुणी चित्रपटांत आपला जम बसवला. पण त्यांना ‘शिवाजी’ कधीही विसरता येणे नाही. शिवाजी मंदिरात मिळालेल्या टाळ्यांचा कडकडाट कलावंतांना जग जिंकण्याच्या आनंदापेक्षा मोठा आनंद वाटतो. तंत्रज्ञांना, कलावंतांना या नाटयगृहात मिळालेला रसिकांचा प्रतिसाद नवा उत्साह देऊन जातो. ही या वास्तूची ताकद आहे.
मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या या वास्तूची पुनर्बाधणी करून मोठ्ठी इमारत उभारावी, असे कुणालाही वाटू शकते. त्या इमारतीतील काही जागा व्यावसायिक प्रतिष्ठानांना विकून थिएटरचा खर्च सहज भागवला जाऊ शकेल, असेही सहज मनात येईल. पण ही ऐतिहासिक वास्तू आहे तशीच ठेवण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ आजही ठाम आहे. रंगमंदिर नवे बांधता येईल, सुसज्ज करता येईल, पण त्यात नाटयप्रयोगाला लागणारे वातावरण आज आहे तसे तयार करणे जमणार नाही, हे कदाचित या ट्रस्टला कळले असावे.
या मंदिराशी असलेल्या रसिक-कलावंतांच्या आठवणी त्यांना उद्ध्वस्त करायच्या नसाव्यात. नागपुरातील विदर्भ साहित्य संघाचे धनवटे रंगमंदिर असंख्य नाटयवेडय़ांच्या आठवणींचे माहेरघर होते. ते माहेरघर तोडले. मोठ्ठी इमारत उभी राहिली. वेगवेगळी व्यावसायिक प्रतिष्ठाने सज्ज झाली; पण १७-१८ र्वष झाली तरी नाटयगृह सुरू झाले नाही.
नागपूरच्या धनवटे रंगमंदिरासारखे ‘शिवाजी’चे होऊ नये, असेही ट्रस्टला वाटत असेल. काहीही असले तरी हे नाटयकर्मचे रंगमंदिर सुस्थितीत ठेवणा-या शिवाजी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांबद्दल आपण सा-या रंगकर्म्ीनी आज सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. या ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत भालेकर, सरचिटणीस चंद्रकांत सावंत, उपाध्यक्ष प्रतापराव तोरसकर, कार्यकारी विश्वस्त भालचंद्र चव्हाण, चिटणीस नारायण सावंत या साऱ्यांना सलाम केलाच पाहिजे.