आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल? समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखोद्गत केले, प्रवचने ऐकली, तरी मनाला समाधान लाभणार नाही. नामात राहिले पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्यभावाने शरण जाऊन, त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या. एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठय़ा कष्टाने तो पायी चालला होता. वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले, ते बंद होते म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकऱ्याच्या मनात आले, ‘देवा, तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशी आणि हा लबाड व्यापारी, याला मात्र तून सर्व ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय तुझा हा न्याय!’ एवढय़ात मोटारीचे दार उघडून दोन नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरविले. तो पांगळा होता! वारकऱ्याने विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे, हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचे दु:ख आपल्याला माहीत नसते आणि तो स्वत:ला जर सुखी समजत असेल, तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणू या. असे जर आपण केले तर दु:खाचा आणि सुखाचा आवेग कमी होईल.
– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज