सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत सुज्ञ मतदारांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सत्ताधा-यांना तांदळातील खडय़ाप्रमाणे बाजूला करून महापालिकेतील सत्तेची चावी भाजपच्या हाती दिली आहे. भाजपसाठी हा निकाल म्हणजे सांगली-मिरज-कुपवाड या तिन्ही शहरांच्या सर्वागीण विकासाची कास धरण्यासाठी जबाबदारी वाढवणारा ठरला आहे. तत्कालीन सांगली नगरपालिका आणि २२ वर्षापासून अस्तित्वात आलेल्या सांगली-मिरज- कुपवाड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा झेंडा फडकला आहे. सांगली महापालिकेच्या या निवडणूक निकालाकडे एक कटाक्ष टाकला तर हेच लक्षात येते की, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे या तिन्ही शहरांच्या विकासाचा कोणताच असा ठोस अजेंडा नव्हता. त्यांनी मनपा निवडणूक प्रचारात फक्त आणि फक्त मोदी विरोध तसेच जीएसटी, नोटाबंदी व बँकघोटाळे आदी देशव्यापी मुद्दय़ांवर भर दिला. पण स्थानिक निवडणुकीत स्थानिक विकासकामांच्या मुद्दय़ांना महत्त्व असते हे सुज्ञ मतदारांनी आपल्या मतदानातूनच सांगितले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पालिकेतील पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना मनपा क्षेत्रात हा हा विकास केला हे बोलण्याची संधी मुळात नव्हतीच. याउलट भाजपने मात्र नागरिकांसाठी शुद्ध पाणी, नागपूरच्या धर्तीवर सांडपाण्याची प्रक्रिया, अंतर्गत रस्ते आदी विकासकामांना अधोरेखित केले.
महापालिकेच्या या निवडणुकीत भाजपला ४१ जागा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मिळून ३५ जागा मिळाल्या, तर माजी आमदार संभाजी पवार गटाला पालिकेबाहेर फेकले गेले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये एकमत न झाल्याने काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. पण मतांची विभागणी झाल्याने याचा भाजपला फायदाच झाला. मिरज शहरात काँग्रेसला २३ पैकी फक्त ३ जागा मिळाल्या तेही त्या उमेदवारांच्या वैयक्तिक ताकतीवरच. राष्ट्रवादीला ८ जागा मिळाल्या. दोन्ही काँग्रेसचे बालेकिल्ले भाजपकडून नेस्तनाबूत करण्यात आले. काँग्रेस व राष्ट्रवादीमधील काही इच्छुक उमेदवारांनी महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी पक्षातर्फे तसेच आघाडीतर्फे तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली; परंतु ही बंडखोरी रोखण्यात दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना अपयश आले. त्यामुळे अनेक वर्षे ज्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचा डोलारा उभा होता त्या काँग्रेसनंतर राष्ट्रवादी व पुन्हा काँग्रेसवासी झालेले माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम आणि राष्ट्रवादीचे मात्तबर नेते दिवंगत आर. आर. पाटील यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. भाजपच्या विजयानंतर ईव्हीएम मशीनमध्ये साशंकता व्यक्त करून हा धनशक्तीचा विजय असल्याचे काँग्रेस आमदारांनी बरळले. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विकासकामात आम्ही कमी पडलो ही जाहीर कबुली न देता पक्षाच्या बंडखोर उमेदवारांवर अपयशाचे खापर फोडले.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची सत्ता आता भाजपकडे आली आहे. विजयी झालेल्या भाजपने विकासकामांचा अजेंडा घेऊन पालिकेत प्रवेश केला आहे, पण पुढे काय हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. चांगले रस्ते, शुद्ध पाणी यांसह मूलभूत सोयीसुविधा देण्याचे महापालिकेचे कर्तव्यच आहे आणि सत्ताधारी भाजप यासाठी कार्यशील राहीलही; परंतु वर्षानुवर्षे ज्या प्रश्नांचे घोंगडे भिजत राहिले आहे ते निकालात काढण्यासाठी भाजपने कार्यतत्परता बाळगली पाहिजे. १८ वर्षापूर्वी तत्कालीन माजी महापौर सुरेश पाटील यांनी सांगलीतील या काळी खण सुशोभीकरणाचा हा मुद्दा जाहीरनाम्याद्वारे पुढे आणला होता. पण काळ्या खणीतील गाळाचा ना उपसा करण्यात आला, ना त्यासाठी आलेल्या तांत्रिक अडचणी दूर केल्या. हा मुद्दा आजपर्यंत कागदावरच राहिला. सांगलीतील १०० फुटी रोडवरील शामरावनगर, महसूल कॉलनी या परिसरातील नागरिकांना पालिकेचा कर भरूनही वर्षानुवर्षे पावसाळ्यात चिखलाच्या दलदलीला सामोरे जावे लागते आहे. यावर पालिकेतील विद्यमान सत्ताधा-यांनी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. १०० फुटी रोड हा अतिक्रमणामुळे कधीच १०० फुटी वाटला नाही. भाजपच्या विजयी झालेल्या विद्यमान नगरसेवकांच्या सत्कार कार्यक्रमात भाजपच्या लोकप्रतिनिधींनी हे अतिक्रमण हटविले जाईल, असे जाहीर केले. पण २०२३ ची आगामी मनपा निवडणूक येण्यापूर्वी याबाबत अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. सांगली व मिरज ही दोन्ही शहरे नाटय़पंढरीची ठिकाणे असे म्हणतो पण सांगलीतील दीनानाथ मंगेशकर आणि मिरजेतील बालगंधर्व नाटय़गृह हे या शहरांचे खरोखरच भूषण आहे का, असा प्रश्न पडतो. दीनानाथ नाटय़गृहाची पाहिजे तशी वेळेवर डागडुजी होत नाही. १५ वर्षापूर्वी एका कार्यक्रमानिमित्त शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री व तत्कालीन लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी हे या नाटय़गृहात आले होते. त्यावेळी येथील स्वच्छतागृह पाहून त्यांनी महापालिकेचे कान टोचले होते. आजही काही वेगळी परिस्थिती आहे असे म्हणता येणार नाही. मिरजेतील बालगंधर्व नाटय़गृह परिसरात काही छोटे दुकानदार व फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे. या गोष्टींकडे पालिकेने पाहिले पाहिजे. मिरजेतील अतिशय जुन्या पण तितक्याच सुंदर असलेल्या लक्ष्मी मार्केटमधील निम्म्याहून अधिक दुकाने बंदच आहेत. याच्या दुरवस्थेकडे लक्ष देऊन त्याची डागडुजी महापालिकेकडून होणे गरजेचे आहे. कुपवाडमधील अनेक भागात गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न उद्भवतो आहे. अनेक कुपवाडकर नागरिक आजही आमची तत्कालीन नगरपालिका आणि त्याहीपेक्षा पूर्वीची ग्रामपंचायतच बरी होती, असे ठोकपणे बोलतात.
सांगली-मिरज-कुपवाड या तिन्ही शहरांच्या सुशोभीकरण आणि सौंदर्यकरणाच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे माजी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी ‘ब्रॅण्डिंग सांगली’ हा विषय पुढे आणला होता. त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागेवर विजयकुमार पाटील आले. त्यांनी ‘स्वच्छ सांगली सुंदर सांगली’ असा वसा घेतला. याबाबतीत महापालिकेतील विद्यमान सत्ताधा-यांनी पाठपुरावा करून शहराच्या सौंदर्यकरणावर भर दिला पाहिजे. सांगली-मिरज-कुपवाड या तिन्ही शहरांचे सुशोभीकरण करणे, अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न सोडविणे यासंदर्भात महापालिकेतील पूर्वीच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सत्ताधा-यांनी गांभीर्याने पाहिले नाही. याचाच कित्ता सत्ताधारी भाजपने गिरवू नये एवढीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.