मुंबईतील आर्थर रोड आणि भायखळा तुरुंगाच्या परिसरात यापुढे एकाही नव्या बांधकामाला परवानगी दिली जावू नये, या परिसरातील पुनर्विकासाबाबत महापालिका प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वे बनवावीत,
मुंबई – मुंबईतील आर्थर रोड आणि भायखळा तुरुंगाच्या परिसरात यापुढे एकाही नव्या बांधकामाला परवानगी दिली जावू नये, या परिसरातील पुनर्विकासाबाबत महापालिका प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वे बनवावीत, या मागणीसाठी मुंबई पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह आणि अतिरिक्त महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर यांनी बुधवारी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. तुरुंगापासून ५०० मीटरच्या परिसरात कोणत्याही बांधकामाला मार्गदर्शक तत्त्वे बनेपर्यंत परवानगी देण्यात येणार नसल्याचे कुंटे यांनी सांगितले
मुंबईतील सात रस्ता येथील आर्थर रोड आणि भायखळा कारागृहाच्या शेजारी मोठय़ा प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास प्रकल्प सुरू असून, यामुळे कारागृहाच्या सुरक्षेला धोका पोहोचला आहे. कारागृहाच्या सुरक्षेचा विचार न करताच महापालिकेच्या वतीने पुनर्विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जात आहे. त्यामुळे या वाढत्या पुनर्विकास प्रकल्पांची संख्या पाहता तुरुंगाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने सत्यपाल सिंह आणि मीरा बोरवणकर यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या वेळी तुरुंगांच्या आसपासच्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत मार्गदर्शक तत्त्वे बनवण्यात यावीत, अशी सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना केली.
तुरुंगांच्या आसपास असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करताना त्यांची उंची किती असावी, तुरुंगांपासून किती अंतर सोडावे, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे बनण्यात यावीत. त्यानुसारच बांधकामांना परवानगी दिली जावी. मात्र तोपर्यंत कोणत्याही प्रकल्पांना मंजुरी दिली जाऊ नये, अशी सूचना महापालिकेला करण्यात आल्याची माहिती सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, नव्या पुनर्विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी एक उच्चाधिकार समिती (हायपॉवर कमिटी) बनवण्यात येणार आहे.
त्यात पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त तसेच अतिरिक्त महासंचालक (कारागृह) किंवा अधीक्षक यांचा समावेश असेल. या समितीच्या मान्यतेशिवाय या परिसरातील पुनर्विकासाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र सध्या सुरू असलेल्या बांधकामांमुळे तुरुंगाच्या सुरक्षेला धोका पोहोचला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.