निवडणुकांमध्ये झालेल्या खर्चाचा चुकीचा आणि बनावट तपशील देऊन निवडणूक आयोगाची फसवणूक करणा-या विविध पक्षांच्या दोन हजार १७१ उमेदवारांना रविवारी आयोगाने जोरदार तडाखा दिला.
नवी दिल्ली- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या खर्चाचा चुकीचा आणि बनावट तपशील देऊन निवडणूक आयोगाची फसवणूक करणा-या विविध पक्षांच्या दोन हजार १७१ उमेदवारांना रविवारी आयोगाने जोरदार तडाखा दिला.
या उमेदवारांना पुढील तीन वष्रे निवडणूक लढवता येणार नाही. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत असून, तीन वर्षामध्ये अनेक मोठया राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होणार आहे. या निवडणुका लढण्यास हे उमेदवार अपात्र ठरल्याने त्याचा मोठा फटका राजकीय पक्षांना बसणार आहे.
[poll id=”174″]
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. निवडणुकांमध्ये पैशाचा गैरवापर व भ्रष्टाचार टाळण्यासाठी खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ३० दिवसांत खर्चाचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. मात्र अनेक उमेदवार हा तपशील सादर करत नाही, तर अनेकजण खोटा तपशील सादर करतात. त्यामुळे आयोगाने या उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारला असून, २०१६ पर्यंत हे उमेदवार निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरणार आहेत.
या उमेदवारांमध्ये सर्वाधिक उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील २६० उमेदवारांना या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. छत्तीसगढमधील २५९, हरयाणामधील १९७, ओदिशा, १८८, मध्य प्रदेश १७९, उत्तर प्रदेश १५९, झारखंड ११८ आणि तामिळनाडूमधील ९७ उमेदवार निवडणूक लढवण्यापासून वंचित राहणार आहेत.
२००९च्या लोकसभा निवडणुकीचा खर्चाचा तपशील योग्य न देणा-या उमेदवारांमध्ये उत्तर प्रदेशचे सर्वाधिक १५९ उमेदवार आहेत. पुढील तीन वष्रे निवडणुकांसाठी अपात्र ठरवलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी मुख्य निवडणूक अधिका-यांना पाठवण्यात आली आहे.