‘एकदा सार्वजनिक आणि राजकीय जीवनात वावरायचे ठरवल्यानंतर त्याचे फायदे-तोटे स्वीकारावे लागतात. नेहमीच चांगले दिवस येतील असे मानता येत नाही. चांगले दिवस अनुभवले, आता थोडा वेगळा अनुभव घेऊ या, असे समजूनच उद्याचा दिवस चांगला उगवेल, अशा भावनेनेच जीवनात जे पदरात पडले ते स्वीकारायला हवे’.. ही अतिशय सहज आणि सोपी भावना व्यक्त केली आहे श्री. नारायण राणे यांच्या धर्मपत्नी सौ. निलमताई राणे यांनी.
निवडणुकीतले ‘जय-पराजय’ हा जीवनाचा एक भाग आहे असे मी मानते. जे आहे ते स्वीकारून, जे नाही त्याची खंत न करता जगावं आणि आनंदात राहावं, अशी माझी जीवनाबद्दलची भूमिका आहे.
श्री. नारायण राणे यांनी ६५व्या वर्षात पाऊल ठेवले. त्यानिमित्ताने ओरस (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे साजरा होणा-या एका शुभेच्छा सोहळ्याच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या दै. ‘प्रहार’च्या ‘प्रवाह’ पुरवणीसाठी सौ. निलमताई आपली भावना व्यक्त करत होत्या.
महाराष्ट्रात काही जोडपी अशी आहेत की, त्यांना ‘एक दुजे के लिए’ असेच म्हणता येईल. यशवंतराव चव्हाण आणि वेणुताई, शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई अगदी त्याचप्रमाणे नारायणराव राणे आणि निलमताई यांची जोडी आहे. घर पूर्णपणे सांभाळायचे निलमताईंनी, घरचा सगळा व्यवहार बघायचा निलमताईंनी. कुटुंबाची सगळी जबाबदारी निलमताईंवर, संपूर्ण कुटुंब एकाच टेबलावर जेवण्याची शिस्त निलमताईंची.
राणेसाहेब कितीही व्यापात असले तरी ९ वाजण्याच्या आत त्यांनी घरात यायलाच हवे, हा आग्रह निलमताईंचाच. मालवण-कणकवलीचा दौरा असो, नाहीतर लंडनचा दौरा असो, नारायण राणे कधी कुठे एकटे गेले नाहीत आणि जात नाहीत. निलमताई सावलीसारख्या सोबत आहेतच.
आज लोकांना खरे वाटणार नाही, पण नारायण राणे मुख्यमंत्री असताना किंवा उद्योगमंत्री असताना पंच-सप्ततारांकित हॉटेलमधील ‘डिनर’ची अनेक ‘इन्व्हिटेशन्स’ त्यांच्या टेबलावर रोज पडून असायची. पण नारायण राणे कधीही बाहेर जेवलेले नाहीत. राज्यशिष्टाचारानुसार ते अशा समारंभांना गेले तर सूप पिऊन सर्वाची माफी मागून जेवायला घरी पोहोचायचे.. अशा या राणे कुटुंबीयांतील कर्त्यांधर्त्यां निलमताई बोलत होत्या.
श्री. नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर गेली दोन वर्षे तशी तणावाची आहेत. सुदैवाने नितेश विजयी झाला आहे. ज्या लोकांकरिता नारायण राणेसाहेबांनी दिवसरात्र कधी बघितली नाही, सतत त्यांच्या डोक्यात एकच विचार असायचा, तो म्हणजे ‘माझे कोकण.. माझे कोकण, कोकणासाठी हे करू, कोकणासाठी ते करू’ अशी गेली अनेक वर्षे डोक्यात एकच विचार ठेवून किती लोकांना त्यांनी मदत केली असेल, याचा काही हिशोब नाही. असे असताना अगदी जवळची वाटणारी माणसे उलटू शकतात, फसवू शकतात आणि जी माणसे मोठी वाटतात ती खोटी असतात, हे जेव्हा जाणवते तेव्हा त्याचे दु:ख खूप जास्त असते.
सार्वजनिक जीवनात वावरणा-याला व्यक्तिगत जीवनातील दु:ख व्यक्त करणे फार अवघड असते. कुठेतरी वाचले होते की, ‘पाण्यातल्या माशाचे अश्रू दिसत नाहीत.’ सार्वजनिक जीवनात वावरणा-याची स्थिती काही वेळा अशी असू शकते याचा अनुभव आम्ही राणे कुटुंबीय करीत आहोत, पण त्याचा खेद नाही. सार्वजनिक जीवनाचा हा एक भाग आहे. परंतु राणेसाहेबांना खंत याची वाटते की, आपण ज्यांच्याकरिता वर्षानुवर्षे काम करत होतो आणि अजूनही करत आहोत, त्या मंडळींनी आपल्याला फसवल्याच्या दु:खाची सल मनात कुठेतरी आहे, ते बोलून दाखवत नाहीत, तो त्यांचा स्वभाव नाही. परंतु ‘मनुष्य’ म्हणून ही गोष्ट मनात कुठेतरी येणारच. ‘माझे कोकण.. माझे कोकण’ करणा-या या व्यक्तिमत्त्वाला आपण पराभूत होऊ असे वाटले नाही, पण हा लोकांचा कौल स्वीकारला आहे आणि त्या परिस्थितीमध्ये पुन्हा खंबीरपणे उभे राहून त्यांचे काम चालू आहे.
प्रश्न : पूर्वी मुख्यमंत्री, नंतर मंत्री असताना राणेसाहेब घरासाठी वेळ देऊ शकत नव्हते. आता घरासाठी ते वेळ देऊ शकतात का? येतात का घराच्या वाटय़ाला ?
सौ. निलमताई : कसलं काय हो! आता सत्तेत नसले तरी त्यांनी काही कमी कामे पाठी लावून घेतली आहेत का? सत्तेत होते तेव्हा सरकारी कामे, लोकांची कामे. आता लोकांची कामे चालूच आहेत आणि शिवाय सिंधुदुर्गात रुग्णालय, गो-शाळा उभी करत आहेत. तीच कामे डोक्यात असतात. सकाळी ६ वाजता आम्ही जेव्हा फिरायला जातो तेव्हा १ तास मिळतो. मग तयार होऊन न्याहरी होईपर्यंत लोकं यायला सुरुवात, मग दिवसभर माणसांचा राबता, घरीपण आणि मुंबईच्या कार्यालयात पण. माणसांमध्ये राहायची त्यांना सवय झाली आहे.
तरीसुद्धा रात्री ८-९ वाजायच्या आत ते घरी येतात. मग एकत्र जेवण, थोडेसे विविध वाहिन्यांवरील कार्यक्रम बघणे, दिवसभराच्या कामाची चर्चा आणि मग विश्रांती. आताही दिवस अपुराच पडतोय. आता पुढच्याच आठवडय़ात ते सिंधुदुर्गात चालले आहेत, कारण कुडाळची पंचायत समिती निवडणूक लागली आहे. म्हणजे पुन्हा १५ दिवस सकाळी ७ वाजल्यापासून रात्रीपर्यंत बाहेर. ती निवडणूक संपते न संपते तोच मालवणची निवडणूक आहे. ती झाल्यानंतर जिल्हा परिषद लागणार आहे. म्हणजे झाले, ४ महिने गेले.
दोन्ही मुलेही राजकारणात आणि हेही राजकारणात. मी घरी आहे. परंतु एक समाधान आहे, आयुष्यात जे जे मिळावे असे वाटले ते ते सगळं मिळून गेलंय. कमी कशाचीच नाही. मुलं-नातवंडं यात ते रमतात, मी रमते, संध्याकाळी घरी परत आले की, राणेसाहेब नातवांमध्येच रमतात. तेव्हा भौतिकदृष्टय़ा सर्वकाही आहे, कमी काहीच नाही; पण तरीसुद्धा कुठेतरी अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता यांचा किंवा निलेशचा निवडणुकीत पराभव झाला म्हणून नाही, तो राजकारणाचा एक भाग आहे.
‘कधी ऊन, तर कधी सावली’ हे राजकारणात राहणार आहे, पण अस्वस्थता याची आहे की, अगदी खास जवळची माणसे म्हणून वाटत होती, त्याच माणसांनी फसवले. निवडणुकीतील पराभवाने मी काही खचली नाही. नारायण राणे या व्यक्तिमत्त्वाबरोबर ३७ वर्षापूर्वी लग्नगाठ होऊन मी संसार करते आहे. साहेबांनी आम्हाला सांभाळून घेतलं. त्यांच्यासोबतचं अतुट विश्वासाचं नातं हीच माझी समाजाकरता ओळख आहे. माझे पती, माझी मुलं, माझ्या सुना आणि नातू हेच माझं विश्व आहे. साहेबांनी परिवार म्हणून आम्हा सगळयांना एका धाग्यात गुंफलं. त्यांनी दिलेलं वळण आणि मुलांना केलेलं मार्गदर्शन, संस्कार, त्यांना दिलेलं शिक्षण हे सर्व त्यांनी आम्हाला दिलं आणि त्यामुळे साहेब मोठे होत असतानाच त्यांनी आमच्या परिवारालाही मोठं केलं..’
मूळच्या विचारे कुटुंबातल्या निलमताई या चेंबूरलाच राहणा-या. नारायण राणे चेंबूर येथेच राहणारे. त्यावेळी ते शिवसैनिक. विचारे कुटुंबातले निलमताईंचे काका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. निलमताई सांगत होत्या, आमच्या घरात जे वातावरण होतं त्याच्या अगदी उलट वातावरण राणे कुटुंबीयात. हे शिवसेनेत, त्यामुळे शिवसेनेच्या आचारधर्माप्रमाणे हे काहीसे आक्रमक. त्याचवेळी शिवसेनेचे दाक्षिणात्यांविरुद्ध मुंबईत आंदोलन सुरू होतं आणि ‘हे’ पण त्यात भाग घेत. आमच्या घरी ते माहीत होतं.
माझ्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर माझ्या लग्नाची घाई सुरू झाली. कुटुंबात असा एखादा दुर्दैवाने मृत्यू झाला की, वर्षभरात मुलीचं लग्न करावं अशी जुनी पद्धत. घरात सर्व जबाबदारी माझ्या आईवर आली. एकेदिवशी ‘ह्यांचे’ मामा आमच्या काकांनाच विचारायला आले. ‘तुमची पुतणी आमच्या भाच्याला द्याल का..’ निलमताई आवंढा गिळून म्हणाल्या..
‘माझे वडील कदाचित असते तर एखाद् वेळी ‘नाही’ म्हणाले असते; पण काका ‘हो’ म्हणाले आणि १९७९ साली लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी राणे कुटुंबीयात आले. लग्नापूर्वी हे आक्रमक होते, निलेशचा जन्म झाला आणि हे खूप शांत झाले. यांच्या घरी असलेला दीर आणि नणंद यांची मुलं सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मी लहान होते. नुकतंच लग्न झालेलं आणि या तीन मुलांची जबाबदारी माझ्यावर पडली. खरं तर मला वाटलं होतं की, लग्न होण्यापूर्वी मला सांगितलं गेलं असतं की, ‘ही तीन मुलं तुला सांभाळायची आहेत’ तर बरं झालं असतं, पण मी म्हटलं, ‘आता माघार घ्यायची नाही’ अन् संसार सुरू केला तो नणंद, दिराची मुलं सांभाळून.
माझ्या लग्नापूर्वीच वडील गेले होते. आई काही कामं करून कुटुंब चालवत होती. माझ्यासाठी पहिला समाधानाचा क्षण होता, ‘ह्यांनी’ सांगितले, ‘आईना आता काम करायला सांगायचं नाही, त्यांना आपण सांभाळू’ आणि त्यांनी शेवटपर्यंत माहेरचे घर त्यांचे मानले. बोलल्याप्रमाणे ते वागले. माझ्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळी त्यांची आर्थिक स्थिती फार उत्तम होती असे नव्हे. इन्कम टॅक्समध्ये नोकरी होती. तरीही त्यांनी शब्द पाळला..
एक दिवस त्यांनी मला सांगितले, ‘मी नोकरी सोडून महानगरपालिकेची निवडणूक लढवतो आहे..’ माझ्या छातीत धस्स् झालं. तिथपर्यंत मला ‘निवडणूक म्हणजे काय’ हे फारसं माहीत नव्हतं. मी मत व्यक्त केलं, ‘निवडणूक लढवण्याच्या भानगडीत पडू नका, चांगली इन्कम टॅक्सची नोकरी सोडू नका.’ त्यांच्यासमोर जे उमेदवार होते ते मुजुमदार नावाचे गृहस्थ होते.
तीन-चार वेळा निवडून आले होते. त्यांच्यासमोर निभाव लागणार नाही, असे मला वाटत होते. माझ्या मैत्रिणीही मला सांगत होत्या की, तुझ्या मिस्टरांनी निवडणूक लढवू नये. सगळे नकारात्मक बोलत होते. पण साहेब म्हणाले, ‘मी निवडणूक लढवणार. संधी आलेली आहे, आपण त्याचं सोनं करू’ आणि मग मात्र मी ठरवलं की, आपलं मत आपण मांडलं, त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यांच्या मनानुसार त्यांना करू द्यावं. त्यांच्यासोबत राहावं, होता होईल तेवढी मदत करावी.
देवालाही मी प्रार्थना सुरू केली आणि ते निवडून आले. निवडणुकीच्या दिवशी त्यांना मी म्हटलं, ‘सिद्धिविनायकला जाऊ या’ तर ते म्हणाले, ‘तूच जाऊन ये.’ मी म्हटलं, ‘अहो नुसतं जायचं अन् नमस्कार करायचा. त्याने तोटा तर काही नाही. माझी श्रद्धा आहे’ आणि मग ते माझ्याबरोबर आले. भक्तिभावाने नमस्कार केला. निवडणुकीचा निकाल लागला, ते निवडून आले. तेव्हापासून त्यांची सिद्धिविनायकावर आणि गणेशावर एवढी श्रद्धा आहे की, कणकवलीच्या घराचं नाव ‘ओम गणेश’ आणि मुंबईच्या घराचं नाव ‘आधिश’ त्यांनीच ठेवलं आहे’.
प्रश्न : नारायण राणे यांची तुम्हाला भावलेली एखादी गोष्ट सांगा ना?
सौ. निलमताई : ज्या काळात मोबाईल नव्हते, त्या काळात ते बाहेर कुठे असले तरी त्यांची परिवाराची ओढ इतकी विलक्षण आहे की, कुठूनही सातत्याने घरी फोन करून ते सर्वाची सतत चौकशी करायचे.
नगरसेवकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत मोठय़ा-मोठय़ा जागांवर काम करताना परिवाराची सातत्याने चौकशी करत राहणं, माझ्या माहेरच्या मंडळींचीही सातत्याने काळजी घेणं, त्यामुळे आमच्या परिवारात ‘तुझं आणि माझं’ असा भेदभाव कधीच झाला नाही. माझ्या माहेरसाठी लागणारा खर्चही तेच भागवायचे.
या त्यांच्या स्वभावाने हा माणूस एक विलक्षण आहे आणि माझ्याकरता तर सर्वस्व आहे, ही माझी भावना आहे आणि आमचं कुटुंब हेच माझं विश्व आहे. एक भयानक घटना अशी घडली होती की, हे सगळयांना मदत करायचे आणि एकदा काही लोकांनी शिर्डीला जाण्यासाठी मोठी रक्कम मागितली, त्यातून काही वाद झाला. तर त्या लोकांनी साहेबांवर हल्ला केला. डोक्यावर मोठी जखम झाली होती. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करावं लागलं. त्यावेळी ‘ह्यांना’ वाचवलं ते श्रद्धेने.
प्रश्न : तुमच्या जीवनातला सगळय़ात मोठा आनंदाचा क्षण कोणता?
सौ. निलमताई : मुख्यमंत्री झाले तो क्षण आनंदाचा आहेच, पण पहिल्यांदा नगरसेवक झाले तो क्षण अधिक आनंदाचा आहे. ते मुख्यमंत्री होणार असं मला म्हणायचे. पण मी त्यांना सांगायचे, ‘असं तुम्ही मला अनेक वेळा सांगितले’ पण एक दिवस त्यांच्या मित्राचा फोन आला. तो फोनवर म्हणाला, ‘तुम्हाला कळलं का? ते मुख्यमंत्री होणार आहेत’ तेव्हा आम्ही चित्रकुट बंगल्यावर राहत होतो. टीव्ही बघायला सांगितला, तर हे मुख्यमंत्री झाल्याच्या बातम्या येत होत्या. एवढय़ात ह्यांचा फोन आला, त्यांनी मातोश्रीवर बोलवून घेतलं. निलेश-नितेश परदेशात शिक्षण घेत होते. मी मातोश्रीवर पोहोचले. माझ्या डोळयांतून अश्रू वाहत होते. बाळासाहेब म्हणाले, ‘शुभप्रसंगी रडायचे नाही.’ मी म्हटले, ‘आनंदाश्रू आहेत’ आणि ते मुख्यमंत्री झाले.
ते किती मोठय़ा जागेवर गेले तरी आमच्या घराचे ते नेहमीच आधारस्तंभ राहिले. मोठय़ा जागेवर असतानाही कुटुंबाची काळजी घेण्यात ते कुठेही कमी पडले नाहीत. पती हा कुटुंबाचा आधारच असतो. एका धाग्यात तो परिवाराला गुंफत असतो. मुलांनी आयुष्य कसं जगावं याचं मार्गदर्शन करीत असतो. त्यासाठी कुटुंबातल्या सर्वाना समजून घ्यायची एक सवय लावावी लागते. लोकांना असे वाटते की, हे खूप संतापी आहेत. पण कुठचीही गोष्ट त्यांना समजावून सांगितली तर त्यांना ती पटत असते आणि ती गोष्ट ते मान्य करतात.
मुलांना मी हेच सांगत असते, तुमच्या वडिलांनी खूप कष्ट काढून ते मोठे झाले आहेत. खूप संघर्ष केले आहेत. तुम्हाला बरेच काही सहज मिळाले आहे. हा वारसा काय आहे हे समजून घ्या आणि सुदैवाने उच्च शिक्षण घेतलेल्या मुलांनी हे सगळं समजून घेतलं आहे. मी असं मानणारी आहे की, माझ्या दोन्ही मुलांमध्ये साहेबांचे गुण यावेत, सगळयांना समजून घ्यावे. आपल्याला जे काही मिळते ते नशिबाने मिळत असते. त्यासाठी जिद्द हवी. जे मिळणार त्यासाठी तक्रार करू नये आणि वाद तर अजिबात करू नये.
समाजासाठी चांगलं करत राहा, आपलं चांगलंच होत राहील. निवडणुकीतले ‘जय-पराजय’ हा जीवनाचा एक भाग आहे असे मी मानते. जे आहे ते स्वीकारून, जे नाही त्याची खंत न करता जगावं आणि आनंदात राहावं, अशी माझी जीवनाबद्दलची भूमिका आहे. हे कधी-कधी खूप विचार करत बसतात तेव्हा त्यांना मी हेच सांगत असते. पण कोणताही निर्णय करताना माझ्याशी विचार केल्याशिवाय ते निर्णय करत नाहीत आणि एकदा निर्णय झाला की, त्या निर्णयाबद्दल त्यांच्यासोबत राहायचं. मग यश-अपयश या गोष्टी गौण आहेत, असं मी मानते आणि मुलांनाही मी तेच सांगते.