नारायण राणेसाहेबांचा मुलगा या नात्याने वाढदिवसानिमित्त दैनिक ‘प्रहार’च्या माध्यमातून पहिल्यांदाच आपणाशी संवाद साधण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद होत आहे. साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा़
साहेबांसोबतच्या राजकीय आणि कौटुंबिक प्रवासाच्या आठवणींचे वर्णन केवळ ५०० शब्दात करणे शक्य नाही. आज मी जे काही आहे ज्या काही सुख-सुविधा आयुष्यामध्ये मला मिळाल्या आहेत त्या सर्व राणेसाहेबांमुळेच मिळाल्या आहेत आणि भविष्यात (उद्या) जे काही मिळेल तेही राणे साहेबांमुळेच. आमची वागण्याची, बोलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. काम कसे करायचे, कार्यकर्त्यांना कसे जपायचे, मोठय़ांचा मान कसा राखायचा, या सर्व गोष्टी मी साहेबांकडूनच शिकलो.
राणेसाहेबांच्या जवळ काम करण्याची मोठी संधी मला मिळाली जेव्हा मी खासदार झालो. ते राज्यात कॅबिनेट मंत्री होते व मी दिल्लीत खासदार होतो. ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्या पाच वर्षाच्या खासदारकीच्या काळात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अधिकारी वर्ग मग तो पोलीस अधिकारी असेल किंवा महसूल अधिकारी असेल सर्वच अधिकारी साहेबांसाठी उस्फूर्तपणे काम करायचे. आजही सर्वच विभागातील अधिका-यांना साहेबांबद्दल आदर आहे, आपुलकी आहे.
महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील अधिकारी असतील राणेसाहेबांचे नाव आल्यावर किंवा साहेबांचा फोन गेल्यानंतर आदराने कार्यकर्त्यांची कामे करतात. साहेबांनी सर्व विभागातील अधिका-यांना आदराची वागणूक दिली म्हणून महाराष्ट्रभर आज कुठेही राणेसाहेबांचे नाव निघाले की अधिकारी वर्ग आनंदाने साहेबांचे नाव आदराने घेतो, याचे कारण साहेबांनी दिलेले अधिका-यांना प्रेम हे मला जवळून बघायला मिळाले.
काम करण्याचा वेग कसा असावा, कुठली कामे लवकर होणारी असतात, कोणती कामे लोकहिताची असतात, लोकहिताच्या कामांना अडचणी कोणत्या येऊ शकतात या सर्व गोष्टी शिकण्यासाठी मला कोठेही जायला लागले नाही, याचे कारण मी नशीबवान आहे की, मला गुरूच राणेसाहेबांसारखे लाभले.
मी फार कमी वयापासूनच राणेसाहेबांसोबत कामाच्या माध्यमातून फिरतोय. लोकांना राणेसाहेब त्यांच्या मर्जीतील वाटतात हे मी फार जवळून पाहिलं आहे. मला असं वाटतं की राजकारणामध्ये सर्वात जास्त सेंसेटिव्ह (संवेदनशील) व्यक्ती कोण असतील तर ते राणेसाहेब स्वत: आहेत. त्यांनी कधीच कुठलीही गोष्ट कॉपी करून किंवा दुस-याला बघून केली नाही. मला जेव्हापासून आठवतंय साहेब आधीपासून ते आतापर्यंत ओरिजनल राहिले; त्यांच्यासारखेच राहिले. त्यांनी दुस-याकडे बघून किंवा इतर लोक काय करत आहेत, इतर नेते काय करत आहेत, त्यांच्याकडे बघून राणेसाहेबांनी स्वत:चे राजकारण कधीही केले नाही आणि आयुष्यही जगले नाहीत. दुस-यांना बघून त्यांनी त्यांची वागण्याची पद्धत कधीही बदलली नाही. नाहीतर अमुक अमुक कोण काय करतंय असं आपण करायला जायचं, असं त्यांनी कधीही केलं नाही.
राणेसाहेबांनी एकदा कोणताही विषय हातात घेतला तर त्या विषयाचा संपूर्ण अभ्यास करून मगच ते त्यावर टीका-टिप्पणी करतात. एकंदरीत त्यांचं आतापर्यंतचं राजकारण कंस्ट्रक्टिव्ह (रचनात्मक) राहिलं आहे. कंस्ट्रक्टिव्ह राजकारण म्हणजे कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवायचं, कार्यकर्त्यांनी मोठं झालं पाहिजे, तसेच सर्व स्तरातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, लोकांचे राहणीमान चांगले झाले पाहिजे या सर्व गोष्टींकडे साहेबांनी जास्त लक्ष दिले आणि म्हणूनच ‘‘दादा’’ हे नाव आशेने मनात घेऊन दादा आपले प्रश्न सोडवू शकतील, प्रेमापोटी आणि आपुलकीपोटी लोक साहेबांकडे वळले. याचे कारण साहेबांनी नेहमीच कंस्ट्रक्टिव्ह राजकारण केलं. त्यांच्यामुळेच सर्वसामान्य जनतेला चांगले दिवस आले.
आजही लोक साहेबांना भेटण्यासाठी उत्साहाने महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून येतात. साहेबांना कोणत्याही गोष्टीमध्ये जे वाटले ते सरळमार्गी सांगतात. याचे कारण साहेब सरळमार्गी असल्यामुळे त्यांना कोणताही मार्ग हा सरळच दिसतो. साहेब सरळमार्गी असल्यामुळे चौके-पंजे त्यांच्या वागण्यात मला कधीच दिसले नाहीत आणि इतरांनाही कधी दिसले नाहीत. म्हणूनच आजही विरोधक असतील किंवा आमच्यातील काही जे तिकडे गेले व जे विरोधक झाले तोही ‘‘दादा’’ म्हटले की त्यांच्या चेह-यावरचा हावभाव, त्यांचे साहेबांसाठीचे प्रेम त्यांच्या चेह-यावर लगेच दिसून येते. म्हणून मला अभिमान आहे आणि मी नशीबवान आहे की मी अशा कर्तृत्ववान व्यक्तीचा मुलगा आहे.
कमी वयात मला अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. सरकार बनविण्यापासून ते सरकार पडण्यापर्यंत.. तो यशस्वी की अयशस्वी तो भाग सोडून द्या, पण या दरम्यान अनेक आंदोलने, अनेक कार्यक्रम, वेगवेगळ्या विषयांची माहिती, प्रशासनाबद्दल, मंत्रालयाबद्दल अगदी ग्रामपंचायत, पंचायत समितीबद्दलची माहिती मला साहेबांच्या सहवासामुळे कमी वयात मिळाली.
खरोखरच मी देवाचे आभार मानतो की मला अशा माणसाचा (व्यक्तीचा) मुलगा बनवला. माझे कितीही पुनर्जन्म झाले तरी प्रत्येक जन्मी राणेसाहेबच माझे वडील असावेत. एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचे आयुष्य सुखमय असावं आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत एवढेच साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इच्छितो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिवादन!