आपल्याकडे उद्यान आणि मैदान यांत नेहमी गल्लत केली जाते. उद्यान आबालवृद्धांना फेरफटका मारण्यासाठी असतं, तर तरुणाईची खेळकर ऊर्जा उत्सर्जित करण्यासाठी खेळाचं मैदान असतं. पण मुंबईत पंचमहाभुतांचं विषयसूत्र घेऊन एक नितांतसुंदर उद्यान उभं राहिलं आहे. या उद्यानात केवळ प्रसन्न करणारा फेरफटकाच होत नाही, तर निसर्गाविषयीच्या जुन्याच जाणिवा नव्याने भेटतात.
आतापर्यंत आपण विविध प्रकारची वैशिष्टयं असलेली कित्येक उद्यानं पाहिली असतील. आज ज्या उद्यानाची माहिती घेणार आहोत तेदेखील असंच एक वैशिष्टयपूर्ण आहे. ते ज्या संकल्पनेवर आधारित आहे, ती आपल्या सृष्टीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूताविषयी आपल्याला आहे. आपल्या आसपासचं सगळं भौतिक जग पंचमहाभुतांनी तयार झालं आहे, असं म्हटलं जातं. या पंचमहाभुतांची लहान मुलांना ओळख व्हावी म्हणून महानगरपालिकेने या संकल्पनेवर आधारित एक उद्यान मुंबईत बांधलं आहे. या उद्यानाचं नाव आहे‘वैश्विक पंचमहाभूत उद्यान’ जे ‘स्वर्गीय वामनराव महाडिक उद्यान’ या नावाने ओळखलं जातं.
लालबागसारख्या गजबजलेल्या ठिकाणी, जिथे गगनचुंबी इमारती आणि मोठमोठी हॉटेल्स किंवा औद्योगिक कार्यालयं उभारली जात आहेत, तिथे असं एखादं उद्यान असेल याची पुसटशीदेखील कल्पनाही येत नाही. खरं तर हे मुंबईतलं पहिलंच ‘थीम पार्क’ आहे, असं म्हटलं तरीही चालेल. ‘भारतमाता’ थिएटरवरून एस. एस. राव मार्गाकडे आलं की लगेचच हे स्वच्छ, सुंदर असं एक उद्यान आपलं लक्ष वेधून घेतं. पाठीमागे असलेल्या टॉवरमुळे हे उद्यान त्या टॉवरच्या खासगी मालकीचंच आहे की काय असं वरकरणी वाटतं.
मात्र उद्यानाच्या पहिल्याच प्रवेशद्वारावर ‘बृहन्मुंबई महानगरपालिका, पंचमहाभूते – विश्वातील पंचतत्त्वे संकल्पना उद्यान वामनराव महाडिक उद्यान’ अशी पाटी दिसते. स्वर्गीय वामनराव महाडिक हे या भागातले नगरसेवक होते. ते पुढे मुंबईचे महापौर, खासदार ही बनले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे उद्यान बांधण्यात आलं असल्याचं उद्यानाबाहेर लावलेल्या पाटीवरून समजतं.
आत शिरताच हिरवागार गालिचा अंथरलेला दिसतो. त्या हिरव्यागार गालिच्यातून नागमोडी वळणाची पाऊलवाट आपलं लक्ष वेधून घेते. बाजूलाच लहान मुलांना खेळण्यासाठी आकर्षक रंगाची फायबरची खेळणी ठेवण्यात आली आहेत. सिसॉ, घसरगुंडी, रोपवे असे विविध प्रकारचे खेळ आहेत. मुख्य म्हणजे लहान मुलांना घसरगुंडीवरून पडल्यावर इजा होऊ नये म्हणून त्यांनी खाली गालिचा अंथरला आहे. आकर्षक रंग आणि आणि आकारामुळे लहानच काय, पण ते मोठय़ांचंही लक्ष वेधून घेतात.
आता या उद्यानाचा मुख्य भाग म्हणजे पंचमहाभुतांच्या प्रतीकांपाशी येऊन थांबतो. ही पाचही प्रतीकं गवताच्या उंचवटय़ावर केले आहेत. त्यामुळे ती सहजच उठून दिसतात. पहिला भाग पृथ्वी तत्त्वाचा. त्याचं नाव आहे ‘अर्थ गार्डन’. चहूबाजूंनी गवताचे उंचवटे केले असून बाहेरील बाजूला गवताची उतरण आहे तर आतल्या बाजूला बसायला जागा केली आहे. या तत्त्वाची ओळख होण्यासाठी मध्यभागी दगडांचं वर्तुळ केलं आहे. जवळ असलेल्या कॉलेजकुमारांना हा कट्टा काही नवा नाही. दुसरा विभाग आहे जल. त्याला ‘वॉटर गार्डन’ असं नाव आहे, त्यात पाण्याची लहान लहान कारंजी सोडली असून त्या कारंजांचा नजराणा पाहण्यासाठी बसायला जागा आहे. तिसरा ‘एअर गार्डन’ विभाग आहे तो वायूचा.
तिथे चार खांबांवर विंडचाइमला बारीक पाइप लावले आहेत. वारा आला की हे पाइप एकमेकांना आपटतात आणि त्यातून मधुर संगीत ऐकायला येतं. त्या खांबाखालूनच पाऊलवाट केली असल्याने चालणा-यांनाही हा मंजुळ ध्वनी ऐकायला येतो. चौथा विभाग ‘फायर गार्डन’चा अर्थात अग्नीचा. यासाठी त्यांनी अग्निकुंडाची रचना केली आहे. त्याच्या तीन पाय-या असून प्रत्येक पायरीवर छोटी छोटी रोपं ठेवली आहेत. आणि त्याच्या आसापासही बसायला जागा केली आहे. शेवटच्या ‘स्पेस गार्डन’मध्ये आकाशाची संकल्पना मांडताना गोल आकारात खांब मांडले असून त्यावर आकाशरूपी काच बसवण्यात आली आहे. त्याखाली आसनव्यवस्था करण्यात आली आहे. त्यातून आकाश पाहण्याची मजा काही औरच आहे.
अशा या उद्यानात मैदानी खेळासाठी जागा नसली तरी लहानग्यांना बागडण्यासाठी, मोठय़ांना निवांत बसण्यासाठी भरपूर जागा आहे. जागोजागी कचराकुंडय़ा ठेवल्या आहेत इतकंच नव्हे तर उद्यानात स्वच्छतागृहाची सोयही आहे. सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ८.३० अशी या उद्यानाची वेळ आहे. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश पडावा म्हणून चहूबाजूंनी दिवे लावण्यात आले आहेत. उद्यानाचं दुसरं फाटक बाहेर पडण्यासाठी असून त्यावर वामनराव महाडिक यांचा जीवनालेख लिहिलेला आढळतो.
अशा स्वरूपाचं एखादं विषयसूत्र घेऊन त्यावर आधारित असलेलं मुंबईतलं हे एकमेवच उद्यान.
मात्र या उद्यानात मैदानी खेळ खेळायला जागा नाही. पर्यावरणाचा एक भाग म्हणून या उद्यानाकडे पाहिलं जात असून सदर उद्यान पर्यावरणरक्षणाचं कवच असल्याने जीवनाच्या तत्त्वावर आधारित रचना केली असल्याचा फलक तिथे लावण्यात आला आहे. अशा या पर्यावरणाचं कवच ठरणा-या उद्यानाला एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी.