पैशाने विकत घेतल्या जाणा-या वस्तू अमर्यादित आहेत. हरक्षणी विज्ञान तंत्रज्ञानाची इतक्या वेगाने प्रगती होत असल्यामुळे नवनवीन अधिक उपयुक्त, अधिक सोईस्कर अशा वस्तूंचे शोध लागत राहणारच. तेव्हा त्या वस्तूंच्या मोहात पडण्यापासून मुलांना परावृत्त करायचं कसं? ह्या सर्व वस्तू मिळवण्यासाठी आपल्या कष्टांना, श्रमांना मर्यादा येतात हे मुलांना समजवायचं कसं?
दुकानात जाऊन किंवा मॉलमध्ये जाऊन हे पाहिजे, ते पाहिजे सुरू असतं. त्याशिवाय हल्ली शाळेपासूनच मुलांना पॉकेटमनी सुरू होतो. पॉकेटमनीबरोबर वेगवेगळे मोबाइल आणि इतर खर्च.. असं बरंच काही. शाळेपासून सुरू होणारे हट्ट कॉलेजच्या वयात अधिकच वाढत जातात. काही कॉलेजमधील मुलं स्वत:च्या गरजा भागवण्यासाठी लवकरात लवकर पायावर उभं राहण्याच्या प्रयत्नात दिसतात. त्यांनी मिळवलेल्या पैशांवर पूर्णपणे त्यांचा हक्क असतो. ते त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे खर्च करायचे असतात.
घरची परिस्थिती बेताची असेल तरच विद्यार्थी पैसे कमावतात आणि घरासाठी खर्च करतात. अन्यथा फक्त स्वत:च्या खर्चासाठी पैसे मिळवणारी मुलं कुठल्याच प्रकारे कोणालाच त्यांच्या व्यवहारात ढवळाढवळ करू देत नाहीत. अशा मुलामुलींकडे अद्ययावत मोबाइल, हरतऱ्हेचे नवनवीन कपडे असतात. दर सहा महिन्यांआड त्यांच्या हातातला मोबाइल बदलतो. अशीच एक कॉलेजकन्या भेटली. तिचा टापटीपपणा तिला भेटणा-या कोणत्याही व्यक्तीला अगदी सहज लक्षात यावा, असा होता. ‘एकदा का एक कुर्ता मी घातला की, पुढचे सहा महिने त्याला हात लावायला मला अजिबात आवडत नाही. ड्रेसची फॅशन बदलली की तसा ड्रेस मी घेतेच. फॅशन गेली की तो ड्रेसही माझ्या कपाटाबाहेर!’, असं ती अभिमानाने सांगत होती.
अशा पद्धतीने राहणं म्हणजे वाईट, असं नक्कीच नाही. कारण प्रत्येक माणसाची त्याच्या आवडीनिवडीनुसार जगण्याची वेगवेगळी शैली असू शकते. पण त्यामध्येच अडकून पडणं किंवा त्याच्यासाठी जीवाचं रान करणं हे कधीतरी घातकही असू शकतं. ही मुलगी असे राहण्यासाठी स्वत: कष्ट करते, आपल्या आवडीचा आईवडिलांवर भार टाकत नाही, ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे. पण ‘मी कमावते, मला कोणासमोर हात पसरायची गरज नाही.’, असा आत्ममग्न विचार मनात येत असेल तर?
पैशाने विकत घेतल्या जाणा-या वस्तू अमर्यादित आहेत.
हरक्षणी विज्ञान तंत्रज्ञानाची इतक्या वेगाने प्रगती होत असल्यामुळे नवनवीन अधिक उपयुक्त, अधिक सोयीस्कर अशा वस्तूंचे शोध लागत राहणारच. तेव्हा त्या वस्तूंच्या मोहात पडण्यापासून मुलांना परावृत्त करायचं कसं? ह्या सर्व वस्तू मिळवण्यासाठी आपल्या कष्टांना, श्रमांना मर्यादा येतात हे मुलांना समजवायचं कसं?, हा मूळ प्रश्न. त्याशिवाय ह्या मोहात अडकल्यावर प्रश्नांची रांगच रांग समोर येते, हे सांगायला नको. एखादी गोष्ट मनासारखी मिळाली नाही की होणारी अस्वस्थता, आपल्यापेक्षा मित्राचा किंवा मैत्रिणीचा चांगला खेळ, मोबाइल, गाडी (वयानुसार बदलत जाणा-या सगळ्या वस्तू) पाहिल्यावर वाटणारा हेवा, क्वचित मत्सर आणि वाढत जाणारी बेचैनी, हे सर्व टाळण्यासाठी उपाययोजना करायला हवी.
प्रज्योत आणि समृद्ध दोघे सातवीत शिकणारे जिवाभावाचे मित्र. दोघांची घरंही जवळजवळ. दिवसातला बराचसा वेळ शाळा, क्लासमध्ये एकत्र जायचा. संध्याकाळी खेळायला दोघे सोबत असत. एकमेकांच्या घरी वरचेवर जाण्यायेण्याने आता दोन्ही कुटुंबं जवळ आली होती.समृद्धचं घर मोठं पण वडिलोपार्जित असल्याने जुनं झालेलं होतं. त्याच्या घरी आईवडील, आजीआजोबा, धाकटी बहीण आणि तो, असे एकत्र सुखात राहत होते. तर प्रज्योत नुकतंच एका छोटय़ा घरातून जरा मोठय़ा घरात राहायला आला होता. त्याचं घर काही समृद्धच्या घराइतकं मोठं नव्हतं, तसंही घरात राहणारे फक्त तिघे जण.. आई, त्याची मोठी बहीण आणि तो. त्याचे वडील नेव्हीमध्ये होते. लहानपणापासूनच त्यांचं
समुद्रावर काम करण्याचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नापायी त्यांनी नोकरी निवडली. दर सहा महिन्यांनी त्यांची घरी फेरी होत असे. पण घरापासून लांब असूनही त्यांचा कुटुंबाबरोबर सतत संवाद होता. इतक्या लांब असूनही प्रज्योतच्या वडिलांना समृद्ध आणि समृद्धचे आईवडील चांगले परिचित होते. कारण, प्रज्योतप्रमाणे समृद्धही मोकळेपणाने त्यांच्याशी बोले. प्रज्योत आणि समृद्ध त्यांना भेडसावणारा प्रत्येक प्रश्न, शंका अगदी मनमोकळेपणाने ई-मेलमधून वडिलांना सांगत. प्रज्योतचे वडील त्यांच्यापरिने मुलांच्या अडचणी दूर करत. त्यांचे फक्त प्रश्न ते सोडवत नसत, तर त्यांना नवनवीन विचारांसाठी प्रवृत्त करत.
प्रज्योतला वडिलांकडून फक्त विचारांचं खाद्य मिळत नव्हतं तर, निरनिराळ्या देशातील महत्त्वाच्या वस्तू, माहिती, निरनिराळे कृतीप्रवण खेळ अधूनमधून घरी येत असत. शिवाय, नवीन घरासाठी फíनचर, कपडे हेदेखील हजर होत होते. समृद्ध मात्र ते आलिशान घर, तेथील सोयीसुविधा, कपडे, खेळ पाहून मनातल्या मनात हिरमुसत होता. दरवेळी नवीन कपडे आले की प्रज्योतची आई जुने कपडे, खेळ कितीही चांगले असले तरी गरीब मुलांना देऊन टाके. अशा वेळी, तर या दोन्ही मुलांचा जीव हळहळे. त्या वेळी समृद्धला अधिक वाईट वाटे. घरी हट्ट करूनही असे खेळ आणि कपडे त्याला मिळणं शक्य नव्हते. आणि प्रज्योतची आई तर सरळ चांगल्या चांगल्या वस्तू देऊन टाकी. तिचा हट्टच होता नवीन कपडे घेतले की जुने देण्याचा. ह्या हट्टापायी ते काही करू शकत नव्हते.
समृद्धच्या मनातील तगमग हळूहळू दोन्ही घरच्या वडीलमंडळींना कळायला लागली. तो आईने नोकरी करावी म्हणून तिच्या मागे लागला. घरात आजीआजोबा, लहान बहीण यांची काळजी आई घेते, त्यामुळे नोकरी करणं तिला शक्य नाही, हे त्याला कळत होतं. पण आपलं घरही प्रज्योतच्या घरासारखं होण्यासाठी फक्त वडिलांचा पगार पुरणारा नव्हता, हे त्याला दिसत होतं. दर दोन दिवसांनी ‘आई, तू का नोकरी करून पैसे कमवत नाहीस?’, हा प्रश्न तो आडून विचारत होता. आई त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. इतके दिवस तर सारं काही सुरळीत चालू होतं, पण समृद्धच्या ह्या नवीन प्रश्नावर कोणालाच समाधानकारक उत्तर देता येत नव्हतं. त्याची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत होती. अखेरीस, ‘मी काय फक्त नावापुरता समृद्ध!’, या त्याच्या उद्गारांनी
सारेच गडबडले. समृद्धच्या मनातील घालमेल प्रज्योतला, त्याच्या आईलाही कळली होती. पण नेमकं काय करावं कोणालाच कळेना. प्रज्योत आणि समृद्धने या विषयासंदर्भात प्रज्योतच्या वडिलांशी बोलावं, असं अखेरीस ठरलं.झालं!..लगेच प्रज्योतच्या बाबांना ई-मेल.. ‘अधिक छान राहण्यासाठी, अधिक कष्ट करून पैसे मिळवले तर त्यात चूक काय? आपल्या घराचेच उदाहरण घेतले तर तुम्ही एवढी मोठी नोकरी करता, पैसे पाठवता, वस्तू पाठवता तरी आईसुद्धा नोकरी करतेच की. आपल्या घरी असं होऊ शकतं तर समृद्धच्या घरी का शक्य नाही? त्याच्या आईने नोकरी केली तर त्यालासुद्धा माझ्यासारखी खेळणी वगरे घेता येतील. पण समृद्धचं हे म्हणणं कोणालाच मान्य नाही, असं का?’
काय वाटतं तुम्हाला? काय असेल प्रज्योतच्या वडिलांचं उत्तर? ते उत्तर आपण नक्कीच जाणून घेऊ, पण पुढच्या लेखात. वर उल्लेखिलेले प्रज्योत आणि समृद्ध आता जरी गोष्टीत असले तरी प्रत्यक्षात अशी मुलं, त्यांच्या मनात असे प्रश्न येत असतात. पण ते व्यक्त होतीलच असं नाही. तेव्हा असे प्रश्न पडण्यापूर्वीच आपण सोडवुया.