पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात देशाचे हित जपायचे सोडून भारताची निंदानालस्ती करतात, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली.
मुंबई- मोदी सरकार आल्यापासून देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा देशाची विकास कामे करण्याऐवजी मोदी केवळ काँग्रेसवर टीका करीत फिरत आहेत. परदेशात दौ-यावर जाताना मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून जात नाहीत. ते भाजपाचे नेते म्हणून जातात. परदेशात देशाचे हित जपायचे सोडून भारताची निंदानालस्ती करतात, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी येथे केली.
दोन वर्षात मोदी सरकारने कोणतीही विकास कामे न करता केवळ जाहिरातबाजीच केली आहे. आसाम सोडल्यास मोदी इतर कोणत्याच राज्यात निवडणुका जिंकू शकलेले नाहीत. त्यामुळे मोदी लाट आता ओसरत असल्याचेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १७ वा वर्धापन दिन शुक्रवारी झाला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते.
आपल्या घणाघाती भाषणात पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. अनेक उदाहरणे देऊन त्यांनी मोदींना चांगलेच चिमेटे काढले. देशात बदल हवा म्हणून जनतेने भाजपाला सत्ता दिली. परंतू दोन वर्षात काहीच फरक पडलेला नाही. गेल्या कित्येक वर्षात देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात घट झाली नव्हती. मात्र, मोदी सरकारच्या दोन वर्षाच्या कालावधीत कमालीची घट निर्माण झाली आहे.
कृषी उत्पादनाची निर्यात घटल्यामुळे कारखान्यांचे उत्पादन घटले आहे. परिणामी रोजदारांची प्रश्न निर्माण होऊन बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली असल्याचे पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपाला पुर्ण नाकारले. आसाम सोडल्यास केरळ, बिहार, पं. बंगाल, पॉंडेचरी राज्यात मोदींना निवडणूक जिंकता आलेली नाही. भाजपाचा सर्वत्र पराभव झालेला आहे. त्यामुळे आता मोदी लाट ओसरली असल्याचेही पवार म्हणाले.
यापूर्वी देशात कधीही एका विचाराचे सरकार आले नाही. जनता पक्षाच्या सरकारमध्ये अनेक विचारांचे पक्ष होते. मात्र, मोदी सरकार हे केवळ एका विचाराचे आणि एकाच नेतृत्वाचे सरकार आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
शिवसेनेचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोधी आहे. मग अमेरिकेच्या मदतीने मोदी कोणासाठी अणुभट्ट्या उभारीत आहेत. या प्रकल्पांमध्ये ऊर्जा आम्हाला मिळणार आणि नोक-या परदेशातील लोकांना मिळणार असल्याचे पवार म्हणाले.
महाराष्ट्रात दुष्काळाचे प्रचंड मोठे संकट आहे. वर्षभरात १७०० शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा भीषण परिस्थितीत देशात विकासाची कामे करण्याऐवजी मोदी परदेश दौरे करीत सुटले आहेत. यापूर्वीच्या सर्वच पंतप्रधानांनी परदेशात जाताना भारताचे पंतप्रधान म्हणून दौरे केले होते. मात्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून न वागता भाजपाचे नेते म्हणून बोलतात. परदेशात काँग्रेस पक्षावर टीका करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.