पुरुषांच्या बरोबरीने महिला उत्तुंग शिखर गाठू लागल्या आहेत. घर-संसाराची जबाबदारी सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा या मॉडर्न जगतातल्या महिला भारतीय संस्कृती-परंपरा विसरत चालल्या आहेत असं म्हटलं जातं. पण खरंच असं आहे का? या प्रश्नाचं उत्तर पूर्णत: ‘नाही’ नसलं तरीही ‘हो’ची टक्केवारीसुद्धा कमी नाही. अशा या शिक्षित महिला दिसायला जरी आधुनिक असल्या तरीही त्यांनी आपली संस्कृती सोडलेली नसते. अनेक घरांमधल्या सुविद्य तरूणींशी बोलताना हे नेहमी जाणवतं.
काही दिवसांपूर्वी सारिका भेटली, खूप घाईत होती. सारिका म्हणजे शिकलेली आणि अगदी मॉडर्न राहणारी. तिच्या बिनधास्त वागण्यावर, बोलण्यावर ब-याच जणांचा आक्षेप होता, पण तिने त्याची फिकीर केली नाही. ‘मी अशीच आहे’, असं ती म्हणायची. घाई गडबडीत असणा-या सारिकाला मी विचारलं, ‘काय गं, अगदी घाम गळेपर्यंत कुठे धावते आहेस’, त्यावर ती म्हणाली ‘अगं, उद्या वटपौर्णिमा आहे ना, त्याच्या तयारीसाठी बाजारात गेले होते. आता घरी जाऊन उद्याच्या पुजेची तयारी करेन.’ मी तिला कुतूहलाने विचारलं ‘तु पण पूजा करणार? ऑफिसला पण जायचं असेल ना तुला?’, तिने अगदी हसत उत्तर दिलं, ‘हो ऑफिसला तर जायचंच आहे, पण पूजा करून जाईन, मला जशी जमेल तशी करणार. त्यातलं खूप ज्ञान नाही पण जितकं करता येईल तितकं करेन. जे नाही कळतं ते सासूबाईंना किंवा गुगलला विचारेन,’ असं म्हणत आम्ही दोघीही हसू लागलो आणि आपापल्या दिशेने निघालो.
दुस-या दिवशी सारिका छान साडी नेसून, घरात गोडाधोडाचं करून पुजेला आली. आदल्या दिवशी तिने शेजारच्या काकी आणि सासुकडून पूजा कशी करायची याची माहिती घेतली होती, पण तसं बघायला गेलं तर लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच सण. अशी ही आधुनिक सारिका एवढया आवडीने पूजा करते आहे याचं मला आश्चर्यच वाटलं. पूजा झाल्यानंतर तिला मी म्हटलं ,‘मला वाटलं तू घरीच पूजा करशील’, ती म्हणाली ‘नाही गं, घरी पूजा करायची म्हणजे फांदी आणावी लागणार. फांदी आणायची म्हणजे ती तोडावी लागणार म्हणजे पर्यावरणाचा -हास व वृक्षतोडीला हातभार. हे मला अजिबात पटत नाही’. म्हणूनच आपली संस्कृती जोपासण्यासाठी तिने सोयिस्कर मार्ग न निवडता, समाजाचा आणि पर्यावरणाचासुद्धा विचार केला. अशा त-हेने हौसेनं सगळी तयारी करून पूजा करून ती ऑफिसलासुद्धा गेली.
वटपौर्णिमेनंतर हल्लीच झालेल्या नवरात्रौत्सवात सीमाने नऊ दिवस ठरलेल्या रंगाच्या साडया नेसल्या. सीमा म्हणजे मॉडर्न असण्याचा उत्तम नमुना. सीमा एरवी शॉटर्स, जीन्स आणि स्कर्टवर असते. या सीमाला धड साडीसुद्धा नेसता येत नाही. असं असतानासुद्धा ती नवरात्रीचे नऊ दिवस साडी नेसून रितसर देवीची पूजा करून ऑफिसला जायची. या सगळ्यात तिला थोडा उशीर व्हायचा. साडीत साधं चालण्याचे वांदे असतानासुद्धा बॉस ओरडेल म्हणून सीमा जमेल तितकं धावण्याचा प्रयत्न करायची आणि ट्रेन पकडायची. एकूणच काय तर, या सर्व नोकरदार आधुनिक स्त्रिया असूनही केवळ संस्कृती जपण्यासाठी जिद्दीने अडचणींना सामोरं जाऊन त्या धडपडत असतात. सीमा-सारीकासारख्या आजकालच्या मॉडर्न महिला कितीही मॉडर्न वागत असल्या तरीही त्या भारतीय असल्यामुळे त्यांना आपल्या संस्कृतीचा विसर पडलेला नाही. संपूर्ण भारत देशात सण, व्रतवैकल्ये, उत्सव साजरे करण्याची अनादिकालापासूनची प्रथा. भारतीय संस्कृतीची उज्ज्वल परंपरा टिकवून ठेवणं हा त्यामागचा उद्देश. आपली संस्कृती जोपासणं हा भाग असला तरीही त्यामागची शास्त्रीय आणि सामाजिक कारणंसुद्धा त्या समजून घेतात.
अनेक भारतीय कुटुंबांमध्ये सणवार, काही इतर सांस्कृतिक प्रथा हे सर्व पद्धतशीरपणे पाळलं जातं. पूर्वी सामाजिक बंधनं असल्यामुळे स्त्रियांना फारसं बाहेर पडता यायचं नाही. तेव्हा काही प्रथांच्या, सणांच्या निमित्ताने त्यांना समाजात बाहेर मिसळण्याची ती संधी असायची पण आता काळ बदलला तसंच स्त्रियांची जीवनशैलीही बदलली आहे. आता सगळ्याच मुली किंवा महिला संस्कृतीचं पालनं करतात असं म्हणण्याचा अट्टाहास नाही पण ब-याच जणी ऑफिस, घर, नातेवाईक, शेजारी सांभाळून सण साजरे करतात. कुटुंबाच्या जबाबदारीचं पारडं सांभाळताना त्यांची नोकरीही गमवायची नसते. इतकी धावपळ असतानासुद्धा त्या पूजा, व्रत-वैकल्यं करतात. हे करण्यामागे प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत. काही महिला या सणांनिमित्त एकमेकींना भेटता येतं म्हणून, कोणाच्या घरी धाक आहे म्हणून तर कोणाला आवड आहे तर कोणाला आपल्या परंपरा पुढच्या पिढीला म्हणजे स्वत:च्या मुलांनाही कळाव्यात म्हणून हे सण-उत्सव साजरे करत असतात. एकत्र कुटुंबात राहत नसलो तरीही आपण आपली संस्कृती सोडायची नाही असंही काही जणींचं म्हणणं आहे. श्रावणातले उपवास किंवा इतर उपवास करण्यामागची त्यांना शास्त्रीय कारणं माहिती असल्यामुळे त्या आवर्जुन उपवास करतात. फक्त उपवासचं कशाला, तर सणांची शास्त्रीय व सामाजिक कारणंही त्यांना पटत असल्यामुळे या आधुनिक महिला सण-उत्सव जोमाने साजरे करतात.
प्रत्येकीचा यामागे वेगवेगळा विचार असतो. कुटुंबाला पुढं नेण्यामध्ये स्त्री महत्वाची भूमिका निभावते त्याचप्रमाणे संस्कृती-परंपरा टिकवण्यामध्येही तिचंच मोठं योगदान असतं हे नाकारता येणार नाही. ब-याचदा महिलांना सण साजरे करण्याचा उत्साह खूप असला तरीही घरच्या आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे त्यांना सगळं करणं शक्य होतं नाही. पण जमेल तसं करण्याचा प्रयत्न महिला करतात. मॉडर्न बनणं ही काळाची गरज आहे, तसंच ती जिथे नोकरी करते त्या ठिकाणाच्या वातावरणानुसार अनेकदा तिचे आचार-विचार व पेहराव असतात. असं असलं तरीही आजची आधुनिक महिला ती प्रथम भारतीय आहे हे ती कधीच विसरत नाही, म्हणूनच मॉडर्न आणि फॅशनेबल महिला आपली संस्कृती जोपासत नाही हा जबरदस्तीने लावलेला टॅग काढून टाकण्याची आणि थोडं व्यवहारी होण्याची गरज आहे.