१८ ते २३ सप्टेंबरला मुंबईकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ७ गाडय़ा धावणार
कणकवली – गणेश चतुर्थी सणाला मुंबईहून कोकणात येणा-या चाकरमान्यांची परतीची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) मुंबई व उपनगरामध्ये जाणा-या प्रवांशासाठी व परतीच्या प्रवाशांसाठी २० ऑगस्टपासून एसटीचे ऑनलाईन बुकिंग सुरू केले आहे. १८ ते २३ सप्टेंबपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सात एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती कणकवली विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.
रसाळ म्हणाले की, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई व उपनगरांमध्ये परतीच्या प्रवाशांसाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. विजयदुर्ग ते बोरिवली सायंकाळी ४ वा., सावंतवाडी-बोरिवली सायंकाळी ३.३० वा., कणकवली-बोरिवली सायंकाळी ५ वा., कणकवली-मुंबई ४ वा. कणकवली-फोंडाघाट-बोरिवली सायंकाळी ५ वा. देवगड-बोरिवली दु. ३.३० वा. देवगड-बोरिवली ४.४५ वा अशा रातराणी साध्या गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या गाडय़ांचे आरक्षण पूर्ण झाल्यानंतर दुस-या जादा गाडय़ांचे ऑनलाईन बुकिंग करण्यात येणार आहे.
गणेश चतुर्थी सणासाठी येणा-या चाकरमान्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी महामंडळामार्फत घेण्यात येणार आहे. ११ व १२ सप्टेंबर रोजी तळेरे-कणकवली व जिल्ह्यातील ६ आगारांमधून ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
गणेश चतुर्थी सणासाठी कोकण रेल्वेने येणा-या प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवरून एस. टी. सोडण्यात येणार आहेत. आठवडा बाजारांसाठी १०,११,१२ सप्टेंबरला जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. ठाणे ते सिंधुदुर्गात येणा-या ६१ एस. टी. बस बुकिंग झाल्या आहेत. अजूनही गाडय़ा बुकिंग होतील, असा अंदाज असल्याचे सांगितले.
गावागावांत मिळणार ग्रुप बुकिंग एसटी सेवा
गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून एसटी बसची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी गावातील प्रवाशांनी एसटी अधिकारी, कणकवली यांच्याकडे मागणी करावी. कमीतकमी ४४ प्रवासी बुकिंग करण्यात यावेत. प्रवाशांच्या मागणीनुसार एसटी सेवा देण्यात येणार आहे.