देशाच्या विकासात भारतीय रेल्वे किती महत्वाची आहे हे आजच्या अर्थसंकल्पावरुन दिसून येते.
नवी दिल्ली – देशाच्या विकासात भारतीय रेल्वे किती महत्वाची आहे हे आजच्या अर्थसंकल्पावरुन दिसून येते. हा रेल्वे अर्थसंकल्प पारदर्शकता आणि अखंडतेवर भर देणारा आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंदा गौडा यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले.
केंद्रात सत्तेवर आल्यानंतर सदानंद गौडा यांनी मंगळवारी भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्यावतीने पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. सदानंद गौडा यांनी आपल्या अर्थसंकल्पात तमाम भारतीयांना रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे स्वप्न दाखवले आहे.
रेल्वे क्षेत्राला आम्हाला कुठे घेऊ जायचे आहे तसेच रेल्वेच्या माध्यमातून आम्हाला भारताला कुठे न्यायचे आहे हे या अर्थसंकल्पातून दिसून येते असे मोदी म्हणाले. संपूर्ण भारताचा विकास लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. यापुढे रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी आम्ही विज्ञान-तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करु असे मोदींनी सांगितले.
या अर्थसंकल्पात जी पावले उचलण्यात आली आहेत ती रेल्वेला आणि देशाला प्रगतीकडे नेणारी आहेत. देर आए दुरुस्त आए, आधुनिक भारताचा हा पहिला परिपूर्ण अर्थसंकल्प आहे अशा शब्दात मोदींनी रेल्वे अर्थसंकल्पाचे कौतुक केले.