मुंबईकरांच्या मतांवर निवडून येत सत्तेवर बसलेल्या शिवसेना-भाजपाने अखेर पाणी आणि मलनिस्सारण करात वाढ करत दरवाढीचा बोजा टाकला.
मुंबई – मुंबईकरांच्या मतांवर निवडून येत सत्तेवर बसलेल्या शिवसेना-भाजपाने अखेर पाणी आणि मलनिस्सारण करात वाढ करत दरवाढीचा बोजा टाकला. झोपडपट्टीतील लोकांसह सर्वाच्या पाणी बिलात वाढ करतानाच मलनिस्सारण करात दहा टक्के वाढ केली असून या प्रस्तावाला शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र, आता दरवाढीबरोबरच माणसी दीडशे लिटरपेक्षा जास्त पाणी वापरल्यास मुंबईकरांना तिप्पट ते पाच पटीने पैसे मोजावे लागणार आहे. याची अंमलबजावणी पूर्वलक्ष्यीप्रभावाने १ एप्रिल २०१४पासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे. शहरातील नागरिकांची शिवसेना-भाजपाने घोर फसवणूकच केली आहे.
मुंबईकरांच्या पाणी तसेच मलनिस्सारण आकाराच्या नियमावलीत काही नियमांमध्ये सुधारणा तसेच नवीन नियम समाविष्ट करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडला होता. यात झोपडपट्टी, आदिवासी पाडा आदी भागांना प्रति हजार लिटरसाठी ३ रुपये ५९ पैसे, पाचशे चौरस फुटाच्या घरांच्या इमारतींना प्रति हजार लिटरसाठी ४ रुपये ३२ पैसे एवढा दरासह दीडशे लिटरपेक्षा अधिक पाणी वापरल्यास तिप्पट ते पाच पट दर आणि मलनिस्सारण आकार ६० टक्क्यांऐवजी ८० टक्के वाढविण्याचा समावेश होता. मात्र, हा प्रस्ताव मंजुरीला आला असता, भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी उपसूचनेद्वारे वाढविण्यात येणारा २० टक्के मलनिस्सारण आकार रद्द करण्यात यावा, अशी उपसूचना मांडली. परंतु अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी ही दरवाढ कमी करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
मुंबईत मलवाहिन्यांचे मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यासाठी ही वाढ आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर अध्यक्ष यशोध फणसे यांनी ही दरवाढ दहा टक्के तरी कमी करण्यात यावी अशी सूचना केली. त्याप्रमाणे दहा टक्के दरवाढ कमी करून ६० ऐवजी ७० टक्के मलनि:सारण करण्यास प्रशासनाने तयारी दर्शवली. त्याप्रमाणे उपसूचनेद्वारे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
काँग्रेस,राष्ट्रवादी,मनसे गैरहजर
आर.आर.पाटील यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात यावी,ही मागणी मान्य न केल्यामुळे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने सभात्याग केल्यानंतरही सत्ताधारी पक्षाने कामकाज पुढे सुरु ठेवत हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या गैरहजेरीत शिवसेना-भाजपने हा प्रस्ताव मंजूर मुंबईकरांच्या माथी पाण्याची दरवाढ लादली.
अशी आहे दरवाढ
झोपडपट्टी, आदिवासी पाडे : प्रति हजार ३ रुपये ५९ पैसे
५००पेक्षा अधिक चौरस फुटाची घरे : प्रतिहजार ४ रुपये ३२ पैसे
शीतपेये व मिनरल कंपन्यांसाठी : प्रति हजार ९० रुपये लिटर
मलनिस्सारण आकार : ७० टक्के (सध्या ६० टक्के आहे)
माणसी दीडशे लिटर पाणी वापरल्यास : सर्वसाधारण दर
माणसी दोनशे लिटर पाणी वापरल्यास : तिप्पट दर
माणसी अडीचशे लिटर पाणी वापरल्यास : चौपट दर
माणसी अडीचशे लिटरपेक्षा अधिक पाणी वापरल्यास : पाचपट दर
ं