वेधशाळेने दिलेला ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा मनावर न घेता मान्सूनने दांडीयात्रा सुरूच ठेवली असून केवळ विकेटवर येऊन पुन्हा स्टेडियम गाठणा-या फलंदाजाप्रमाणे मुंबईत तो शिडकावा करत आहे.
मुंबई- वेधशाळेने दिलेला ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा मनावर न घेता मान्सूनने दांडीयात्रा सुरूच ठेवली असून केवळ विकेटवर येऊन पुन्हा स्टेडियम गाठणा-या फलंदाजाप्रमाणे मुंबईत तो शिडकावा करत आहे. जूनचा तिसरा आठवडा उजाडण्याची वेळ आली तरी पावसाने दडी मारल्याने सर्वाच्याच मनात चिंतेचं काहूर माजायला सुरुवात झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणक्षेत्रातील ओसरत्या पाणीसाठयाने या चिंतेत भर टाकली असतानाच, किरकोळ पाऊसधारा आणि प्रचंड उकाडा अशा विचित्र वातावरणाने मुंबईकरांना जीव नकोसा केला आहे. तापमानातील सततच्या बदलांमुळे सर्दी, ताप, खोकल्याबरोबरच अतिसार, कावीळीसारख्या साथीच्या आजारांचेही साम्राज्य वाढण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. राज्यातही अनेक भागांत पावसाने ओढ दिली असून विविध धरणांमधील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे.
रविवारी मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर २४ तासात मुसळधार पाऊस पडेल, असे भाकित हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले होते. मात्र मुसळधार तर सोडाच, सुखद गारवा देणारा पाऊसही अद्याप झालेला नाही. पावसाच्या या लपंडावामुळे यंदा महागाईबरोबरच पाऊसही रडवणार का, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. अरबी समुद्रात निर्माण होणा-या कमी दाबाच्या पट्टयामुळे व वा-याच्या चक्राकार परिस्थितीमुळे म्हणजेच नानौक वादळामुळे मान्सूनला मदत होऊन मुंबईसह कोकणात पावसाचा जोर राहील, असा अंदाज मुंबईच्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. परंतु वरुणराजाने मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाला तोंडावर पाडत चक्क दडी मारली. नाही-होय करत मान्सून मुंबईत दाखल झाला. मात्र, त्याने खरा जोर अद्याप दाखवलेला नाही.
पावसाचे थेंब टिपण्याऐवजी उकाडयाने हैराण मुंबईकरांना घामाचे थेंब टिपावे लागत आहेत. दरम्यान, पुन्हा येत्या २४ तासात मुंबई परिसरात पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता मुंबईच्या हवामान विभागाने वर्तवली आहे.
धरणांचा पाणीसाठा घटला
शाळा चुकवणा-या मुलांसारखा लहरी पाऊस चुकारपणा करत असल्यामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा झपाटय़ाने ओसरू लागला आहे. जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू होऊनही पावसाने अशी ओढ दिल्यामुळे अनेक धरणांचे घसे कोरडेच आहेत. गेल्या वर्षी १७ जूनपर्यंत धरणक्षेत्रात एकूण ३,९०९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर या वर्षी १ ते १७ जूनपर्यंत अवघी ६३८ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
दर वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस पडणार असल्याचे भाकित हवामान खात्याने आधीच व्यक्त केले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील धरणांत पुरेसा पाणीसाठा असला तरीही पाणी काटसरीने वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मृग संपत आला तरी पावसाने मनावर घेतलेले नाही.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १६ टक्के कमी पाऊस धरणक्षेत्रात झालेला आहे. त्यामुळे जुलै व ऑगस्ट या महिन्यांवर आता पाणीसाठयाची भिस्त राहणार आहे. या काळात धरणक्षेत्रात पावसाने धूमधडाका केल्यासच धरणांतील पाण्याची स्थिती योग्य राहू शकेल. जिल्ह्यातील धामणी धरणक्षेत्रात जूनपासून १०९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. कवडास- १०९, भातसा-५५, वांद्री- १२८, आंध्र- २६, मोडकसागर-५३, तानसा- ६१.६० तर बारवी धरण क्षेत्रात ९७ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. गतवर्षी १ ते १७ जून दरम्यान धरण क्षेत्रात (मिलीमीटरमध्ये)- धामणी-३६९, कवडास-३६९, भातसा-३७१, वांद्री-६३०, आंध्रा-५३७, मोडकसागर-३७९, तानसा- ५५२.८० तर बारवी – ७०८ एवढा पाऊस पडला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही पाऊस पडल्याने धरणांत अजूनही पाण्याचा साठा आहे. मात्र तो झपाटयाने कमी होत आहे. येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्यास धरणांची पातळी वाढू शकते.
मान्सूनचा लपंडाव आणि उष्मा यामुळे वातावरणात वेळोवेळी बदल होऊन ताप, उलटया, कावीळ, अतिसार आदी रोग पसरण्याची भीती अधिक असते. मधेच ढगाळ हवा तर मधेच उष्मा यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे आदी लक्षणे दिसतात. लोकांनी शक्यतो उघडय़ावरील पदार्थ खाऊ नये, बाहेरील पाणी पिऊ नये, पाणी उकळून प्यावे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, घरात पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी. -डॉ. अमर पझारे, केईएम रुग्णालय