हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबई विधान भवन येथे होईल, अशी घोषणा दोन्ही सभागृहाच्या पीठासीन अधिका-यांनी केली.
नागपूर- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. या अधिवेशनात विधानसभेत एकूण २३ विधेयके मंजूर झाली. तर, दोन्ही सभागृहाची १५ विधेयकांना मंजुरी मिळाली. हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबई विधान भवन येथे होईल, अशी घोषणा दोन्ही सभागृहाच्या पीठासीन अधिका-यांनी केली.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपूर विधान भवन येथे सुरू होते. खूप दिवसांनंतर पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात आले. पावसामुळे अधिवेशनाचा एक दिवस वाया गेल्यामुळे नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन घेण्याच्या निर्णयावर टीका-टिप्पणीही झाली. तीन आठवडय़ांच्या या अधिवेशनात पहिल्या दोन आठवडय़ांत विरोधकांच्या गदारोळामुळे फारच कमी कामकाज झाले. तिस-या आठवडय़ात मात्र दोन्ही सभागृहात उशिरापर्यंत कामकाज झाले. तीन आठवडय़ांच्या या अधिवेशनात एकूण १३ बैठका झाल्या. विधानसभेत एकूण ८६ तासांचे कामकाज झाले.
मंत्री उपस्थित नसल्यामुळे दहा मिनिटांचा वेळ वाया गेला. तर, इतर कारणांमुळे ८ तास ९ मिनिटांचा वेळ वाया गेला. या अधिवेशनात विधानसभेत एकूण १३ विधेयके मंजूर झाली. तर १५ विधेयके दोन्ही सभागृहांत मंजूर झाली. या अधिवेशनात एकूण तीनच प्रस्ताव चर्चेला आले. या अधिवेशन काळात एकाही स्थगन आणि अध्र्या तासाची चर्चा होऊ शकली नाही. त्याबद्दल कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. विधिमंडळाचे पुढील अधिवेशन मुंबई विधान भवन येथे सोमवार, १९ नोव्हेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा दोन्ही सभागृहाच्या पीठासीन अधिका-यांनी केली.