पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्ण होऊन अवघे काही तासच उलटले असताना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास खंडाळा बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली.
पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्ण होऊन अवघे काही तासच उलटले असताना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास खंडाळा बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर २३ जुलै पासून सुरू असलेले दरडी काढण्याचे काम शुक्रवारी सायंकाळी पूर्ण झाल्याने आज सकाळपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई व पुणे दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली होती. मात्र , आज पुन्हा खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.
खंडाळा व आडोशी बोगद्याजवळ १९ जून व २२ जुलै रोजी अनुक्रमे मोठ्या प्रमाणात मार्गावर दरडी पडल्याने मुंबई व पुण्याकडे जाणारी वाहतूक अनुक्रमे ३३ व १५ तास विस्कळीत झाली होती. तर आडोशी बोगद्याजवळील अपघातात दोन प्रवासी मृत्युमुखी पडले होते.
घाटातील अजूनही काही भाग धोकादायक व दरडी पडण्याच्या स्थितीमध्ये असल्याने या धोकादायक दरडी काढण्याची मोहीम महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीने २३ जुलै रोजी सुरू केली होती. चार ऑगस्ट पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. सदर धोकादायक दगड काढण्याचे काम मेटाफेरी या इटालियन कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीचे चार अभियंते व १५ कर्मचारी यांनी अवघ्या नऊ दिवसात सर्व धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्णही केले.
काम सुरू असताना संभाव्य धोके टाळण्यासाठी द्रुतगती वरील वाहतूक बंद ठेवत हलकी व प्रवासी वाहने राष्ट्रीय महामार्गावरुन लोणावळा, खंडाळा, खोपोली माग्रे जुन्या बोरघाटातून वळविल्याने दररोज नागरिकांना व वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. अखेर आज हे काम पूर्ण झाल्याने वाहनचालकांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला होता.